Friday, February 25, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 91 ते 95 : ध्वनिफीत.



सारांश , श्लोक 91 ते 95. 

चांगल्या स्थितीत असताना देवाचे स्मरण ठेवा. संकट आले, आजारपण आले, फक्त अशा वेळी देवाचा

धावा उपयोगी होईलच असं नाही. 

भगवंत म्हणजे नेमकं काय ? त्या पर्येंत पोहोचण्यासाठी नेमके काय करावं ?       

हे व्यक्तीनिहाय स्वतंत्र असू शकते.  देव वर्णन हे नेमके नाही कारण तो अवर्णनीय आहे. 

आपले सर्व दोष , जन्म जन्मांतरीचे दोष  जर घालवायचे असतील तर मनःपूर्वक केलेली देव भक्ती घडली पाहिजे. 

भगवन्त जीवाची सर्व व्यवस्था करीत असतो. 

व्यवहारात अनेक गोष्टी निभवायला लागतात, त्यामध्ये कितीतरी वेळा आपल्या कडून चुकीचे गैर असे वर्तन होते,

वाणी अपवित्र होते.  

पवित्र भाषेने, नामस्मरणाने वाणी पवित्र होते….  हळूहळू पवित्र होते. वर्तन शुद्ध होऊ लागते.

जर एखादा अत्यंत दुर्वर्तनीसुद्धा अनन्यभावाने (म्हणजे सर्व पाप-कार्यें सोडून देऊन ) 

माझा भक्त होऊन मला भजेल, तर तो सज्जनच समजावा.

राम नामाने, नामस्मरणाने, सत्कर्माने सर्व कल्याण घडेल. 

नामस्मरणाचे महत्व सांगणारे हे विवेचन जरूर ऐका , आणि आवडल्यास इतरांना ऐकायलाही सांगा. 



विजय रा. जोशी. 







Wednesday, February 16, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 86 ते 90 : ध्वनिफीत






सारांश , श्लोक ८६ ते ९०. 


मूलभूत क्रांती होऊन व्यक्तिमत्व सर्वांगीण पद्धतीने विकसित होण्याची प्रक्रिया समर्थ आपल्याला सांगत आहेत. काम, वासना प्रत्येकाला जीव-धारणेसाठी आवश्यक आहेत. त्या जर अमर्याद असल्या तर त्यांचा त्रास होतो. पण रामभक्ताला हा “अति पणाचा” त्रास होत नाही. 

नामस्मरणाचे कार्य आणि उद्दिष्ट “चित्त-शुद्धी” हेच आहे. चान्गले, साजिरे, सुंदर सोपे, बिन पैशाचे आणि आपल्याला अत्यंत लाभदायक नाम आहे. पण आपण त्याचे महत्व पूर्णपणे ओळखत नाही. 

भोजनाच्या वेळी आणि समूहात, एकत्र असताना, दोन्ही वेळा आपल्याला रामाचा उच्चार, नामघोष करावा असं सांगितलंय. इथे आदराने, श्रद्धेने, म्हणायला सांगितले आहे.

अन्न  तुमच्या ताटात येण्यापूर्वी किती लोकांचा हातभार लागला असतो, त्यांच्याबद्दल, त्यांच्या मध्ये असलेल्या त्या परम तत्वाचे स्मरण , चिंतन म्हणजेच हरि-चिंतन. ते करीत असता अत्यंत समाधानाने जर भोजन केले तर त्याचा वैयक्तिक आणि सामुदायिक परिणाम हा उत्तमच असणार. 

सध्याच्या जीवनक्रमात जे आपल्या लक्षात कधीच येत नाही,  ते समजवण्याचा हा श्रीसमर्थांचा वडिलांच्या मायेने प्रयत्न आहे. 

या पाठातील संदेश आपण जरूर ऐका आणि आवडल्यास इतरांना ऐकायची शिफारस करा, ही  विनंती !



विजय रा. जोशी. 






Sunday, February 6, 2022

मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 81 ते 85 : ध्वनिफीत



सारांश श्लोक 81 ते 85 . 


मत्सर घात यावर समर्थांचा भर आहे, कारण मत्सर हा मानवी जीवनात फार मोठा धोका आहे.

मत्सराच्या उदभवामुळे माणसाचे जीवन भकास, नष्ट, अतीव दुखी होते. ... 

अतिशय नकारी, भयंकर, विनाश-कारक भावना म्हणजे द्वेष आणि मत्सर.

हे मना ! तू मत्सरात शक्ती घालवून नामाला विसरू नकोस, स्वतःचा घात करू नको.

मत्सरा सारख्या नकारी, भयंकर भावना नाहीशा करण्याची शक्ती ही अखंड नाम-स्मरणात आहे.

आणि या नाम-साधने बरोबर दुसऱ्या कुठल्याही साधनेची सोपेपणात  तुलना होऊ शकत नाही. 

रामनामाने प्राप्त होणारी स्थिती हि ‘विश्राम’ स्थिती आहे. आणि ही  विश्राम स्थिती प्रत्येकास हवी

असते. जेव्हा आपण संपूर्णपणे साधना कार्यास समर्पित राहू तेव्हा आपली स्व-शुद्धी प्रक्रिया पुढे जात

राहून अंतिमतः आपल्याला “खरा विश्राम” लाभेल.

नामस्मरणाच्या जोडीला अखंड साधनेतून, सत्कर्मातून जेव्हा व्यक्ती सातत्य पूर्ण कार्य करीत राहील, 

तेव्हा आत्म-शुद्धी, सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडतो. 

समस्त उपायांमध्ये “नाम स्मरण” हे सार आहे. 

भगवंत-स्वरूप प्राप्त झालेले संत, सद्गुरू आपल्याला हे मार्गदर्शन उपलब्ध करून देतात , 

त्याचे महत्व आपण ध्यानात ठेवले पाहिजे. 

सध्याच्या तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये नाम-स्मरणाचे महत्व अधोरेखित करणारे हे विवेचन जरूर ऎका  

आणि आवडल्यास इतरांना ऐकण्याची शिफारस करा. 


विजय रा. जोशी.