Thursday, July 14, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 146 ते 150 :  ध्वनिफीत.







सारांश - श्लोक १४६ - १५०. 


मनुष्य जीवनात जे  शोधायचे आहे ते  अनंत, शाश्वत तत्व आहे. 

मना ! त्याचा शोध घे. 

या मनुष्य जीवनाचा उपयोग करून जे सत्य आहे ते शोधून काढ. त्याची भेट घेण्यात खरं  तर जीवनाचे कल्याण

आहे.  आणि तेच करायला समर्थ आपल्याला सांगत आहेत. आपण आपल्या देहापुरते संकुचित झाले

आहोत, मर्यादित झालो आहोत. आपली दृष्टी, भाव विकसित केला पाहिजे.  देहाचा त्याग नको, 

पण देह म्हणजे मी,  हि देहबुद्धी कमी होत गेली पाहिजे.

विश्वातील सर्व संबंध त्या एका सर्व-व्यापी महाकारणाच्या सत्तेखाली वावरतात. ते  कारण कशाचेही कार्य

असत नाही. ते सर्व कारणांचे कारण असून स्वयंभू असते. स्वयंभू म्हणजे ते स्वतःच स्वतःचे कारण असते.

स्वतः कशाचेही कारण नसलेल्या या आदिकारणासच  ईश्वर म्हणतात.

जे सर्व सगुण जे आहे ते निराकारातून आलेले आहे. जडाची निर्मिती अजड अशा ऊर्जेतून झाली आहे.

त्या निराकाराचा जाणण्यासाठी साधकाला  स्वरूपात विलीन व्हायला लागते. स्व हा शून्यरूप

करून तो महाशुन्यात विसर्जित करावा लागतो. किंवा तो अति-विशाल ब्रह्मव्यापी व्हावा लागतो. यालाच

मनोलय म्हणतात, अहंकार मुक्ती म्हणतात. कर्म शुद्धी म्हणतात. 

अध्यात्मात हा व्यक्तिगत अनुभव साधनेने सिद्ध , प्रगत  होत जातो. तो विज्ञानाच्या प्रयोग शाळेत सिद्ध

करणे अजून तरी शक्य झालेले नाही. 

(पण अंतिम सत्या पर्येंत पोहोचावयाचे असेल तर विज्ञानाला आवश्यक

ते सर्व प्रयत्न करावेच लागतील, किंवा स्व-मर्यादा मान्य कराव्या लागतील).            श्रीराम !!


विजय रा. जोशी. 




Thursday, July 7, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 141 ते 145 :  ध्वनिफीत.





सारांश श्लोक १४१ ते १४५. 

समर्थ एखाद्या खऱ्या शिक्षका प्रमाणे साधकांना साधनेतील अति अवघड मार्गाची स्पष्ट जाणीव करून देत आहेत. आणि त्यासाठी मनोभूमिका तयार होण्यास मदत करीत आहेत. या मनुष्यजन्माचे खरे प्रबोधन साधायचे  असेल तर सद्गुरुकृपे शिवाय अन्य पर्याय नाही. जो पर्येंत आपली अहंता, अहंकार आहे, तेथ पर्येंत गुरुकृपा घडत नाही. आपण सद्गुरुंकडे का जातो, याचा आपण विचार केला आहे का ?भौतिक यशासाठी, काही यश प्राप्तीसाठी का स्वतःला जाणण्यासाठी ? सत्य शोधनासाठी ? अवघड प्रश्न, आणि अत्यंत अवघड काम म्हणजे याचे प्रामाणिक उत्तर शोधणे. 

आपल्याला अध्यात्म-अभ्यास खरच करायचा आहे का? बुद्धी, मनाने घेतलेले ज्ञान यांनी खूप मोठे शोध लागतील, पण आत्मज्ञान होणार नाही. त्यासाठी मन, बुद्धी, चित्त अहंकार. (अंतःकरण) शुद्धी घडणे अवश्य आहे. तू कशाला जन्माला आला आहेस असा प्रश्न विचारला तर अनेक लोकांची अनेक वेगळी उत्तरे देतील. पण मी अंतिम सत्य शोधण्यासाठी जन्म घेतला असे उत्तर बहुधा कोणीच देणार नाही. 

संतांनी सोपी व्याख्या केली - मी खरा कोण हे जाणणे म्हणजे ज्ञान, बाकीचे सर्व अज्ञान. 

स्वामीजी सांगतात ‘ द्याल तर सर्व मिळेल पण फक्त स्वतःजवळच राखाल तर राख होईल’. ‘निरपेक्षपणे द्यायची सवय ठेवा, त्यागाची सवय लावून घ्या. त्यातूनच पुढे यथावकाश षड्विकार, अहंकार मुक्ती घडे आणि मग विद्येचा मार्ग, सत्यशोधनाचा मार्ग प्रशस्त होत राहील. 

जीवन हेतूचे मूलभूत विशलेषण करणारे हे श्लोक आपल्याला नक्कीच शुभ-संदेश देतील. अवश्य ऐका, आवडल्यास like आणि share करा.


विजय रा. जोशी.