Sunday, September 25, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 176 ते 180 :  ध्वनिफीत :





सारांश श्लोक १७६ -१८०. 

सगुण उपासना करतांना मूळ निर्गुण रूपाची सतत जाणीव ठेवावी लागते.  ज्या निर्गुण रूपाची प्रतिक-रुप पूजा

आपण करतो त्याचे भान सतत ठेवावे लागते. ‘सगुण उपासना’ म्हणजे आपल्या उपास्य देवतेला हृदयात धारण

करुन तिचे विशेष गुण आपल्यात  येतील, आपला तसा स्वभाव बनेल असा प्रयत्न करणे.

एकीकडे ब्रह्माण्डाचा पसारा आणि ब्रह्माण्ड निर्मात्याचे अवर्णनीय स्वरूप आणि दुसरीकडे अहंतायुक्त मानवी

स्वभाव, बुद्धी … याचा आपण विचार करीत आहोत. आणि त्या अल्प बुद्धीला हा सर्वत्र असलेला परमात्मा कसा

समजून घेता येईल  हे समर्थ आपल्याला समजावत आहेत. 

मानवी जीवनात मनाचे स्थान महत्वाचे आहे. मनाचे उन्नयन करावे लागते. मनाला प्रशिक्षण द्यावे लागते.. हे मन

सत्संगतीने,  सत्संगाने आणि  पूर्व सुकृताने जेव्हा अधिक सूक्ष्म होऊ लागते तेव्हा वरवर दिसणाऱ्या दृश्यामागे जे

चिरंतन अदृश्य आहे त्याचे अस्तित्व कधी-कधी उमजू लागते त्याबद्दल उत्सुकता निर्माण होते.   

मग हे विश्व  कोणी, कसे, केव्हा, कशासाठी  निर्माण झाले हे प्रश्न मनात येतात. 

मनुष्य जीवनात आपल्याला जी बुद्धी, विवेक शक्ती लाभलेली आहे तिचा उपयोग करून मानव देवरूपाला पोहोचू

शकतो. त्यासाठी आत्मज्ञान प्राप्त केलेल्या गुरूंचे मार्गदर्शन उपयोगी ठरते. 

लोकांना फसविण्यासाठी काम करणारे अनेक भोंदू पण हुशार मंडळी असतात. ते तात्काळ चमत्कार घडविणारे

उपायांचा मोह आपल्याला पाडतात. आपल्याला जाळ्यात ओढू पहातात..  

अशा तथाकथित गुरु पासून सावध रहायला समर्थ सांगत आहेत.                                                              श्रीराम !



विजय रा. जोशी. 


No comments:

Post a Comment