Sunday, September 25, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 176 ते 180 :  ध्वनिफीत :





सारांश श्लोक १७६ -१८०. 

सगुण उपासना करतांना मूळ निर्गुण रूपाची सतत जाणीव ठेवावी लागते.  ज्या निर्गुण रूपाची प्रतिक-रुप पूजा

आपण करतो त्याचे भान सतत ठेवावे लागते. ‘सगुण उपासना’ म्हणजे आपल्या उपास्य देवतेला हृदयात धारण

करुन तिचे विशेष गुण आपल्यात  येतील, आपला तसा स्वभाव बनेल असा प्रयत्न करणे.

एकीकडे ब्रह्माण्डाचा पसारा आणि ब्रह्माण्ड निर्मात्याचे अवर्णनीय स्वरूप आणि दुसरीकडे अहंतायुक्त मानवी

स्वभाव, बुद्धी … याचा आपण विचार करीत आहोत. आणि त्या अल्प बुद्धीला हा सर्वत्र असलेला परमात्मा कसा

समजून घेता येईल  हे समर्थ आपल्याला समजावत आहेत. 

मानवी जीवनात मनाचे स्थान महत्वाचे आहे. मनाचे उन्नयन करावे लागते. मनाला प्रशिक्षण द्यावे लागते.. हे मन

सत्संगतीने,  सत्संगाने आणि  पूर्व सुकृताने जेव्हा अधिक सूक्ष्म होऊ लागते तेव्हा वरवर दिसणाऱ्या दृश्यामागे जे

चिरंतन अदृश्य आहे त्याचे अस्तित्व कधी-कधी उमजू लागते त्याबद्दल उत्सुकता निर्माण होते.   

मग हे विश्व  कोणी, कसे, केव्हा, कशासाठी  निर्माण झाले हे प्रश्न मनात येतात. 

मनुष्य जीवनात आपल्याला जी बुद्धी, विवेक शक्ती लाभलेली आहे तिचा उपयोग करून मानव देवरूपाला पोहोचू

शकतो. त्यासाठी आत्मज्ञान प्राप्त केलेल्या गुरूंचे मार्गदर्शन उपयोगी ठरते. 

लोकांना फसविण्यासाठी काम करणारे अनेक भोंदू पण हुशार मंडळी असतात. ते तात्काळ चमत्कार घडविणारे

उपायांचा मोह आपल्याला पाडतात. आपल्याला जाळ्यात ओढू पहातात..  

अशा तथाकथित गुरु पासून सावध रहायला समर्थ सांगत आहेत.                                                              श्रीराम !



विजय रा. जोशी. 


 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 171 ते 175 :  ध्वनिफीत :





सारांश श्लोक १७१ -१७५ 

आत्मवस्तूला पहाणाऱ्या ज्ञान चक्षुंचा उदय कसा होतो, चर्म चक्षु, आणि ज्ञान चक्षु फरक. आणि 

त्या  स्थित्यन्तरासाठी उपाय, अहंकारमुक्ती.  हे सर्व मूलभूत ज्ञान सांगणारे श्लोक आहेत.  

निरपेक्ष त्याग दुसऱ्यांसाठी करणे अशी  आपली सहज अवस्था होणे हे ज्ञानाचे लक्षण आहे. आपले जगणे

इतरांसाठी व्हायला हवे.  सुरवातीला ते जरी संकल्पाने असले तरी अंतिमतः ती आपली सहज अवस्था 

व्हायला पाहिजे.  

कल्पनेच्या दोन दिशा – 1. विषयाकडे धावणारी  (अविद्या). 2. परमात्म्याचा शोध घेणारी.(सुविद्या).  

विषय सुखाने आनंद होतोच पण तो चिरकाल नसतो. तात्पुरता असतो.  उलट परमात्म दर्शनाने अवीट, संपूर्ण

आणि कायम टिकणारा आनंद निर्माण होतो. म्हणून विवेकाच्या आधाराने सुविद्या मिळवून तसे जगण्याचा

प्रयत्न असावा. 

साधना सुरु झाली तर मग किती दिवसात सुविद्या येईल ? या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. 

ते प्रत्येक व्यक्तीवर अवलंबुन आहे. अहंकार रुपी राहू आपल्यातील  आत्मशक्ती आच्छादून टाकतो. विवेकाने

जर अहंकार मुक्ती साधली तर हे आच्छादन दूर होते. म्हणून जीवनात विवेकाला महत्वाचे स्थान हवे.

भगवान प्रचिती / दर्शन घेण्यासाठी काय करावे याचे तपशीलवार मार्गदर्शन समर्थ करीत आहेत. 

ब्रह्मांड नायकाची ओळख झाल्यावर जीवनाचे रूपच कसे आमूलाग्र बदलून जाईल हे समर्थांना सूचवायचे आहे

आणि त्यासाठी त्या जगन्नियंत्याला ओळखावे असा त्यांचा आग्रह आहे.                                        श्रीराम !!



विजय रा. जोशी. 



Wednesday, September 7, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 166 ते 170 :  ध्वनिफीत :




सारांश : श्लोक 166-170 . 


प्रपंच हेच सर्वस्व समजण्याचा निश्चय आपण केला. त्यातील फोलपणा श्रीसमर्थ  समजावत आहेत. निश्चय

शाश्वताचा, जे कायम टिकणारे सत्य आहे त्याचा म्हणजे परमात्मा प्राप्तीचा निश्चय करावा असं सांगत आहेत. . हे 

उत्कृष्ठ ध्येय आहे.  जीवनातील घडी न घडी या कार्यात वेचावी. आणि हे सर्व संत्संगतीने, संत वचन पालनाने ,

साधनेने साधेल. म्हणून संत संगत सोडू नये. 

जीवन ध्येय काय असावे आणि त्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन समर्थ करत आहेत. 

संत कोणाला म्हणाव ? जो भगवंतांशी एकरूप झाला तो संत . मन शान्त आहे आपुलकी आहे,

प्रसन्नता आहे, शुद्ध भाव आहे या वरून संत ओळखता येतात . दिसायला ते सामान्य माणसासारखे

दिसतात. 

त्यांच्याकडे खरे ज्ञान असते, त्यांचे वागणे शांत, तृप्त असते, सर्व करूनही त्यांची वृत्ती पूर्ण अलिप्त

असते. आणि यामुळे ते कोठल्याही उपाधीत अडकलेले नसतात. 

देहबुद्धी जाण्यासाठी ज्ञानबोध कसा करायचा ते समर्थ शिकवत आहेत. वाचनाची , अभ्यासाची मर्यदा

आहे. त्यातून ज्ञानबोध होणार नाही. अभ्यासाला निष्ठेची, सातत्य पूर्ण वर्तनाची जोड अनिवार्य आहे.

त्याशिवाय खरा ज्ञानबोध होणार नाही. या मार्गावर आपण अखंड राहिलो तर आपल्याला सतत

संतसंगती मिळेल आणि त्यातून योग्य वेळ आली कि ज्ञानबोध होऊन आपल्या अंतरंगात 

परिवर्तन घडेल, स्थित्यन्तर घडेल .

हे सर्व सविस्तर समजून घेण्यासाठी, ऐकण्यासाठी हा ऑडिओ जरूर ऐका , 

आवडल्यास इतरांना ऐकायला सांगा, शेअर करा. धन्यवाद !


विजय रा. जोशी.