Thursday, October 20, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 196 ते 200 :  ध्वनिफीत :





सारांश - श्लोक  : १९६ -२००. 

संपूर्ण आसमंतात वावरत असलेल्या अणुरेणूंमध्ये अस्तित्व असलेल्या परब्रह्म ईश्वर-तत्वाला श्रीसमर्थ राघव असे

 संबोधतात  आणि म्हणतात की या राघवाने व्यापल्यामुळे  आसमंतात रिकामी अशी जागाच उरलेली नाही.

राघवाचे रूप कसे आहे हे सांगताना समर्थाना आकाशाची आठवण होते. 

मन आभाळा एवढे विशाल केले, स्वतःशी मर्यादित आपले  भावना/विचार जर सर्वांची चिंता करण्यासाठी वापरले,

तर अर्थात आपण समर्थांच्या / रामाच्या जवळ जाऊ. आणि त्याच्या सानिध्याने आपल्या सर्व भव-चिंता, 

संसार-काळज्या नष्ट होतील. आपण भयातीत होऊ. आणि भयातून पूर्ण मुक्ती हाच मोक्ष असतो. 

परमात्मा आकाशा  सारखा आहे असे सांगतात,  नंतर ती उपमा अपुरी आहे असंही सांगतात. उपमा हि कधीच

 पूर्णत्वाने घेता येत नाही, फक्त समजून घेण्यास  त्या उपमा मदत करतात. 

नभाच्या मर्यादेत तो नाही. तो सर्वत्र ओतप्रोत आहे, म्ह्णून त्याला मर्यादित करता येत नाही. श्रीरामाचे रूप विस्तीर्ण,

अतिशय पुरातन असे आहे. त्याला कसलीही तर्कसंगती लागू पडत नाही. अतिशय गूढ असे हे ईश्वरतत्व आहे. 

पण तरीही त्याच्याच कृपेने गूढता नाहीशी होऊन त्याचे ते अद्वितीय असलेले रूप सुलभपणे समजून येते. 

ज्ञान शब्दांनी आपण ऐकतो, नंतर अनुभवाने त्याची प्रचिती येते तेव्हा ते आकळते. 

मग साक्षी अवस्थाही आटून जाते. ध्यानात उन्मनी अवस्था येते त्यात दिवसाचे क्षण होतात. 

कृतार्थतेची अनुभूती येते .         श्रीराम !!


विजय रा.जोशी. 





  मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 191 ते 195 :  ध्वनिफीत :





सारांश श्लोक :  १९१-१९५ . 

स्वत:च्या ऐहिक सुखातच गुंतून पडलेल्या जीवाला आध्यात्माचा, परमात्म्याचा  विचार करायला फुरसत  मिळत

नाही. म्हणून ब्रह्मज्ञान अगदी कल्पान्त झाला तरी आकलन होणे शक्य नाही. 

शरीर, मन आणि बुद्धी यापलीकडे न गेल्यास परमात्म्याचे स्वरूप कळणार नाही. 

देहबुद्धी निरास म्हणजे अध्यात्म/समाधी तयारी. 

जाणीव आणि नेणीव या मानवी स्थितीतल्या कल्पना आहे, त्या सर्वसाक्षी परमात्म्याला लागू नाहीत.

जन्म हा आपल्या जीवनाची सुरवात नाही आणि मृत्यू आपल्या जीवनाचा अंत नाही , एका अनंत प्रवाहाचा 

एक छोटा भाग म्हणजे आपले जीवन.

देव हा आकाशासारखा असतो.  आकाश म्हणजे काय? आकाशाची सुरुवात कुठून होते आणि शेवट कुठे होतो हे

जसे समजत नाही तसेच हा देवराणा कुठून येतो? कुठे जातो? हे ही कळत नाही.

देव म्हणजे काय ? देह सोडल्यावर जीव कोठे जातो ? मानवी मनाचे हे चिरंतन प्रश्न आहेत.

‘देहबुद्धी, मीपणा न ठेवता मनुजाने परमेश्वराच्या भक्तीत आपले आयुष्य व्यतीत करावे अन्यथा ब्रह्मज्ञान होणे नाही’ 

अशी जाग देण्याचे काम समर्थ या श्लोकात करत आहेत. 

या सर्व विषयांची सोप्या तर्हेने मांडणी असलेले विवेचन जरूर एक, आपला अभिप्रायही जरूर नोंदवा. 

धन्यवाद. 


विजय रा. जोशी. 

 




Sunday, October 9, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 186 ते 190 :  ध्वनिफीत :





सारांश श्लोक १८६-१९०. 

परम वस्तूचा पत्ता, परमात्म्याचा  समर्थ आपल्याला सान्गताहेत. म्हणतात तो तुझ्या जवळच सानिध्यात आहे. 

त्याचा वियोग  सहन न होऊन तू त्याला तळमळीने जेव्हा हाक घालशील तेव्हा तो लगेच तुला भेटेल. 

या विश्वात प्रचंड सु-रचना, शिस्त , अनुशासन आहे. पंचमहाभूतांचे कार्य अतिशय सुसूत्रपणे हे सर्व विश्व निर्माण

करते. पण हे सर्व करणारी जी शक्ती आहे (निसर्ग / प्रकृती), ती त्या सर्वांच्या पलीकडे आहे. 

अस्तित्वहीन असा तो परमात्मा आहे. 

या विशाल विश्वात आपण माणसांनी आपली दृष्टी संकुचित ठेवली आहे. 

अन म्हणून आपल्याला हे सत्य न दिसेनासे झाले.

यावर उपाय म्हणजे , आपली धारणा, जी असत्यावर आधारित आहे ती बदलणे,  वृत्ती बदलणे हा आहे.

पंचमहाभूतांनी समृद्ध असलेल्या या सृष्टीत आपण आकंठ बुडालेले असतो. आणि त्यामुळे सहाजिकच दृश्य जग 

हेच सत्य असा आपला घट्ट समज असतो. पण ते खरे नाही. 

आसक्ती सोडा. जगाकडे पाठ फिरवून रुक्ष जीवन जगू नका,  पण त्यास सर्वस्वही मानू नका. 

समर्थ येथे सांगतात कि दृश्याचे ते बंधन ज्ञान शस्त्राने  तोडावे. 

ऐक ज्ञानाचें लक्षण| ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान |  पाहावें आपणासि आपण| या नांव ज्ञान                        

आपली व्यवहारातील ज्ञान-संकल्पना अध्यात्मात उपयोगी नाही.

समर्थ म्हणतात , ज्याने मायेच्या योगाने ही सृष्टी रचना केली तोच देव आहे असे ओळखावे .त्याला पाहता आले तर

जीवाच्या मागे लागलेली संसारपीडा संपते व मोक्ष प्राप्त होतो . वाणीचे मूळ स्थान जी परावाणी ती सुध्दा त्याचे वर्णन

करू शकत नाही. परावाणी च्या तो पलीकडे आहे. तो वाचातीत आहे. 

भ्रम ,माया या देवाला स्पर्श करू शकत नाही. 

निर्गुणाला कल्पित जावे असे समर्थ सांगतात. निर्विकल्प असे स्वरूप आपल्यात भरून आहे . 

अशी कल्पना करून आपला अहंभाव सोडायला समर्थ सांगतात.   अध्यात्मातील या सर्व संकल्पना खूप गहन

 आहेत पण समर्थ त्या कशा सोप्या करून सांगत आहेत ते आपल्यास या ध्वनिफितीत कळेल.    ... श्रीराम !


विजय रा. जोशी. 

                   


 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 181 ते 185 :  ध्वनिफीत :





सारांश श्लोक १८१ - १८५. 

सद्गुरू कसे आसावे, कसे नसावे, त्यांना कसे ओळखावे याचे वर्णन करणारे  हे श्लोक आहेत. . 

साधना म्हणजे काय?  गुरु कोणाला म्हणावं ? साधक कोणाला म्हणावं? शिष्य कोण? कृपा म्हणजे काय, 

अध्यात्मात साधकत्व  म्हणजे काय ?  ........  या बद्दल प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष चर्चा आहे. 

ज्याच्या चेतनेतून मी-पण, अहंभाव हा अगदी पार निरसून गेला आहे , निराकरण झालं आहे, केवळ वैश्विक

चेतनाच तिथे स्पंदित आहे , अशा व्यक्तीला आपण गुरुपद प्राप्त झालय असं म्हणू शकतो. 

जिथे मी-पण उरलं नाही, आणि तू-पण उरलं नाही त्या ठिकाणी व्यापार शक्य नाही, दुकानदारी शक्य नाही,

जाहिरातबाजी शक्य नाही. ती व्यक्ती जगत राहील स्वतःच जीवन , शांतपणे, संथपणे.. तो/ती गुरुत्व प्राप्त व्यक्ती. 

ज्याच्या हृदयामध्ये साधकाची भूमिका परिपकव होते, त्या व्यक्तीला, त्या साधकाला,  अशा आत्मानुभावी व्यक्तीशी

मिळवून देण्याची जबाबदारी जीवन उचलते. 

सद्गुरुंचे मूल्यमापन करणे हि तशी अवघड गोष्ट . तरीही सद्गुरूंवर श्रद्धा ठेवण्यापूर्वी आपण आपल्या

पद्धतीने ते करणे आवश्यक आहे. 

शिष्यामधे शरणागती अत्यंत आदराने हवी. तळमळीने हवी. मनापासून हवी.  लीनतेने रामरुपात लपले, 

विलीन झाले, एकरूप झाले असे भक्त हवे. जो भक्त आत्मरूप झाला तो भयातीत झाला. सद्गुरू यास

सहाय्यभूत होतात. ..         सोप्या उदाहरणांनी, कथेच्या सहाय्याने आपण हे सर्व या ध्वनिफितीच्या माध्यमातून

 समजून घेऊ या. .   श्रीराम !


विजय रा. जोशी 


Sunday, September 25, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 176 ते 180 :  ध्वनिफीत :





सारांश श्लोक १७६ -१८०. 

सगुण उपासना करतांना मूळ निर्गुण रूपाची सतत जाणीव ठेवावी लागते.  ज्या निर्गुण रूपाची प्रतिक-रुप पूजा

आपण करतो त्याचे भान सतत ठेवावे लागते. ‘सगुण उपासना’ म्हणजे आपल्या उपास्य देवतेला हृदयात धारण

करुन तिचे विशेष गुण आपल्यात  येतील, आपला तसा स्वभाव बनेल असा प्रयत्न करणे.

एकीकडे ब्रह्माण्डाचा पसारा आणि ब्रह्माण्ड निर्मात्याचे अवर्णनीय स्वरूप आणि दुसरीकडे अहंतायुक्त मानवी

स्वभाव, बुद्धी … याचा आपण विचार करीत आहोत. आणि त्या अल्प बुद्धीला हा सर्वत्र असलेला परमात्मा कसा

समजून घेता येईल  हे समर्थ आपल्याला समजावत आहेत. 

मानवी जीवनात मनाचे स्थान महत्वाचे आहे. मनाचे उन्नयन करावे लागते. मनाला प्रशिक्षण द्यावे लागते.. हे मन

सत्संगतीने,  सत्संगाने आणि  पूर्व सुकृताने जेव्हा अधिक सूक्ष्म होऊ लागते तेव्हा वरवर दिसणाऱ्या दृश्यामागे जे

चिरंतन अदृश्य आहे त्याचे अस्तित्व कधी-कधी उमजू लागते त्याबद्दल उत्सुकता निर्माण होते.   

मग हे विश्व  कोणी, कसे, केव्हा, कशासाठी  निर्माण झाले हे प्रश्न मनात येतात. 

मनुष्य जीवनात आपल्याला जी बुद्धी, विवेक शक्ती लाभलेली आहे तिचा उपयोग करून मानव देवरूपाला पोहोचू

शकतो. त्यासाठी आत्मज्ञान प्राप्त केलेल्या गुरूंचे मार्गदर्शन उपयोगी ठरते. 

लोकांना फसविण्यासाठी काम करणारे अनेक भोंदू पण हुशार मंडळी असतात. ते तात्काळ चमत्कार घडविणारे

उपायांचा मोह आपल्याला पाडतात. आपल्याला जाळ्यात ओढू पहातात..  

अशा तथाकथित गुरु पासून सावध रहायला समर्थ सांगत आहेत.                                                              श्रीराम !



विजय रा. जोशी. 


 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 171 ते 175 :  ध्वनिफीत :





सारांश श्लोक १७१ -१७५ 

आत्मवस्तूला पहाणाऱ्या ज्ञान चक्षुंचा उदय कसा होतो, चर्म चक्षु, आणि ज्ञान चक्षु फरक. आणि 

त्या  स्थित्यन्तरासाठी उपाय, अहंकारमुक्ती.  हे सर्व मूलभूत ज्ञान सांगणारे श्लोक आहेत.  

निरपेक्ष त्याग दुसऱ्यांसाठी करणे अशी  आपली सहज अवस्था होणे हे ज्ञानाचे लक्षण आहे. आपले जगणे

इतरांसाठी व्हायला हवे.  सुरवातीला ते जरी संकल्पाने असले तरी अंतिमतः ती आपली सहज अवस्था 

व्हायला पाहिजे.  

कल्पनेच्या दोन दिशा – 1. विषयाकडे धावणारी  (अविद्या). 2. परमात्म्याचा शोध घेणारी.(सुविद्या).  

विषय सुखाने आनंद होतोच पण तो चिरकाल नसतो. तात्पुरता असतो.  उलट परमात्म दर्शनाने अवीट, संपूर्ण

आणि कायम टिकणारा आनंद निर्माण होतो. म्हणून विवेकाच्या आधाराने सुविद्या मिळवून तसे जगण्याचा

प्रयत्न असावा. 

साधना सुरु झाली तर मग किती दिवसात सुविद्या येईल ? या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. 

ते प्रत्येक व्यक्तीवर अवलंबुन आहे. अहंकार रुपी राहू आपल्यातील  आत्मशक्ती आच्छादून टाकतो. विवेकाने

जर अहंकार मुक्ती साधली तर हे आच्छादन दूर होते. म्हणून जीवनात विवेकाला महत्वाचे स्थान हवे.

भगवान प्रचिती / दर्शन घेण्यासाठी काय करावे याचे तपशीलवार मार्गदर्शन समर्थ करीत आहेत. 

ब्रह्मांड नायकाची ओळख झाल्यावर जीवनाचे रूपच कसे आमूलाग्र बदलून जाईल हे समर्थांना सूचवायचे आहे

आणि त्यासाठी त्या जगन्नियंत्याला ओळखावे असा त्यांचा आग्रह आहे.                                        श्रीराम !!



विजय रा. जोशी. 



Wednesday, September 7, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 166 ते 170 :  ध्वनिफीत :




सारांश : श्लोक 166-170 . 


प्रपंच हेच सर्वस्व समजण्याचा निश्चय आपण केला. त्यातील फोलपणा श्रीसमर्थ  समजावत आहेत. निश्चय

शाश्वताचा, जे कायम टिकणारे सत्य आहे त्याचा म्हणजे परमात्मा प्राप्तीचा निश्चय करावा असं सांगत आहेत. . हे 

उत्कृष्ठ ध्येय आहे.  जीवनातील घडी न घडी या कार्यात वेचावी. आणि हे सर्व संत्संगतीने, संत वचन पालनाने ,

साधनेने साधेल. म्हणून संत संगत सोडू नये. 

जीवन ध्येय काय असावे आणि त्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन समर्थ करत आहेत. 

संत कोणाला म्हणाव ? जो भगवंतांशी एकरूप झाला तो संत . मन शान्त आहे आपुलकी आहे,

प्रसन्नता आहे, शुद्ध भाव आहे या वरून संत ओळखता येतात . दिसायला ते सामान्य माणसासारखे

दिसतात. 

त्यांच्याकडे खरे ज्ञान असते, त्यांचे वागणे शांत, तृप्त असते, सर्व करूनही त्यांची वृत्ती पूर्ण अलिप्त

असते. आणि यामुळे ते कोठल्याही उपाधीत अडकलेले नसतात. 

देहबुद्धी जाण्यासाठी ज्ञानबोध कसा करायचा ते समर्थ शिकवत आहेत. वाचनाची , अभ्यासाची मर्यदा

आहे. त्यातून ज्ञानबोध होणार नाही. अभ्यासाला निष्ठेची, सातत्य पूर्ण वर्तनाची जोड अनिवार्य आहे.

त्याशिवाय खरा ज्ञानबोध होणार नाही. या मार्गावर आपण अखंड राहिलो तर आपल्याला सतत

संतसंगती मिळेल आणि त्यातून योग्य वेळ आली कि ज्ञानबोध होऊन आपल्या अंतरंगात 

परिवर्तन घडेल, स्थित्यन्तर घडेल .

हे सर्व सविस्तर समजून घेण्यासाठी, ऐकण्यासाठी हा ऑडिओ जरूर ऐका , 

आवडल्यास इतरांना ऐकायला सांगा, शेअर करा. धन्यवाद !


विजय रा. जोशी. 



Friday, August 19, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 161 ते 165 :  ध्वनिफीत :




सारांश : श्लोक 161 - 165.

मी म्हणजे माझे सध्याचे अस्तित्व, म्हणजेच माझे शरीर. या देहाचे सर्व संबंधी म्हणजेच माझा प्रपंच आणि

हे सर्व वास्तव / सत्य , असा आपला दृढ विश्वास अगदी बालपणापासून बनलेला असतो.  

अहंकाराचे विश्लेषण सुरू आहे , त्यापासून होणारे अनेक दुःख परिणाम समजावून सांगत आहेत. अहंकार

विसर्जन हे प्रमुख साध्य अध्यात्म साधनेत साधावे. अहंता-मुक्त श्रेष्ठ व्यक्ती अनुकूल/प्रतिकूल परिस्थितीत

सुखी रहातात हे पाहून आपण आपली अहंता कमी करण्याच्या प्रयत्नात राहिले पाहिजे. देहबुद्धी आपल्या

अंतरी स्थिर झाली तर काय होते आणि आत्मबुद्धीकडे आपली प्रगती घडली तर काय होते हे लक्षात घेऊन

आपण आपल्या भल्यासाठी सज्जनांच्या संगतीत रहावे असे समर्थ पुनःपुन्हा सांगत आहेत. 

अहंकार अज्ञानी पुरुषाच्या मागे विशेषेकरून लागत नाही; परंतु ज्ञानवान पुरुषाचे नरडे धरतो. आणि त्याला नाना

 प्रकारच्या संकटात गोते खावयास लावतो. ज्ञान मार्गात अहंकार मोठा धोका, म्हणून तपाची जोड अनिवार्य.


ज्ञान आधारित कर्म करणे आणि कर्मात अहंकार रहित संपूर्ण समर्पण वृत्ती ठेवणे हे सोपे नाही. दृश्य जगाला

सोडून त्या पल्याड असलेल्या भगवन्ताला शरण जाणे हि आत्मबुद्धी  असते. आपले वासनेने लडबडलेले

अंतःकरण संतांच्या द्वारी सेवाकार्यात सतत ठेवले तर ते शुद्ध होऊ लागते. “मी” ला अहंकाराला जर

सम्पवायचं नसेल तर अध्यात्म म्हणजे फक्त शब्दांचा  काथ्याकूट असच म्हणावं लागेल. 


अध्यात्म साधनेत प्रगती होण्यासाठी काय करावे हे अत्यन्त तर्कनिष्ठ पद्धतीने सांगणाऱ्या या श्लोकांचे विवेचन

 आपणास नक्की   उपयुक्त वाटेल हा विश्वास आहे. जरूर काळजीपूर्वक ऐका आणि  योग्य  वाटल्यास 

जरूर like आणि share करा ही  विनंती. 


 विजय रा. जोशी. 




Sunday, August 14, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 156 ते 160 :  ध्वनिफीत :




सारांश : श्लोक १५६ - १६०.

परमात्मा पहातांना पहाणारा त्यात मिसळून गेला पाहिजे. ती स्थिती येण्यासाठी “मी” चे अस्तित्व पूर्णपणे

संपून ते अनंतात विलीन झाले पाहिजे. 

शब्द - ज्ञानाचे अध्यात्म शास्त्राचे मार्ग अनेक असू शकतील. पण स्वतःला विवेकाने जो मार्ग

समजला त्यावर निष्ठा ठेवून जो सतत पुढे जात राहील, कर्मशुध्दी करत मार्गक्रमण सुरु राहील, समर्पण

भावाने , अलिप्तता राखत , अहंतेचे विसर्जन करीत, ध्येय प्राप्तीसाठी  तळमळीने प्रयत्न करीत राहील, 

तो साधक.   

‘अहंता’ अडथळे निर्माण करते. अहंकारी वागणे मानवास आत्मिक उन्नतीपासून, परमार्थापासून दूर ठेवते.

मी आत्मा आहे, हि जाणीव मनी, वर्तनी मुरणे म्हणजे आत्मज्ञान होय. फक्त बुद्धीने कळणे उपयुक्त नाही.

सहज वर्तन तसे घडायला हवे. जाणीव हि एकवेळ शून्यरूप तरी  व्हायला हवी किंवा विश्वरूप एवढी विशाल

व्हायला हवी, तर आंतरिची साधना सफल होईल. म्हणून सतत अनुसंधान राखावे लागते आणि या

अनुसंधानाची अंतर्मनातील लागवड साधकास फार सावधपणे करावी  लागते.  

आंतरिक उन्नती साधण्यास काय करावे , काय टाळावे याचे मार्गदर्शन श्री समर्थ करीत आहेत. 

साधना म्हणजे काय आणि त्यामार्गातील विविध टप्पे समजावून सांगणारे हे विवेचन आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी

 खूप माहितीपूर्ण असून आपल्यास ते नक्की उपयुक्त वाटेल असा विश्वास आहे. 

जरूर ऐका आणि योग्य वाटल्यास like आणि share करा ही विनंती. 


विजय रा. जोशी. 




Saturday, August 6, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 151 ते 155 :  ध्वनिफीत :




सारांश - श्लोक १५१ - १५५. 

सत-तत्वाचा शोध घायचा आहे. आणि ते सत-तत्व आपल्यातच आहे.  विनासायास फायदा देणारे इन्व्हेस्टमेंट

ऑप्शन्स, आपण व्यवहारात शोधत रहातो. पण हि सवय परमार्थात खूप घातक ठरते. परमार्थात तितिक्षा

लागते, दीर्घ प्रयत्न लागतात . फक्त भोग किंवा त्यागाने अहंकार होईल पण समाधान होणार नाही. 

सु ख ---- समाधान  ---- शांती. ... ही प्रगत जीवनातील  चढत्या क्रमांची  उद्दिष्टे.  व्यवहारात आपण पहातो

की सुख संपल्यानंतर दुःख येते, समाधान अधिक  काळ टिकते. शांती जीवनात स्थिर  झाली तर मग काही

मिळवायचेच रहात नाही. सुख हे समाधानकारक वाटले पाहिजे आणि शाश्वत समाधानातून माणूस शांतीत

स्थिर झाला पाहिजे. 

संपन्नता (विविध सुख साधने) आणि प्रसन्नता या दोन चाकावर समाधानाचा रथ चालतो. माणूस संपन्नता

प्राप्तीसाठी जरूर प्रयत्न करेल. पण त्या संपन्नता प्राप्तीत काही अपेक्षा असेल तर प्रसन्नता काही काळ

मिळेल पण ती चिरकाल टिकणार नाही.  म्हणून निरपेक्ष कर्म करावे असे रामदास स्वामी सांगत आहेत. 

ज्ञान चक्षु विकसित होण्यासाठी संत सद्गुरूंनी आचारलेला मार्ग हाच एकमेव उपाय आहे.

पण त्या मार्गावर जर कायम स्थिर होता आलं नाही तर मात्र हे परम सत्य मनुष्य ओळखू शकत नाही . 

मन आणि ब्रह्म यांचा संबंध काय, तो जाणण्याचे महत्व काय  आणि  मनाला ब्रह्मज्ञान होण्यासाठी काय

प्रयत्न करायला हवेत  याचे मार्गदर्शन समर्थ या श्लोकांच्या माध्यमातून करीत आहेत. 

अध्यात्म आणि व्यवहार याचे सविस्तर विश्लेषण आपल्यास नक्कीच उपयुक्त वाटेल. जरूर ऎका 

आणि आवडल्यास share करा.  धन्यवाद. 


  विजय रा. जोशी . 



Thursday, July 14, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 146 ते 150 :  ध्वनिफीत.







सारांश - श्लोक १४६ - १५०. 


मनुष्य जीवनात जे  शोधायचे आहे ते  अनंत, शाश्वत तत्व आहे. 

मना ! त्याचा शोध घे. 

या मनुष्य जीवनाचा उपयोग करून जे सत्य आहे ते शोधून काढ. त्याची भेट घेण्यात खरं  तर जीवनाचे कल्याण

आहे.  आणि तेच करायला समर्थ आपल्याला सांगत आहेत. आपण आपल्या देहापुरते संकुचित झाले

आहोत, मर्यादित झालो आहोत. आपली दृष्टी, भाव विकसित केला पाहिजे.  देहाचा त्याग नको, 

पण देह म्हणजे मी,  हि देहबुद्धी कमी होत गेली पाहिजे.

विश्वातील सर्व संबंध त्या एका सर्व-व्यापी महाकारणाच्या सत्तेखाली वावरतात. ते  कारण कशाचेही कार्य

असत नाही. ते सर्व कारणांचे कारण असून स्वयंभू असते. स्वयंभू म्हणजे ते स्वतःच स्वतःचे कारण असते.

स्वतः कशाचेही कारण नसलेल्या या आदिकारणासच  ईश्वर म्हणतात.

जे सर्व सगुण जे आहे ते निराकारातून आलेले आहे. जडाची निर्मिती अजड अशा ऊर्जेतून झाली आहे.

त्या निराकाराचा जाणण्यासाठी साधकाला  स्वरूपात विलीन व्हायला लागते. स्व हा शून्यरूप

करून तो महाशुन्यात विसर्जित करावा लागतो. किंवा तो अति-विशाल ब्रह्मव्यापी व्हावा लागतो. यालाच

मनोलय म्हणतात, अहंकार मुक्ती म्हणतात. कर्म शुद्धी म्हणतात. 

अध्यात्मात हा व्यक्तिगत अनुभव साधनेने सिद्ध , प्रगत  होत जातो. तो विज्ञानाच्या प्रयोग शाळेत सिद्ध

करणे अजून तरी शक्य झालेले नाही. 

(पण अंतिम सत्या पर्येंत पोहोचावयाचे असेल तर विज्ञानाला आवश्यक

ते सर्व प्रयत्न करावेच लागतील, किंवा स्व-मर्यादा मान्य कराव्या लागतील).            श्रीराम !!


विजय रा. जोशी. 




Thursday, July 7, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 141 ते 145 :  ध्वनिफीत.





सारांश श्लोक १४१ ते १४५. 

समर्थ एखाद्या खऱ्या शिक्षका प्रमाणे साधकांना साधनेतील अति अवघड मार्गाची स्पष्ट जाणीव करून देत आहेत. आणि त्यासाठी मनोभूमिका तयार होण्यास मदत करीत आहेत. या मनुष्यजन्माचे खरे प्रबोधन साधायचे  असेल तर सद्गुरुकृपे शिवाय अन्य पर्याय नाही. जो पर्येंत आपली अहंता, अहंकार आहे, तेथ पर्येंत गुरुकृपा घडत नाही. आपण सद्गुरुंकडे का जातो, याचा आपण विचार केला आहे का ?भौतिक यशासाठी, काही यश प्राप्तीसाठी का स्वतःला जाणण्यासाठी ? सत्य शोधनासाठी ? अवघड प्रश्न, आणि अत्यंत अवघड काम म्हणजे याचे प्रामाणिक उत्तर शोधणे. 

आपल्याला अध्यात्म-अभ्यास खरच करायचा आहे का? बुद्धी, मनाने घेतलेले ज्ञान यांनी खूप मोठे शोध लागतील, पण आत्मज्ञान होणार नाही. त्यासाठी मन, बुद्धी, चित्त अहंकार. (अंतःकरण) शुद्धी घडणे अवश्य आहे. तू कशाला जन्माला आला आहेस असा प्रश्न विचारला तर अनेक लोकांची अनेक वेगळी उत्तरे देतील. पण मी अंतिम सत्य शोधण्यासाठी जन्म घेतला असे उत्तर बहुधा कोणीच देणार नाही. 

संतांनी सोपी व्याख्या केली - मी खरा कोण हे जाणणे म्हणजे ज्ञान, बाकीचे सर्व अज्ञान. 

स्वामीजी सांगतात ‘ द्याल तर सर्व मिळेल पण फक्त स्वतःजवळच राखाल तर राख होईल’. ‘निरपेक्षपणे द्यायची सवय ठेवा, त्यागाची सवय लावून घ्या. त्यातूनच पुढे यथावकाश षड्विकार, अहंकार मुक्ती घडे आणि मग विद्येचा मार्ग, सत्यशोधनाचा मार्ग प्रशस्त होत राहील. 

जीवन हेतूचे मूलभूत विशलेषण करणारे हे श्लोक आपल्याला नक्कीच शुभ-संदेश देतील. अवश्य ऐका, आवडल्यास like आणि share करा.


विजय रा. जोशी. 




Monday, June 27, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 136 ते 140 :  ध्वनिफीत.




सारांश श्लोक  136 -140. 

ब्रह्माण्डातील जीवन भयाने ग्रासलं आहे. अस्तित्व-नाशाचे भय. जेथपर्येत ‘मी ’ आणि ‘तू’ अशी भूमिका आहे

तेथपर्येंत भय आहे, पण ‘मैं’ नही ‘तुही’ सही. अशी मनाची पक्की धारणा होते, तेव्हा हे भय नाहीसे होते.

अनेक संत सद्गुरू कितीतरी पद्धतीने हे सनातन सत्य आपल्या समोर मांडत आहेत. त्या त्या वेळेच्या

आवश्यकतेनुसार प्रबोधन करीत आहेत. संत हे सांगतात पण आपल्यला ते कळत नाही, कळले तरी वळत

नाही. देहबुद्धी सरत नाही, अहंकार सुटत नाही. 

आपण स्वतः, स्व -स्वरूपापासून दूर का जातो, याची कारण मीमांसा समर्थ करत आहेत. एकीकडे धोके

दाखवीत आहेत, एकीकडे सोपे उपाय सांगत आहेत. आपल्या जीवनाचे प्रयोजन (purpose) आपण विसरलेले

आहोत. बहिर्मुख वृत्ती आपला घात करत आहे, आपल्याला अंतर्मुख बनून आपल्या संकल्पाने अंतर्यामी शोध

घ्यायला सांगत आहेत. मायेचे भ्रम सोडून खऱ्या वास्तवाकडे जायला सांगत आहेत.  

माणसाची वृत्ती आणि त्रिगुण याचा संबंध जवळचा आहे. गुणातीत होणे म्हणजे मूळ रूपात जाणे हि साधना

अत्यंत प्रखर निश्चयाने आणि दीर्घ सातत्याने करणे हि दिशा आहे आणि या मानवी जन्मातच झाले तर ते

शक्य आहे. त्यासाठी ‘गुणावेगळी वृत्ति’ घडायला हवी. पण अज्ञानी माणसाकडून ते घडत नाही, हे वास्तव

सांगून समर्थ आपल्याला सावध करीत आहोत. “जुने ठेवणे मीपणे आकळेना”. या चरणांच्या श्लोकाच्या

माध्यमातून आत्मज्ञानाचे महत्व, प्राप्तीचे मार्ग आणि ते झाल्याने अंतरंगात होणारी क्रान्ति याबद्दल 

माहिती सांगितली आहे.  

हे सर्व जरूर ऐका , आणि योग्य वाटल्यास like आणि share करा. 


विजय रा जोशी 




Friday, June 17, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 131 ते 135 :  ध्वनिफीत.



सारांश श्लोक  131-135. 

संत संगतीमुळे, सत्संगतीमुळे  जे सर्वोत्कृष्ठ फळ आपल्याला मिळू शकेल, त्याचे वर्णन या  श्लोकांत आहे.

रामाच्या चारित्र्याच्या संदेश, आणि त्यातून विविध संकटे, आपत्तीत स्वतः श्रीरामाने निर्माण केलेले वर्तन

आदर्श यांचा अभ्यास , त्यावर चिंतन म्हणजेच “जानकीनायकाचा विवेकू” धारण करायला समर्थ सांगत

आहेत. आणि तो धारण करणे हे अवघड काम ज्याने साध्य होऊ शकेल तो उपाय म्हणजे “संत संगती,

सत्संगती” हाच आहे. असेही आपल्याला समजावत आहेत.  

संत म्हणजे कोण ? संतांचे १३ प्रमुख गुण :

हरिभक्त, विरक्ती, विज्ञानराशी (ज्ञानी),  निश्चयी, निगर्वी, वीतरागी (शाश्वत वैराग्य) , क्षमाशील, शांतीस्वरूप,

अभोगी, दयाघन, लोभ नाही, क्षोभ नाही, दैन्यवाणा नसलेला . 

आपण आत्मपरीक्षण करून आपल्यातील सद्गुण आणि दुर्गुण जर समजून घेतले तर कुठल्या क्षेत्रात आपली

प्रगती करणे आवश्यक आहे याचा बोध होईल आणि मग आपल्याला आपली सुधारणा करण्याचा उपाय दिसू

लागेल. त्यासाठी गुणी, बोध असलेल्या सज्जनांची संगती आपण केली पाहिजे. हा उपाय दोन्ही ठिकाणी

म्हणजे व्यवहार आणि अध्यात्मिक क्षेत्रात करण्यासारखा आहे. मनाच्या श्लोकांचे उद्दिष्ट आपले अंतरंग

सुधारणे आहे, आपली अध्यात्मिक उन्नती करण्याचा मार्ग दाखविणे हे आहे. आणि त्यासाठी काय करावे याचे

मार्गदर्शन केलेले आहे.  याचा जर आपण प्रामाणिक पणे आपल्या जीवनात उपयोग केला तर अध्यात्मिक

प्रगती बरोबर आपले भौतिक जीवनही अधिक समाधानी आणि शांत होते. 

स्वतःची आणि आपल्या पुढील पिढीची सर्वांगीण मानसिकता घडविण्यास मदत करू शकणारे , 

हे समर्थ विचार सर्वानी ऐकावे असे आहेत. 

कृपया ऐका , आवडल्यास like आणि share करा, ही विनंती. 


विजय रा. जोशी. 

 


Monday, June 13, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 126 ते 130 :  ध्वनिफीत.





सारांश श्लोक  १२६-१३०

अनेक रूपांनी प्रभू आपल्या भोवती घुटमळत असतात. पण आपण त्याला ओळखत नाही, हे आपले दुर्दैव आहे. विष्णूचे दशावतार हे तर पूर्ण अवतार आहेत पण प्रत्येक जीव हा देखील भगवन्ताचा अंश रूप आहे. 

श्लोक १२७ - १३५.  यात सत्संगतीचे महत्व आणि त्याने होणारे लाभ समर्थ आपल्याला समजवून सांगत आहेत.

तू मनाच्या, मनातील वासनांच्या अधीन न होता, मनापासून अलिप्त होण्याचा प्रयत्न कर, आणि हे साध्य होण्यासाठी तुला एकच गोष्ट उपयुक्त आहे, ती म्हणजे, सत्कृत्य, संत संगती, सदाचाराचे पालन. आपला संकल्प बहुतेक वेळा नश्वर गोष्टींबद्दल असतो. तर चिरंतन शांती, सत्याचे ज्ञान प्राप्त करण्याचा आणि त्या स्थितीत स्थिर रहाण्याचा संकल्प असावा. संत सांगत असतात कि रिकामा वेळ मिळाला तर नामस्मरण करावे, सारासार विवेकाच्या चिंतनात डुबून जावे, चांगल्या ग्रंथांचा, संत चरित्रांचा, थोर व्यक्तींच्या जीवनाचा अभ्यास करावा.

मनाच्या श्लोकांचे उद्दिष्ट आपले अंतरंग सुधारणे आहे, आपली अध्यात्मिक उन्नती करण्याचा मार्ग दाखविणे हे आहे. आणि त्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन केलेले आहे. याचा जर आपण प्रामाणिक पणे आपल्या जीवनात उपयोग केला तर अध्यात्मिक प्रगती बरोबर आपले भौतिक जीवनही अधिक समाधानी आणि शांत होते. 

कृपया विवेचन ऐका , आवडल्यास like , share करा. 


विजय रा. जोशी. 




Thursday, June 2, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 121 ते 125 : ध्वनिफीत.





सारांश, श्लोक - १२१ - १२५. 

समर्थ  भगवंत-लीला आणि त्याचे भगवंत भक्तांना आलेले अनेक अनुभव हे पौराणिक कथांच्या माध्यमातून 

सांगत आहेत. आणि त्यातून खऱ्या भक्तांचा देवाला कसा अभिमान, प्रेम वाटते. 

हे समर्थ आपल्या मनावत ठसवत आहेत….. डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत यातील जीव-विकास 

आणि दशावतारातील श्री विष्णूचे अवतारक्रम यात बरेच साम्य आढळते. 

सारांशात पाहता मत्स्य, कूर्म व वराह हे पहिले तीन अवतार माणूस व पशू यांच्यामधील समान अशा प्रवृत्ती

दाखवतात. नरसिंह, वामन व परशुराम अवतारात मानव समूहाच्या प्रवृत्ती आढळतात. 

राम, कृष्ण व बुद्ध अवतारात माणसाच्या व्यक्तीगत उत्थानाचे नमूने दिसतात. कल्की अवतार कधी झालाच

तर तो त्याच पठडीतला होणार अशी अपेक्षा आहे. हे सर्व अवतार कालातीत आहेत. 

देव भक्ताकडे कधीहि दुर्लक्ष करत नाही, त्याची निराशा होऊ देत नाही कारण सच्च्या भक्ताचा त्याला 

नेहमी अभिमान असतो. हे समर्थ वारंवार सांगतात आणि त्यासाठी ते दाखले देखील देतात. 

नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, कृष्ण, गौतम बुद्ध,आणि पुढे येणारा कल्की या अवतारांच्या कथांच्या

आधारे रामदास स्वामी सन्मार्गी स्थिर होण्यासाठी काय करावे त्याचे सर्व तपशीलवार वर्णन 

श्लोकांच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवत आहेत. 

मनाच्या उत्क्रांतीचे हे वर्णन आणि समर्थांचा उपदेश जरूर ऐका आणि आवडल्यास इतरांना ऐकायला सांगा. 


विजय रा. जोशी. 




Thursday, May 26, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 116 ते 120 : ध्वनिफीत.




श्लोक ११६ - १२० सारांश. 

या पूर्वी हि बऱ्याच वेळा समर्थांनी आपल्या एखाद्या विधानावर खास जोर द्यायचा या उद्देशाने  त्या विधानावर

 पुन्हापुन्हा श्लोकाच्या शेवटच्या चरणात प्रतिपादन केले होते. 

……'.नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी' . 

हा चरण श्लोक क्रमांक ११६ पासून ते क्रमांक १२५ पर्यंत असा दहा वेळा आला आहे.

देव भक्ताकडे कधीहि दुर्लक्ष करत नाही, त्याची निराशा होऊ देत नाही कारण सच्च्या भक्ताचा  त्याला नेहमी

अभिमान असतो. हे समर्थ वारंवार सांगतात आणि त्यासाठी ते दाखले देखील देतात.

अंबरीष ऋषी, उपमन्यू , ध्रुवबाळ, गजेंद्र हत्ती, अजामेळ, या पौराणिक कथा तसेच विष्णू दशावतारातील

मत्स्य, कूर्म आणि वराह या अवतारांच्या कथा अशा माध्यमातून भगवन्त भक्तांची कशी काळजी घेतात,

विश्व रक्षणासाठी कसे धावून येतात ते समर्थ या ५ श्लोकात समजावून सांगत आहेत. 

या कथा सांगण्यात संदेश एकच, तो म्हणजे भगवंता साठी अशक्य काही नाही. आपले कर्तव्य पूर्ण करा

आणि मग सर्व सद्गुरुंवर सोडा. चिंता सोडा आणि पुढील कार्यास लागा. 

आज सुद्धा असे घडू शकते, घडते पण तो अनुभव घेण्यासाठी आपली साधना तीव्र, तीव्र-तम करायला हवी.

निसर्गाचे नियम, प्रकृतीचे नियम समजून घेऊन आपण या नियमांना आपल्या रोजच्या वर्तनात न्याय

द्यायला हवा. हे  देखील या विवेचनात आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

कृपया एका आणि आवडल्यास  like , share  करा. 

धन्यवाद. 


विजय रा. जोशी 

Wednesday, May 11, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 111 ते 115 : ध्वनिफीत.





सारांश श्लोक 111 ते 115 . 


अनेकदा आपले खरी हीत साधणारी मंडळी आपल्याला आवडत नाहीत. आपली आई, आणि परमार्थातील आपले गुरु हे कटू पण सत्य उत्तम हेतूने आपल्याला सांगत असतात. 

काय मिळवायचे ते शोधले पाहिजे. तसेच काय मिळू शकते पण न घेता ते सोडले पाहिजे याचाही सतर्क राहून शोध घेतला पाहिजे. सर्व गोष्टी योग्य संवादातून मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आत्महित जपणाऱ्या मूक संवादाचे, ‘हे  हृदयीचे ते हृदयी पोहोचणाऱ्या’ हितकारी  संवादाचे महत्व या श्लोकांच्या माध्यमातून आपण समजून घेत आहोत. वाद संपेल , आपल्याला नेमके ज्ञान होईल, खरे ज्ञान होईल, अहितकारक टळेल, असा संवाद हितकारी असतो. 

माणसाच्या पंडितत्वाचा , विद्वत्तेचा, बुध्दीमत्वाचा त्याला त्याच्या अध्यात्मिक प्रगतीसाठी काही उपयोग होत नाही, किंबहुना त्याचा अडथळाच  होतो. परमार्थ क्षेत्रातील मोठेपणा मोजण्याचे निकष वेगळे आहेत. येथे लौकिक विद्येचे महत्व कमी आहे असे विधान नाही. पण त्या पदव्यांमुळे येणार अहंकार मात्र अध्यात्म क्षेत्रात पुढे नेणारा नाही एवढेच. आपल्या साधकत्वाचा, आपल्या सत्संगाचा देखील कधीतरी कोणाला अहंकार होतो. ही देखील अहंता तेवढीच अनावश्यक  आणि अनर्थकारक असते. 

वाद समाप्त करणारा संवाद , जेथून काही तत्व हाती येईल, हितकारी घडू शकेल असा संवाद जरूर करावा. आपली जगाकडे पहाण्याची दृष्टी भोगाची असते, ती ईशभावाची करण्याचा प्रयत्न करावा,

हे सर्व साध्य होण्यासाठी सुसंवाद कसा असावा विसंवाद कसा टाळावा या बद्दल मार्गदर्शन करणारे हे ज्ञान , लौकिक व्यवहारात पण तेवढेच उपयुक्त आहे.                          ‘श्रीराम !!’


विजय रा. जोशी. 



Thursday, April 28, 2022

मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 106 ते 110 : ध्वनिफीत.







सारांश श्लोक १०६ ते ११०.

समर्थ समाधानाच्या प्राप्तीचा राजमार्ग समजावून सांगत आहेत. त्यासाठी ३ मार्ग .

१. देह शुद्धी - स्नान/संध्या आदी रोजची आन्हिके. 
2. मनशुद्धी - त्यासाठी प्रवास स्वार्था कडून निस्वार्थ कडे. 
3. अंतःकरण शुद्धी / चित्त शुद्धी - तो प्रवास दीर्घ आहे, संयमाववर, निश्चयावर आधारित आहे, 

दीर्घ कष्ट लागतात. प्रगती हळूहळू होते. 
व्यवहारिक शिक्षणाबरोबर नैतिकतेचे शिक्षण देखील कसोशीने, अगदी योग्यवेळी बालकाच्या आयष्यात 
योग्य काळी सुरु झाले पाहिजे. 

क्रोध अनावश्यक नाही पण तो ताब्यात पाहिजे आणि तो चांगल्या  हेतूसाठी असावा. संगत हि
सज्जनांच्या बरोबर असावी. स्वतःला समाधानाने जगायचे असेल तर,  जीवन उन्नत करायचे असेल 
तर जाणीवपूर्वक कुसंगती टाळून सत्संगती पत्करली पाहिजे.

आपण जीवनात अनेक लोकांशी विविध विषयांवर बोलतो, चर्चा  करतो ते  अटळ आहे ,पण त्यात
फक्त आवश्यक तेवढाच वेळ घालवावा. संत / सज्जनांशी जो संवाद होतो, तो सुख संवाद होतो. 
त्यांचा हेतू हा आपल्याला खऱ्या सत्याच्या मार्गाला नेण्याचा असतो. समर्थ आपण काय करावे, 
काय टाळावे हे नीट समजावून सांगत आहेत.  हे सर्व ज्ञान परमार्थासाठी तर महत्वाचे आहे, 
पण व्यवहारी जीवनात देखील खूप उपयुक्त आहे.

या ऑडीओच्या माध्यमातून याचे सविस्तर विवरण आपल्याला नक्कीच उपयुक्त वाटेल. 
जरूर ऐका  आणि योग्य वाटल्यास इतरांना ऐकण्याची शिफारस करा. 



विजय रा. जोशी. 



Sunday, April 17, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 101 ते 105 : ध्वनिफीत.




सारांश श्लोक 101 ते  105


नामस्मरण जेथे चालले आहे तेथील वातावरण तरंग चांगल्यास पोषक असतात. अति आदरे, दृढ

विश्वासाने नामस्मरण करावे, त्याने अंतर्बाहय चांगल्या विचार लहरी निर्माण होतील, सत्कर्म करण्याची

प्रेरणा होत राहील ,  स्वभाव दोष कमी होतील. अंतर्बाहय शुद्धी प्रक्रिया मार्गी लागेल. 

सदाचरणाचा अभ्यास. 

परमार्थ मार्गी लागण्यासाठी , स्थिर होण्यासाठी जे सद्गुण आपल्या अंगी असावे लागतात, प्रयत्नाने

धारण करावे लागतात त्याचे वर्णन समर्थ करत आहेत.  “अती लीनता” हवी आणि ती स्वाभाविक 

झाली पाहिजे, रामचरित्राच्या अभ्यासातून , थोर व्यक्तींच्या चरित्र प्रसंगांवरून , संत चरित्रातून अशी

तितिक्षेची, सहनशीलतेची , अति लीनतेची अनेक उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. 

साधने मधील येणारे अडथळे विवेकाच्या साहाय्याने कसे दूर करावे याचे मार्गदर्शन आहे. कृतीच शास्त्र

परमार्थात सार आहे. त्या कृती-सातत्याच महत्व सांगत आहेत. विवेक आणि विचार यातील

फरक….. अध्यात्म कर्म, क्रिया सोडायला, टाकायला सांगत नाहीत, तर विवेकाने कर्म, क्रिया पालटायला,

सुधारायला सांगते. या बद्दलची माहिती सोप्या शब्दात या श्लोकांच्या माध्यमातून समजून घायचा

प्रयत्न आपण या  विवेचनातून करू या. 


विजय रा. जोशी. 


Wednesday, March 9, 2022

मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 96 ते 100 : ध्वनिफीत.




सारांश श्लोक ९६ ते  १००

तत्व सांगणाऱ्या पुराण कथा आयुष्याचे धडे देतात. भक्त प्रह्लादाची भक्ती-कथा हि युगानुयुगे 

एखाद्या दीपस्तंभासारखी मार्गदर्शन करीत आहे. अहंकारामुळे  भगवंत स्मरण रहात नाही, त्याचे महत्व

वाटत नाही. आणि मग वाढत जाणारा अहंकार आपल्याला नामस्मरण भक्ती पासून दूर घेऊन जातो.

जीवन दैन्यवाणे होते. रामदास स्वामी आपल्याला या वास्तवाची जाणीव करून देत आहेत 

आणि वेळीच नामस्मरणाच्या सन्मार्गने जायचे प्रेमाने सुचवत आहेत. राम-नामाने पाषाण तरले 

अशी कथा सांगतात. तसे मानवी जड बुद्धीचे जीवन (मानवी पाषण), देखील सत्कर्माने, भगवंत भक्तीने

तरुन जातात. पण मनात विकल्प, संशय असला तर हे घडत नाही, म्हणून मनापासून, कर्तव्य बुद्धीने,

श्रद्धेने, नम्रतेने, आणि सातत्याने साधना सुरु ठेवावी. 

जेव्हा आपण काशी सारख्या कोणत्याही मन पावन करणाऱ्या ठिकाणी संवेदनशील भक्ती- भावनेने

वास्तव्य करू त्यावेळी आपल्याला त्याची महती कळेल, आपली श्रद्धा आपल्यला आगळे समाधान देईल. 

कधी ध्यान, कधी कर्म, कधी ज्ञानमार्ग, कधी भक्तिमार्ग… आपण सर्व करण्याचा प्रयत्न करतो, पण

काहीही “यथासांग” होत नाही. काम कुठले ही आपण पत्करू शकतो , पण ते एकाग्रतेने, समर्पण वृत्तीने

आणि अलिप्ततेने करायला हवे अशी संतांची, ज्ञानी माणसाची भूमिका असते. ती आपणसुद्धा कशी

साधावी आणि त्यासाठी अखंड नामस्मरण कसे उपयुक्त आहे 

सर्वांचे आयुष्य सन्मार्गी लावणारे हे श्लोक मौल्यवान माहिती देत आहेत. विवेचन जरूर एका, 

आणि योग्य वाटल्यास इतरांना ऐकायला सांगा. 



विजय रा. जोशी 




Friday, February 25, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 91 ते 95 : ध्वनिफीत.



सारांश , श्लोक 91 ते 95. 

चांगल्या स्थितीत असताना देवाचे स्मरण ठेवा. संकट आले, आजारपण आले, फक्त अशा वेळी देवाचा

धावा उपयोगी होईलच असं नाही. 

भगवंत म्हणजे नेमकं काय ? त्या पर्येंत पोहोचण्यासाठी नेमके काय करावं ?       

हे व्यक्तीनिहाय स्वतंत्र असू शकते.  देव वर्णन हे नेमके नाही कारण तो अवर्णनीय आहे. 

आपले सर्व दोष , जन्म जन्मांतरीचे दोष  जर घालवायचे असतील तर मनःपूर्वक केलेली देव भक्ती घडली पाहिजे. 

भगवन्त जीवाची सर्व व्यवस्था करीत असतो. 

व्यवहारात अनेक गोष्टी निभवायला लागतात, त्यामध्ये कितीतरी वेळा आपल्या कडून चुकीचे गैर असे वर्तन होते,

वाणी अपवित्र होते.  

पवित्र भाषेने, नामस्मरणाने वाणी पवित्र होते….  हळूहळू पवित्र होते. वर्तन शुद्ध होऊ लागते.

जर एखादा अत्यंत दुर्वर्तनीसुद्धा अनन्यभावाने (म्हणजे सर्व पाप-कार्यें सोडून देऊन ) 

माझा भक्त होऊन मला भजेल, तर तो सज्जनच समजावा.

राम नामाने, नामस्मरणाने, सत्कर्माने सर्व कल्याण घडेल. 

नामस्मरणाचे महत्व सांगणारे हे विवेचन जरूर ऐका , आणि आवडल्यास इतरांना ऐकायलाही सांगा. 



विजय रा. जोशी. 







Wednesday, February 16, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 86 ते 90 : ध्वनिफीत






सारांश , श्लोक ८६ ते ९०. 


मूलभूत क्रांती होऊन व्यक्तिमत्व सर्वांगीण पद्धतीने विकसित होण्याची प्रक्रिया समर्थ आपल्याला सांगत आहेत. काम, वासना प्रत्येकाला जीव-धारणेसाठी आवश्यक आहेत. त्या जर अमर्याद असल्या तर त्यांचा त्रास होतो. पण रामभक्ताला हा “अति पणाचा” त्रास होत नाही. 

नामस्मरणाचे कार्य आणि उद्दिष्ट “चित्त-शुद्धी” हेच आहे. चान्गले, साजिरे, सुंदर सोपे, बिन पैशाचे आणि आपल्याला अत्यंत लाभदायक नाम आहे. पण आपण त्याचे महत्व पूर्णपणे ओळखत नाही. 

भोजनाच्या वेळी आणि समूहात, एकत्र असताना, दोन्ही वेळा आपल्याला रामाचा उच्चार, नामघोष करावा असं सांगितलंय. इथे आदराने, श्रद्धेने, म्हणायला सांगितले आहे.

अन्न  तुमच्या ताटात येण्यापूर्वी किती लोकांचा हातभार लागला असतो, त्यांच्याबद्दल, त्यांच्या मध्ये असलेल्या त्या परम तत्वाचे स्मरण , चिंतन म्हणजेच हरि-चिंतन. ते करीत असता अत्यंत समाधानाने जर भोजन केले तर त्याचा वैयक्तिक आणि सामुदायिक परिणाम हा उत्तमच असणार. 

सध्याच्या जीवनक्रमात जे आपल्या लक्षात कधीच येत नाही,  ते समजवण्याचा हा श्रीसमर्थांचा वडिलांच्या मायेने प्रयत्न आहे. 

या पाठातील संदेश आपण जरूर ऐका आणि आवडल्यास इतरांना ऐकायची शिफारस करा, ही  विनंती !



विजय रा. जोशी. 






Sunday, February 6, 2022

मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 81 ते 85 : ध्वनिफीत



सारांश श्लोक 81 ते 85 . 


मत्सर घात यावर समर्थांचा भर आहे, कारण मत्सर हा मानवी जीवनात फार मोठा धोका आहे.

मत्सराच्या उदभवामुळे माणसाचे जीवन भकास, नष्ट, अतीव दुखी होते. ... 

अतिशय नकारी, भयंकर, विनाश-कारक भावना म्हणजे द्वेष आणि मत्सर.

हे मना ! तू मत्सरात शक्ती घालवून नामाला विसरू नकोस, स्वतःचा घात करू नको.

मत्सरा सारख्या नकारी, भयंकर भावना नाहीशा करण्याची शक्ती ही अखंड नाम-स्मरणात आहे.

आणि या नाम-साधने बरोबर दुसऱ्या कुठल्याही साधनेची सोपेपणात  तुलना होऊ शकत नाही. 

रामनामाने प्राप्त होणारी स्थिती हि ‘विश्राम’ स्थिती आहे. आणि ही  विश्राम स्थिती प्रत्येकास हवी

असते. जेव्हा आपण संपूर्णपणे साधना कार्यास समर्पित राहू तेव्हा आपली स्व-शुद्धी प्रक्रिया पुढे जात

राहून अंतिमतः आपल्याला “खरा विश्राम” लाभेल.

नामस्मरणाच्या जोडीला अखंड साधनेतून, सत्कर्मातून जेव्हा व्यक्ती सातत्य पूर्ण कार्य करीत राहील, 

तेव्हा आत्म-शुद्धी, सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडतो. 

समस्त उपायांमध्ये “नाम स्मरण” हे सार आहे. 

भगवंत-स्वरूप प्राप्त झालेले संत, सद्गुरू आपल्याला हे मार्गदर्शन उपलब्ध करून देतात , 

त्याचे महत्व आपण ध्यानात ठेवले पाहिजे. 

सध्याच्या तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये नाम-स्मरणाचे महत्व अधोरेखित करणारे हे विवेचन जरूर ऎका  

आणि आवडल्यास इतरांना ऐकण्याची शिफारस करा. 


विजय रा. जोशी. 







Wednesday, January 26, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


प्रभाते मनी राम चिंतीत जावा”॥  कृतज्ञता दिनानिमित्त विशेष पाठ




“प्रभाते मनी राम चिंतीत जावा”॥  श्लोक सारांश. 

श्लोक ६७ - पराक्रमी श्रीराम भक्ताचे संकटापासून रक्षण करतो. 

६८ -  ज्याच्या समोर प्रलय काळ हि थरथरतो. त्याचे नाम घ्यावे. गुण घ्यावे. 

६९ -   माणसाने भक्तिमार्गावर असतांना कधीही अनीती, द्वेष-मत्सर करू नये. 

७० -   अहंकार आणि आळस त्यागून सातत्याने नाम-स्मरण करावे. 

७१ -    नामस्मरणाने दोष कमी होतात, पुण्य संचय घडतो. 

७२ -   खर्च आणि कष्ट नसलेले नामस्मरण करीत असता संसारापासून  शक्य तेवढे अलिप्त असावे. 

७३ -    महादेव सुद्धा ज्याचे नाम जपतात त्यास (संसार) दुःख भोगावे लागत नाही. 

७४ -    व्रते, दाने, उद्यापने असे काहीही न करता  दिन-दयाळू परमेश्व्राचे मनन करता येते. 

७५ -    नामस्मरणाचे सांगितलेले हे महत्व मान्य होत नसेल तर अभ्यास करून किंवा अधिकारी

              व्यक्तीच, गुरूंचा सल्ला घेऊन ते महत्व समजून घ्यावे. 

७६ -    मनाची चंचलता माणसास कोठेही स्थिर होऊ देत नाही. नामावरील विश्वास माणसाला

            सन्मार्गावर स्थिर ठेवतो. ……………..श्रीराम


या श्लोकांच्या निमित्ताने प्रभात काळी साधना कशी करावी या बद्दल पूज्य स्वामी विज्ञानानंद

सूचित विचार येथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

पाठ आवडल्यास तो इतरांना ऐकण्याची शिफारस जरूर करावी, ही विनंती.


विजय रा जोशी.



Monday, January 17, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 76 ते 80 : ध्वनिफीत




सारांश , श्लोक 76 ते 80 . 

समर्थ सांगताहेत : राघवाची भावना ठेव म्हणजे भाव ठेव याचाच अर्थ त्याचा कोठेही अभाव नाही  हे तुझ्या मनात पक्के असू दे.  संसार, व्यवहार हा जर खरा मानला ,त्यासाठीच जर आपण आपले नित्य वर्तन ठेवले तर हे साध्य होणार नाही. म्ह्णून अंतिम सत्य काय हे पक्के ध्यानात ठेवून त्या अंतिम सत्यासाठी, परमात्म्यासाठी जर आपण जगलो तर चुकीच्या भयाने आपण ग्रस्त होणार नाही. आणि चुकीच्या ध्येयांची धारणा आपल्या जीवनात स्थिर होणार नाही. 

आपल्या जीवनातील घात टाळण्यासाठी योग्य ध्येय, योग्य साधन, योग्य हेतू, योग्य सुख-संकल्पना असाव्यात आणि त्यावर स्थिर रहाण्यासाठी मत्सरासारख्या  वाईट विकारांना प्रयत्नपूर्वक दूर ठेवावे असे मार्गदर्शन आपल्याला येथे समर्थ रामदासस्वामी करीत आहेत. 

थोडक्यात आपले वर्तन दोष कमी होण्यासाठी असमतेच्या जीवनाकडून समतेच्या जीवनाकडे आपण निरंतर प्रवास, प्रगती करीत राहावे. 

आपल्या भाग्याने आपल्याला या आर्जवाचे आवाहन भिडावे, त्याप्रमाणे आपल्या हातून कृती व्हावी अशी आपण समर्थ चरणी प्रार्थना करू या. 

हा संदेश सविस्तरपणे या ध्वनिफितीत ऐकावा आणि  योग्य वाटल्यास इतरांशी शेअर करावा ही नम्र विनंती. 


विजय रा. जोशी. 



Tuesday, January 4, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 71 ते 75 : ध्वनिफीत




सारांश श्लोक ७१ ते ७५. 

साधनेत वर्तन काटेकोरपणे जपायला हवे.  प्रथम आपण चुकत आहोत हेच माणसाला मान्य नसते.  पण कोणत्यातरी निमित्ताने काही तरी करायला हवे याची तीव्र जाणीव होऊ लागली तर माणूस उपायांकडे बघतो. अशा लोकांस मार्गदर्शन करणारे मनाचे श्लोक (७१ - ७६), “प्रभाते मनी राम चिंतीत जावा” असा उपाय देतात. 

नामस्मरणांनी लगेच हे दोष जातील का ? तर नाही मग त्याने काय होईल? हळूहळू आपल्या दोषांची जाणीव होते. इतरांचे दोष पाहणे कमी होते. पैसे लागत नाही, कष्ट होत नाहीत . एकाग्रतेने, नम्रतेने, भगवंताची आळवणी करायची. 

पण येथे काय मागायचे ? तर शाश्वत सुख, भगवंताशी एकरूपतेचा आनंद. बाकी काही भौतिक, सांसारिक सुख मागायचे नाही. नामस्मरणासाठी साधने, संपत्ती , कार्य-कर्म काही लागत नाही जर काय लागत असेल तर तो भगवंत प्राप्तीचा संकल्प, निर्धार, आस !!  

जर हे पटत नसेल तर सर्व अभ्यास स्वतः करावा, स्वतः करणे होत नसेल तर सद्गुरू शोधावे, सद्गुरूंची परीक्षा आपल्या बुद्धीप्रमाणे करून घ्यावी. आणि एकदा सर्व शन्का फिटल्या कि मग मात्र त्यांचा उपदेश, त्यांचे सांगणे बिनशर्त पाळावे, त्यात संशयी वृत्तीने , विविध सबबीने बाधा आणू  नये. 

समर्थ आपल्याला सांगत आहेत ते असे – 

दिवसाची सुरवात रामनामाने करा आणि दिवसभर रामनामाच्या निष्ठेने वैखरी, प्रकट बोलणे, वागणे करत प्रत्येक दिवस साजरा करीत जा. या श्लोकांतील संदेश आपल्याला उचित मार्गदर्शन करतो. 

श्रीराम II


विजय रा. जोशी.