Showing posts with label मनाचे श्लोक. Show all posts
Showing posts with label मनाचे श्लोक. Show all posts

Monday, April 1, 2024

 

 योग ग्रंथ  :  पाठ 1.



वरील ओळीवर क्लिक करा , आपल्याला ध्वनीफीत ऐकू येईल. 




मागाल ते मिळेल , पण......


ज्ञानेश्वरी मधील पसायदान , सगळ्या जगाच्या सुखासाठी मागणी मागते,  तेथेही अट 

“सत्कर्मी रती वाढो” अशा सत्कर्म व्रताची आहे. 

“मनाच्या श्लोक” मधेही हे पथ्य चुकलेले नाही. सुख भोगण्यासाठी माणूस सतत उतावीळ असतो,

इच्छुक असतो. त्यासाठी आयुष्यभर जीवतोड प्रयत्न करतो. त्या प्रयत्नात खर्च होणाऱ्या शक्तीपैकी

जरी निम्मी शक्ती त्याने सुख प्राप्तीचे नियम समजून घेण्यात खर्च केली तर त्याचे 

खरेखुरे कल्याण होईल. याबद्दल मार्गदर्शन मनाच्या श्लोकात आहे.  

इतरांच्या  कल्याणातच आपले खरे कल्याण आहे हे कळते पण वळत नाही .

आत्मचिंतनाच्या, आत्मपरीक्षणाच्या काही सुवर्ण-क्षणांना हे आपल्याला पटते पण दुर्दैवाने त्या क्षणांचे

ते ज्ञान क्षणभंगुर ठरते. 

याला उपाय म्हणजे सतत सत्संग, अभ्यास, त्यावर चिंतन आणि त्याप्रमाणे वर्तन …. सद्वर्तन. 

हे एकट्याने करतांना दुबळाई वाटते, आळस डोकावतो, हातून सहज होत नाही, म्हणून 

श्री रामदासांनी मनाच्या एकांत साधने बरोबरच समाज बांधणीचा सामुदायिक कार्यक्रम सांगितला.

त्यावेळी आवश्यकअसलेली राष्ट्र उभारणी केली.  

ते सर्व करण्याची  गरज आजही आहे, चिरंतन आहे. मागील पाठमालांमध्ये आपण हे विस्ताराने 

पाहिले.  स्वामीजी लिखित योग ग्रंथावरील हि नवीन पाठमाला सुरु होत आहे. 

आपला जीवनातील साधक म्हणून क्रमविकास आपापल्या ध्येया  प्रमाणे करण्यासाठी जी 

जीवनशैली साधकांना उपयुक्त आहे या विषयी मार्गदर्शन योग ग्रंथात मनशक्ती केंद्राचे संस्थापक

स्वामी विज्ञानानंद करतात   

शक्ती आणि शांती  याचा मेळ जीवनात आवश्यक असतो. त्यावर ध्यान हा उपाय आहे. 

शरीर आणि मनाचे संतुलन साधणारी "शरीराशी संवाद" हि ध्यान पद्धती देखील योग ग्रंथात 

आपल्याला शिकायला मिळते. 

हे सर्व विषय आपण क्रमाने या पाठमालेत अभ्यासण्याचा प्रयत्न करणार  आहोत, त्यावर चिंतन

 करणार आहोत. यापुढील काही पाठ यासंबंधी आवश्यक अशा प्राथमिक माहिती / तपशिलाचे

 होतील. त्यातील हा सुरवातीचा पाठ !


तत्सत ब्रह्मार्पण मस्तू I I   हरी ओम !!


विजय रा. जोशी. 




 

Thursday, October 20, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 196 ते 200 :  ध्वनिफीत :





सारांश - श्लोक  : १९६ -२००. 

संपूर्ण आसमंतात वावरत असलेल्या अणुरेणूंमध्ये अस्तित्व असलेल्या परब्रह्म ईश्वर-तत्वाला श्रीसमर्थ राघव असे

 संबोधतात  आणि म्हणतात की या राघवाने व्यापल्यामुळे  आसमंतात रिकामी अशी जागाच उरलेली नाही.

राघवाचे रूप कसे आहे हे सांगताना समर्थाना आकाशाची आठवण होते. 

मन आभाळा एवढे विशाल केले, स्वतःशी मर्यादित आपले  भावना/विचार जर सर्वांची चिंता करण्यासाठी वापरले,

तर अर्थात आपण समर्थांच्या / रामाच्या जवळ जाऊ. आणि त्याच्या सानिध्याने आपल्या सर्व भव-चिंता, 

संसार-काळज्या नष्ट होतील. आपण भयातीत होऊ. आणि भयातून पूर्ण मुक्ती हाच मोक्ष असतो. 

परमात्मा आकाशा  सारखा आहे असे सांगतात,  नंतर ती उपमा अपुरी आहे असंही सांगतात. उपमा हि कधीच

 पूर्णत्वाने घेता येत नाही, फक्त समजून घेण्यास  त्या उपमा मदत करतात. 

नभाच्या मर्यादेत तो नाही. तो सर्वत्र ओतप्रोत आहे, म्ह्णून त्याला मर्यादित करता येत नाही. श्रीरामाचे रूप विस्तीर्ण,

अतिशय पुरातन असे आहे. त्याला कसलीही तर्कसंगती लागू पडत नाही. अतिशय गूढ असे हे ईश्वरतत्व आहे. 

पण तरीही त्याच्याच कृपेने गूढता नाहीशी होऊन त्याचे ते अद्वितीय असलेले रूप सुलभपणे समजून येते. 

ज्ञान शब्दांनी आपण ऐकतो, नंतर अनुभवाने त्याची प्रचिती येते तेव्हा ते आकळते. 

मग साक्षी अवस्थाही आटून जाते. ध्यानात उन्मनी अवस्था येते त्यात दिवसाचे क्षण होतात. 

कृतार्थतेची अनुभूती येते .         श्रीराम !!


विजय रा.जोशी. 





  मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 191 ते 195 :  ध्वनिफीत :





सारांश श्लोक :  १९१-१९५ . 

स्वत:च्या ऐहिक सुखातच गुंतून पडलेल्या जीवाला आध्यात्माचा, परमात्म्याचा  विचार करायला फुरसत  मिळत

नाही. म्हणून ब्रह्मज्ञान अगदी कल्पान्त झाला तरी आकलन होणे शक्य नाही. 

शरीर, मन आणि बुद्धी यापलीकडे न गेल्यास परमात्म्याचे स्वरूप कळणार नाही. 

देहबुद्धी निरास म्हणजे अध्यात्म/समाधी तयारी. 

जाणीव आणि नेणीव या मानवी स्थितीतल्या कल्पना आहे, त्या सर्वसाक्षी परमात्म्याला लागू नाहीत.

जन्म हा आपल्या जीवनाची सुरवात नाही आणि मृत्यू आपल्या जीवनाचा अंत नाही , एका अनंत प्रवाहाचा 

एक छोटा भाग म्हणजे आपले जीवन.

देव हा आकाशासारखा असतो.  आकाश म्हणजे काय? आकाशाची सुरुवात कुठून होते आणि शेवट कुठे होतो हे

जसे समजत नाही तसेच हा देवराणा कुठून येतो? कुठे जातो? हे ही कळत नाही.

देव म्हणजे काय ? देह सोडल्यावर जीव कोठे जातो ? मानवी मनाचे हे चिरंतन प्रश्न आहेत.

‘देहबुद्धी, मीपणा न ठेवता मनुजाने परमेश्वराच्या भक्तीत आपले आयुष्य व्यतीत करावे अन्यथा ब्रह्मज्ञान होणे नाही’ 

अशी जाग देण्याचे काम समर्थ या श्लोकात करत आहेत. 

या सर्व विषयांची सोप्या तर्हेने मांडणी असलेले विवेचन जरूर एक, आपला अभिप्रायही जरूर नोंदवा. 

धन्यवाद. 


विजय रा. जोशी. 

 




Sunday, September 25, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 176 ते 180 :  ध्वनिफीत :





सारांश श्लोक १७६ -१८०. 

सगुण उपासना करतांना मूळ निर्गुण रूपाची सतत जाणीव ठेवावी लागते.  ज्या निर्गुण रूपाची प्रतिक-रुप पूजा

आपण करतो त्याचे भान सतत ठेवावे लागते. ‘सगुण उपासना’ म्हणजे आपल्या उपास्य देवतेला हृदयात धारण

करुन तिचे विशेष गुण आपल्यात  येतील, आपला तसा स्वभाव बनेल असा प्रयत्न करणे.

एकीकडे ब्रह्माण्डाचा पसारा आणि ब्रह्माण्ड निर्मात्याचे अवर्णनीय स्वरूप आणि दुसरीकडे अहंतायुक्त मानवी

स्वभाव, बुद्धी … याचा आपण विचार करीत आहोत. आणि त्या अल्प बुद्धीला हा सर्वत्र असलेला परमात्मा कसा

समजून घेता येईल  हे समर्थ आपल्याला समजावत आहेत. 

मानवी जीवनात मनाचे स्थान महत्वाचे आहे. मनाचे उन्नयन करावे लागते. मनाला प्रशिक्षण द्यावे लागते.. हे मन

सत्संगतीने,  सत्संगाने आणि  पूर्व सुकृताने जेव्हा अधिक सूक्ष्म होऊ लागते तेव्हा वरवर दिसणाऱ्या दृश्यामागे जे

चिरंतन अदृश्य आहे त्याचे अस्तित्व कधी-कधी उमजू लागते त्याबद्दल उत्सुकता निर्माण होते.   

मग हे विश्व  कोणी, कसे, केव्हा, कशासाठी  निर्माण झाले हे प्रश्न मनात येतात. 

मनुष्य जीवनात आपल्याला जी बुद्धी, विवेक शक्ती लाभलेली आहे तिचा उपयोग करून मानव देवरूपाला पोहोचू

शकतो. त्यासाठी आत्मज्ञान प्राप्त केलेल्या गुरूंचे मार्गदर्शन उपयोगी ठरते. 

लोकांना फसविण्यासाठी काम करणारे अनेक भोंदू पण हुशार मंडळी असतात. ते तात्काळ चमत्कार घडविणारे

उपायांचा मोह आपल्याला पाडतात. आपल्याला जाळ्यात ओढू पहातात..  

अशा तथाकथित गुरु पासून सावध रहायला समर्थ सांगत आहेत.                                                              श्रीराम !



विजय रा. जोशी. 


 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 171 ते 175 :  ध्वनिफीत :





सारांश श्लोक १७१ -१७५ 

आत्मवस्तूला पहाणाऱ्या ज्ञान चक्षुंचा उदय कसा होतो, चर्म चक्षु, आणि ज्ञान चक्षु फरक. आणि 

त्या  स्थित्यन्तरासाठी उपाय, अहंकारमुक्ती.  हे सर्व मूलभूत ज्ञान सांगणारे श्लोक आहेत.  

निरपेक्ष त्याग दुसऱ्यांसाठी करणे अशी  आपली सहज अवस्था होणे हे ज्ञानाचे लक्षण आहे. आपले जगणे

इतरांसाठी व्हायला हवे.  सुरवातीला ते जरी संकल्पाने असले तरी अंतिमतः ती आपली सहज अवस्था 

व्हायला पाहिजे.  

कल्पनेच्या दोन दिशा – 1. विषयाकडे धावणारी  (अविद्या). 2. परमात्म्याचा शोध घेणारी.(सुविद्या).  

विषय सुखाने आनंद होतोच पण तो चिरकाल नसतो. तात्पुरता असतो.  उलट परमात्म दर्शनाने अवीट, संपूर्ण

आणि कायम टिकणारा आनंद निर्माण होतो. म्हणून विवेकाच्या आधाराने सुविद्या मिळवून तसे जगण्याचा

प्रयत्न असावा. 

साधना सुरु झाली तर मग किती दिवसात सुविद्या येईल ? या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. 

ते प्रत्येक व्यक्तीवर अवलंबुन आहे. अहंकार रुपी राहू आपल्यातील  आत्मशक्ती आच्छादून टाकतो. विवेकाने

जर अहंकार मुक्ती साधली तर हे आच्छादन दूर होते. म्हणून जीवनात विवेकाला महत्वाचे स्थान हवे.

भगवान प्रचिती / दर्शन घेण्यासाठी काय करावे याचे तपशीलवार मार्गदर्शन समर्थ करीत आहेत. 

ब्रह्मांड नायकाची ओळख झाल्यावर जीवनाचे रूपच कसे आमूलाग्र बदलून जाईल हे समर्थांना सूचवायचे आहे

आणि त्यासाठी त्या जगन्नियंत्याला ओळखावे असा त्यांचा आग्रह आहे.                                        श्रीराम !!



विजय रा. जोशी. 



Thursday, July 7, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 141 ते 145 :  ध्वनिफीत.





सारांश श्लोक १४१ ते १४५. 

समर्थ एखाद्या खऱ्या शिक्षका प्रमाणे साधकांना साधनेतील अति अवघड मार्गाची स्पष्ट जाणीव करून देत आहेत. आणि त्यासाठी मनोभूमिका तयार होण्यास मदत करीत आहेत. या मनुष्यजन्माचे खरे प्रबोधन साधायचे  असेल तर सद्गुरुकृपे शिवाय अन्य पर्याय नाही. जो पर्येंत आपली अहंता, अहंकार आहे, तेथ पर्येंत गुरुकृपा घडत नाही. आपण सद्गुरुंकडे का जातो, याचा आपण विचार केला आहे का ?भौतिक यशासाठी, काही यश प्राप्तीसाठी का स्वतःला जाणण्यासाठी ? सत्य शोधनासाठी ? अवघड प्रश्न, आणि अत्यंत अवघड काम म्हणजे याचे प्रामाणिक उत्तर शोधणे. 

आपल्याला अध्यात्म-अभ्यास खरच करायचा आहे का? बुद्धी, मनाने घेतलेले ज्ञान यांनी खूप मोठे शोध लागतील, पण आत्मज्ञान होणार नाही. त्यासाठी मन, बुद्धी, चित्त अहंकार. (अंतःकरण) शुद्धी घडणे अवश्य आहे. तू कशाला जन्माला आला आहेस असा प्रश्न विचारला तर अनेक लोकांची अनेक वेगळी उत्तरे देतील. पण मी अंतिम सत्य शोधण्यासाठी जन्म घेतला असे उत्तर बहुधा कोणीच देणार नाही. 

संतांनी सोपी व्याख्या केली - मी खरा कोण हे जाणणे म्हणजे ज्ञान, बाकीचे सर्व अज्ञान. 

स्वामीजी सांगतात ‘ द्याल तर सर्व मिळेल पण फक्त स्वतःजवळच राखाल तर राख होईल’. ‘निरपेक्षपणे द्यायची सवय ठेवा, त्यागाची सवय लावून घ्या. त्यातूनच पुढे यथावकाश षड्विकार, अहंकार मुक्ती घडे आणि मग विद्येचा मार्ग, सत्यशोधनाचा मार्ग प्रशस्त होत राहील. 

जीवन हेतूचे मूलभूत विशलेषण करणारे हे श्लोक आपल्याला नक्कीच शुभ-संदेश देतील. अवश्य ऐका, आवडल्यास like आणि share करा.


विजय रा. जोशी. 




Thursday, June 2, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 121 ते 125 : ध्वनिफीत.





सारांश, श्लोक - १२१ - १२५. 

समर्थ  भगवंत-लीला आणि त्याचे भगवंत भक्तांना आलेले अनेक अनुभव हे पौराणिक कथांच्या माध्यमातून 

सांगत आहेत. आणि त्यातून खऱ्या भक्तांचा देवाला कसा अभिमान, प्रेम वाटते. 

हे समर्थ आपल्या मनावत ठसवत आहेत….. डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत यातील जीव-विकास 

आणि दशावतारातील श्री विष्णूचे अवतारक्रम यात बरेच साम्य आढळते. 

सारांशात पाहता मत्स्य, कूर्म व वराह हे पहिले तीन अवतार माणूस व पशू यांच्यामधील समान अशा प्रवृत्ती

दाखवतात. नरसिंह, वामन व परशुराम अवतारात मानव समूहाच्या प्रवृत्ती आढळतात. 

राम, कृष्ण व बुद्ध अवतारात माणसाच्या व्यक्तीगत उत्थानाचे नमूने दिसतात. कल्की अवतार कधी झालाच

तर तो त्याच पठडीतला होणार अशी अपेक्षा आहे. हे सर्व अवतार कालातीत आहेत. 

देव भक्ताकडे कधीहि दुर्लक्ष करत नाही, त्याची निराशा होऊ देत नाही कारण सच्च्या भक्ताचा त्याला 

नेहमी अभिमान असतो. हे समर्थ वारंवार सांगतात आणि त्यासाठी ते दाखले देखील देतात. 

नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, कृष्ण, गौतम बुद्ध,आणि पुढे येणारा कल्की या अवतारांच्या कथांच्या

आधारे रामदास स्वामी सन्मार्गी स्थिर होण्यासाठी काय करावे त्याचे सर्व तपशीलवार वर्णन 

श्लोकांच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवत आहेत. 

मनाच्या उत्क्रांतीचे हे वर्णन आणि समर्थांचा उपदेश जरूर ऐका आणि आवडल्यास इतरांना ऐकायला सांगा. 


विजय रा. जोशी. 




Wednesday, May 11, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 111 ते 115 : ध्वनिफीत.





सारांश श्लोक 111 ते 115 . 


अनेकदा आपले खरी हीत साधणारी मंडळी आपल्याला आवडत नाहीत. आपली आई, आणि परमार्थातील आपले गुरु हे कटू पण सत्य उत्तम हेतूने आपल्याला सांगत असतात. 

काय मिळवायचे ते शोधले पाहिजे. तसेच काय मिळू शकते पण न घेता ते सोडले पाहिजे याचाही सतर्क राहून शोध घेतला पाहिजे. सर्व गोष्टी योग्य संवादातून मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आत्महित जपणाऱ्या मूक संवादाचे, ‘हे  हृदयीचे ते हृदयी पोहोचणाऱ्या’ हितकारी  संवादाचे महत्व या श्लोकांच्या माध्यमातून आपण समजून घेत आहोत. वाद संपेल , आपल्याला नेमके ज्ञान होईल, खरे ज्ञान होईल, अहितकारक टळेल, असा संवाद हितकारी असतो. 

माणसाच्या पंडितत्वाचा , विद्वत्तेचा, बुध्दीमत्वाचा त्याला त्याच्या अध्यात्मिक प्रगतीसाठी काही उपयोग होत नाही, किंबहुना त्याचा अडथळाच  होतो. परमार्थ क्षेत्रातील मोठेपणा मोजण्याचे निकष वेगळे आहेत. येथे लौकिक विद्येचे महत्व कमी आहे असे विधान नाही. पण त्या पदव्यांमुळे येणार अहंकार मात्र अध्यात्म क्षेत्रात पुढे नेणारा नाही एवढेच. आपल्या साधकत्वाचा, आपल्या सत्संगाचा देखील कधीतरी कोणाला अहंकार होतो. ही देखील अहंता तेवढीच अनावश्यक  आणि अनर्थकारक असते. 

वाद समाप्त करणारा संवाद , जेथून काही तत्व हाती येईल, हितकारी घडू शकेल असा संवाद जरूर करावा. आपली जगाकडे पहाण्याची दृष्टी भोगाची असते, ती ईशभावाची करण्याचा प्रयत्न करावा,

हे सर्व साध्य होण्यासाठी सुसंवाद कसा असावा विसंवाद कसा टाळावा या बद्दल मार्गदर्शन करणारे हे ज्ञान , लौकिक व्यवहारात पण तेवढेच उपयुक्त आहे.                          ‘श्रीराम !!’


विजय रा. जोशी. 



Sunday, April 17, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 101 ते 105 : ध्वनिफीत.




सारांश श्लोक 101 ते  105


नामस्मरण जेथे चालले आहे तेथील वातावरण तरंग चांगल्यास पोषक असतात. अति आदरे, दृढ

विश्वासाने नामस्मरण करावे, त्याने अंतर्बाहय चांगल्या विचार लहरी निर्माण होतील, सत्कर्म करण्याची

प्रेरणा होत राहील ,  स्वभाव दोष कमी होतील. अंतर्बाहय शुद्धी प्रक्रिया मार्गी लागेल. 

सदाचरणाचा अभ्यास. 

परमार्थ मार्गी लागण्यासाठी , स्थिर होण्यासाठी जे सद्गुण आपल्या अंगी असावे लागतात, प्रयत्नाने

धारण करावे लागतात त्याचे वर्णन समर्थ करत आहेत.  “अती लीनता” हवी आणि ती स्वाभाविक 

झाली पाहिजे, रामचरित्राच्या अभ्यासातून , थोर व्यक्तींच्या चरित्र प्रसंगांवरून , संत चरित्रातून अशी

तितिक्षेची, सहनशीलतेची , अति लीनतेची अनेक उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. 

साधने मधील येणारे अडथळे विवेकाच्या साहाय्याने कसे दूर करावे याचे मार्गदर्शन आहे. कृतीच शास्त्र

परमार्थात सार आहे. त्या कृती-सातत्याच महत्व सांगत आहेत. विवेक आणि विचार यातील

फरक….. अध्यात्म कर्म, क्रिया सोडायला, टाकायला सांगत नाहीत, तर विवेकाने कर्म, क्रिया पालटायला,

सुधारायला सांगते. या बद्दलची माहिती सोप्या शब्दात या श्लोकांच्या माध्यमातून समजून घायचा

प्रयत्न आपण या  विवेचनातून करू या. 


विजय रा. जोशी. 


Monday, January 17, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 76 ते 80 : ध्वनिफीत




सारांश , श्लोक 76 ते 80 . 

समर्थ सांगताहेत : राघवाची भावना ठेव म्हणजे भाव ठेव याचाच अर्थ त्याचा कोठेही अभाव नाही  हे तुझ्या मनात पक्के असू दे.  संसार, व्यवहार हा जर खरा मानला ,त्यासाठीच जर आपण आपले नित्य वर्तन ठेवले तर हे साध्य होणार नाही. म्ह्णून अंतिम सत्य काय हे पक्के ध्यानात ठेवून त्या अंतिम सत्यासाठी, परमात्म्यासाठी जर आपण जगलो तर चुकीच्या भयाने आपण ग्रस्त होणार नाही. आणि चुकीच्या ध्येयांची धारणा आपल्या जीवनात स्थिर होणार नाही. 

आपल्या जीवनातील घात टाळण्यासाठी योग्य ध्येय, योग्य साधन, योग्य हेतू, योग्य सुख-संकल्पना असाव्यात आणि त्यावर स्थिर रहाण्यासाठी मत्सरासारख्या  वाईट विकारांना प्रयत्नपूर्वक दूर ठेवावे असे मार्गदर्शन आपल्याला येथे समर्थ रामदासस्वामी करीत आहेत. 

थोडक्यात आपले वर्तन दोष कमी होण्यासाठी असमतेच्या जीवनाकडून समतेच्या जीवनाकडे आपण निरंतर प्रवास, प्रगती करीत राहावे. 

आपल्या भाग्याने आपल्याला या आर्जवाचे आवाहन भिडावे, त्याप्रमाणे आपल्या हातून कृती व्हावी अशी आपण समर्थ चरणी प्रार्थना करू या. 

हा संदेश सविस्तरपणे या ध्वनिफितीत ऐकावा आणि  योग्य वाटल्यास इतरांशी शेअर करावा ही नम्र विनंती. 


विजय रा. जोशी. 



Tuesday, January 4, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 71 ते 75 : ध्वनिफीत




सारांश श्लोक ७१ ते ७५. 

साधनेत वर्तन काटेकोरपणे जपायला हवे.  प्रथम आपण चुकत आहोत हेच माणसाला मान्य नसते.  पण कोणत्यातरी निमित्ताने काही तरी करायला हवे याची तीव्र जाणीव होऊ लागली तर माणूस उपायांकडे बघतो. अशा लोकांस मार्गदर्शन करणारे मनाचे श्लोक (७१ - ७६), “प्रभाते मनी राम चिंतीत जावा” असा उपाय देतात. 

नामस्मरणांनी लगेच हे दोष जातील का ? तर नाही मग त्याने काय होईल? हळूहळू आपल्या दोषांची जाणीव होते. इतरांचे दोष पाहणे कमी होते. पैसे लागत नाही, कष्ट होत नाहीत . एकाग्रतेने, नम्रतेने, भगवंताची आळवणी करायची. 

पण येथे काय मागायचे ? तर शाश्वत सुख, भगवंताशी एकरूपतेचा आनंद. बाकी काही भौतिक, सांसारिक सुख मागायचे नाही. नामस्मरणासाठी साधने, संपत्ती , कार्य-कर्म काही लागत नाही जर काय लागत असेल तर तो भगवंत प्राप्तीचा संकल्प, निर्धार, आस !!  

जर हे पटत नसेल तर सर्व अभ्यास स्वतः करावा, स्वतः करणे होत नसेल तर सद्गुरू शोधावे, सद्गुरूंची परीक्षा आपल्या बुद्धीप्रमाणे करून घ्यावी. आणि एकदा सर्व शन्का फिटल्या कि मग मात्र त्यांचा उपदेश, त्यांचे सांगणे बिनशर्त पाळावे, त्यात संशयी वृत्तीने , विविध सबबीने बाधा आणू  नये. 

समर्थ आपल्याला सांगत आहेत ते असे – 

दिवसाची सुरवात रामनामाने करा आणि दिवसभर रामनामाच्या निष्ठेने वैखरी, प्रकट बोलणे, वागणे करत प्रत्येक दिवस साजरा करीत जा. या श्लोकांतील संदेश आपल्याला उचित मार्गदर्शन करतो. 

श्रीराम II


विजय रा. जोशी. 


Monday, December 27, 2021

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 66 ते 70 : ध्वनिफीत




सारांश श्लोक ६६ - ७०. 

सत आणि असत यातील सत घ्यावे असत टाकावे असे कितीही सांगितले तरी असत संसार हाच सत वाटल्यामुळे माणूस संसारात गुंतूंन राहातो. राघवाचे ध्यान करा असे सांगतांना तो राघव कसा आहे याचे वर्णन हे श्लोक करतात .

सावळ्या  वर्णाचा , अतिशय सुंदर, धैर्यवान आहे, शांत आहे, स्थितप्रज्ञ असा आहे. लहानपणी अनेक राक्षसांचा यज्ञ संरक्षणासाठी  सामना करावा लागला, राज्याभिषेक व्हायच्या क्षणी वनवासात निघावे लागले, वनवासात अतिशय खडतर जीवनक्रम कंठावा लागला, रावण वध झाला सीतेला अग्निदिव्य करावे लागले . कोठेही चलबिचल झाली नाही (महाधीर गंभीर).

भगवंताजवळ सुख आणि आनंद आहे आणि देण्याची इच्छा पण आहे. ते भयाचे निवारण करतात. पण भक्ती बरोबर जर चुकीचे वागणे आणि हेवा/मत्सर असेल तर भक्ती उपयोगी पडणार नाही. म्ह्णून भक्ताचे वागणे सावध हवे, काळजीपूर्वक चांगुलपणा जपायला, सांभाळायला हवा. 

सद्गुरू निष्ठा , ईश्वर निष्ठा याचे आध्यत्मिक जीवनात खूप महत्व आहे.  त्याने जीवनात वैचारिक अधिष्ठान , स्थिरता प्राप्त होते, साधनेच्या वर्तनाने ती वाढत जाते. म्हणून राम भक्ती जीवनास जोडा. 

प्रत्येक दिवस - प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥ आणि दिवसभर हे अनुसंधान राखून निजतांना सर्व दिवसकार्य रामास समर्पण करून शांत व्हावे आणि निद्रा स्थितीत विलीन व्हावे. 

घरातील ज्येष्ठ व्यक्ती आपुलिकने जसे आपल्याला भले  काय ते सांगतात तसा हा उपदेश आहे. 

काय होत आहे आणि आपण काय करायला पाहिजे , दोन्ही सांगितले आहे. हे सर्व समजून घेण्यासाठी ध्वनीफीत जरूर ऐका . आवडल्यास इतरांना ऐकण्याची शिफारस करा ही  विनंती. 



विजय रा. जोशी. 

 

 



Wednesday, December 15, 2021

मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 61 ते 65 : ध्वनिफीत




सारांश श्लोक 61 ते 65. 

संत सांगतात कि आंनदात रहा. आंनदात जीव आत्म्याजवळ रहातो, दुःख करायला लागला कि जीव देहबुद्धीवर

येतो. पण जेव्हा साधक देहबुध्दीत येतो, निजध्यास सुटून जातो,  तेव्हा मी आणि तू, मी आणि जग अशी

जाणीव सुरु होते,  सर्व दुःख सुरु होतं . 

साधकाला हा साधना-आनन्द प्रयत्नाने मिळवावा लागतो. 

सर्व कामना पूर्ण करते ती कामधेनू. ती कामना पूर्ण करते पण काय मागायचे  ते कळलं पाहिजे. 

आपण संसारातल्या गोष्टी , ज्या अशाश्वत आहेत त्या मागून फायदा नाही. 

शाश्वत गोष्टी मागण्यात खरा लाभ आहे. 

पूर्ण ज्ञानी, कामनारहित, निर्लोभ आणि निर्विषयी असा मनुष्य नसतो हे लक्षात घेऊनच  ‘अतीपणा’ नको 

हे समर्थ सांगतात. काय नसावं आणि काय करावं हे सांगितले आहे. 

भक्ति ऊणे जीवन हे  दैन्यवाणे आहे. 

बाकी सर्व लौकिक संसार अति उत्तम असेल तरीही.  संसाराला परमार्थाची जोड नसेल तर सर्व व्यर्थ आहे, कारण

संसारातील सर्व गोष्टी इथेच सोडून जावे लागणार आहे. येणार आहे ते फक्त भक्तीचे, सत्कार्याचे , सत्कृत्याचे फळ

आणि शुद्ध हेतूमुळे मनावर झालेले संस्कार.

हे सर्व सर्व काळी, सर्व ठिकाणी, सर्व मानव मात्रांस उपयुक्त ज्ञान आहे. 

म्ह्णून संतांच्या उपदेशास ‘अक्षय वांग्मय’ असे म्हणतात. 

कृपया पाठ ऐका आणि आवडल्यास इतरांना ऐकण्याची शिफारस करा. 


विजय रा. जोशी . 


Thursday, September 30, 2021

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 21 ते 25: ध्वनिफीत 




सारांश - श्लोक २१ ते २५. 

(जीवन कसे जगावे : शुद्ध भक्ति-युक्त कर्म करण्याचा प्रयास अखंड करावा) 

आपल्या स्वतःच्या वासना समजून घ्याव्या, त्या शुद्ध हेतूच्या कराव्या आणि मग वासना कमी

करण्याचा अभ्यास करावा. भगवंताची भक्ती पूर्ण श्रद्धेने करावी. भक्तीसाठी हनुमंतासारखा आदर्श

घ्यावा. 

वासना मुक्ती आणि दृढभक्ती या साधनेने अंतकाळ अनुकूल होईल. 

अहंकार आपल्याला बंधनात अडकवतो म्हणून नामस्मरण व शुद्धभक्ति-युक्त कर्म करण्याचा प्रयास

अखंड करावा. 

यावरील सविस्तर विवेचन अत्यंत सोप्या भाषेत आणि गोष्टी, उदाहरणांसह ध्वनिफितीत उपलब्ध आहे. 

जरूर ऐका आणि आवडल्यास इतरांशी शेअर करा. 


विजय जोशी. 




Wednesday, September 15, 2021

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 11 ते 15  : ध्वनिफीत 



श्लोक ११ – १५  : सारांश 

सर्वकाळ सुखी कोणी नाही. पूर्व संचिता प्रमाणे भोग येतात. 

देहबुद्धी कमी करत रहाणे हा मुक्तीचा मार्ग आहे. 

दुष्ट वासना असतील तर कितीही शूर, पराक्रमी व्यक्तींचाही नाश होतो. आणि 

त्यातून जीवन व्यर्थ जाते . 

जन्म होतो, जगात माणूस येतो. जीवनभर पूर्वकर्मानुसार सुख-दुःखे येतात, जातात. 

आणि केव्हातरी हे जग सोडावे लागते. 

हे जग मृत्युभूमी आहे. पण जगणारा माणूस “मृत्यू येणार” हे सत्य विसरतो. 

लक्षात घेत नाही. मग माणसात “मी”, “अहं” आणि “अहंकार” निर्माण होतो.

हे सर्व लक्षात घेऊन जीवन कसे जगावे याचे दिशा दर्शन श्री समर्थ आपल्याला करीत आहेत. 


श्लोकांचे अर्थ विवरण आणि संदेश आपण ध्वनिफितीमध्ये ऐकू शकाल. 



विजय रा. जोशी. 

Wednesday, September 1, 2021

 

मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 6 ते 10.  : ध्वनिफीत 





सारांश - श्लोक ६ ते १०. 

आपण विकार टाळू शकत नाही पण त्यावर लक्ष हवे, स्वतःचे निरीक्षण हवे. हेतुकडे लक्ष हवे. हेतू स्वार्थीनको. समतेचा हवा. स्वतः बरोबर तेवढाच इतरांचा विचार हवा. आणि  विकाराची तीव्रता हळू हळू संकल्पाने कमी करण्याचा प्रयत्न हवा. अहंकार रहित निर्भयता निर्माण करणारे शूरत्व जर आपण अंगी बाणू  शकलो  तर अशा वर्तनाने  इतर लोकांस देखील आपण संतुष्ट, तृप्त आनंदी, शांत करू शकू. तोडणाऱ्या कुर्हाडीला देखील चंदनाचे झाड सुगंधित करते. म्हणून येथे समर्थ म्हणतात तू आयुष्यात चंदन प्रमाणे झिजत कार्य कर.  

कर्मात अपेक्षा असेल तर त्यात शीतलता, पवित्रता  रहात नाही. वडिलार्जित संपत्ती, रेस , लॉटरी, यातून मिळालेली संपत्ती याचा लोभ नको. सुखा मागे दुःख आणि दुःखामागे सुख हे चिरंतन चक्र आहे. दुःखाचे दुःख कमी झाले की सुखाचा ताठा देखील रहात नाही.  आणि मग  यथाकाल अशा विवेकी  वर्तनाने आपण आपल्या स-स्वरुपाशी . आत्मरुपाशी एकरूप होऊ शकू. 


विजय रा. जोशी. 

Wednesday, August 25, 2021

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक १ ते ५.  : ध्वनिफीत 




श्लोक १ - ५. सारांश 

शक्तिरूप शारदा आणि बुद्धीरूप गणेश यांच्या भक्तीच्या सहायाने परमात्म्याचा शोध घ्यावा असा उपदेश समर्थ रामदास स्वामी आपल्याला करीत आहेत. 

मनाला हळू हळू वळवायचे आहे, त्यास जी गोडी लावू तशी लागते. दिवसाची  सुरुवात मन्गलमय झाली की दिवस चांगला जायला मदत होते. याला दिवसभर सदाचाराची जोड द्यावी, दुराचार कमी करावा आणि मग या साधनेच्या वाटचालीत कधीतरी धन्यता आपल्या जीवनात येईल, निदान त्या दिशेने आपली प्रगती घडत राहील. 

रामदास स्वामी मनाला उपदेश करतात - वासना/ इच्छा चांगल्या आहेत, बुद्धी स्वतःसकट सर्वांना न्याय देणारी आहे, आपल्या कर्मात नीतीचा विचार झाला आहे हे सर्व काळजी पूर्वक आयुष्यभर पहा. म्हणजे संचित चांगले घडेल. आत्म विकास घडेल आणि मग प्रत्येक जन्मात उत्तरोत्तर प्रगती होत होत मोक्षाच्या मार्गावर प्रगती घडेल. 

देहबुद्धीपोटी स्वार्थ येतो. कळत नकळत कृती घडते , इतरांना त्रास होतो. पुण्यकर्म जाणीवपूर्वक करत राहिले पाहिजे. इतरांना त्रास देण्याची, पीडा देण्याची, इतरांविषयी बेफिकीर रहाण्याची वृत्ती / बुद्धी , हे टाळण्यासाठी सदैव जागृत रहायला हवे. देव आपल्या सर्व कृती पाहात असतो हि जाणीव, हे भान ठेवायचे म्हणजे मग सत्यसंकल्पात मन/ बुद्धी स्थिर राहील. उपासना आणि व्यवहार, प्रपंच आणि परमार्थ  याची सांगड घालणारे उपाय मनाचे श्लोक आपल्यासमोर मांडतात. 

या श्लोकांची मांडणी करणारे हे विवेचन ऐकून आपल्यास आवडले तर लिंक share करा आणि मनाच्या श्लोकांचा ज्ञान गुणाकार करा ही नम्र विनंती.. 


विजय रा. जोशी. 




Wednesday, August 18, 2021

मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

प्राथमिक माहितीचा पाठ : ध्वनिफीत 




समर्थांनी आजन्म राष्ट्रोद्धाराची चिंता केली . स्वतः विवाह केला नाही पण राष्ट्राचा प्रपंच निष्ठेने केला. शिस्तीने, व्यवस्थेने, मर्यादेने वागण्याचा कित्ता घालून दिला. उपासनेचे स्फुल्लिंग पेटविले.धर्माची पुनर्स्थापना केली. आणि शुद्ध अध्यात्म जागविले. श्रीराम गर्जनेसह भारतवर्ष दणाणून सोडले. जन-प्रबोधनार्थ अफाट ग्रंथरचना केली. अकरा मारुतींची प्राणप्रतिष्ठा करून मठस्थापना केली . मोठा शिष्य सम्प्रदाय निर्माण केला. अशा या थोर योग्याने आपल्या मुखाने निर्माण केलेल्या अत्यंत महत्वाच्या असलेल्या साहित्यामध्ये २०५ मनाच्या श्लोकांचा समावेश होतो. 

पारतंत्र्यामुळे मरगळ आलेल्या राष्ट्रात स्वाभिमाचा आणि अभ्युत्थानाचा अंगार उत्पन्न
करणाऱ्या समर्थांचे कार्य निःसंशय ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. त्यांचे राष्ट्र जागृतीच्या कार्यातले
योगदान महत्वाचे आहे, आपण ते कदापि न विसरले पाहिजे. 

राष्ट्राच्या व समाजाच्या निकोप उन्नयनासाठी आणि आत्म-निर्भरतेसाठी त्यांनी संन्यासवृत्तीच्या तसेच
त्यागी संसारी भक्तांची उभारलेली संघटना , धर्म, संस्कृती स्वाभिमान या साठी ठिकठिकाणी स्थापन
केलेलं मठ, तेथील महंतांच्या रूपाने सामाजिक नेतृत्वाचे निर्माण केलेले आदर्श , समाजकंटकांसाठी
निर्माण केलेला धाक, या सर्वांचा स्वराज्य उदयाची पार्श्वभूमी म्हणून खूप मोठा उपयोग झाला.

समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनात प्रज्ञा आणि श्रद्धा, कर्म आणि सन्यास, परोपकार आणि
अनासक्ती, एकांत आणि लोकांत यांचा संगम आढळतो. हीच ज्ञानयुक्त श्रद्धा आधारित कर्म
करण्याची रीत आहे. याचा आदर्श  श्री समर्थांनी जगून दाखवला आहे. त्यांच्या बुद्धीला भ्रामक व
चुकीच्या कल्पनांचा स्पर्श कधीही झाला नाही. त्यांच्या श्रद्धेला ईश्वराहून अन्य वस्तू कधी रुचली
नाही. ईश्वरावरील अविचल श्रद्धेमुळे ते संकटात कधी डगमगले नाहीत. भयाने, चिंतेने त्यांच्या
मनास कधीच भ्रष्ट केले नाही. श्री रामरायास आपले जीवन सर्वस्व मानल्याने या जगातील सुखे,
संपत्ती त्यांनी कस्पटास्मान लेखली. त्यामुळे ईश्वरी सामर्थ्य त्यांच्या कर्तृत्वातून झळकले. पण 
‘कर्ता राम आहे’ अशी शंभर टक्के खरी भावना बाळगल्यामुळे जगात मोठेपणाच्या जाळ्यात ते
अडकले नाहीत. अखेरच्या क्षणापर्येत ते ‘रामाचा दास’ राहिले.

अशा श्री समर्थांनी श्रीरामावर प्रेम केले, त्याचे अखंड नाम जपले. त्याचे अखंड अनुसंधान सांभाळले.
या अभ्यासाने त्यांचे मन अतिशय शुद्ध व पवित्र झाले. तेव्हा श्रीरामाच्या कृपेने त्यांना
आत्मसाक्षात्कार झाला. त्या साक्षात्कारातून त्यांना परमानंद मिळाला. तो आनंद सर्वांना भोगायला
मिळावा हि तळमळ त्यांना लागली. 

आनंदाचा अनुभव घेणारे मन कसे तयार करावे हे समजावून सांगण्यासाठी समर्थांनी मनाचे श्लोक रचले. या श्लोकांना त्यांनी “मनोबोध” असेही नाव दिलेले आहे. 

या पाठमालेत आपण मनाच्या श्लोकांचा सविस्तर परिचय घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 
हा प्राथमिक पाठ आहे. 
 

विजय रा. जोशी.