Thursday, May 26, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 116 ते 120 : ध्वनिफीत.




श्लोक ११६ - १२० सारांश. 

या पूर्वी हि बऱ्याच वेळा समर्थांनी आपल्या एखाद्या विधानावर खास जोर द्यायचा या उद्देशाने  त्या विधानावर

 पुन्हापुन्हा श्लोकाच्या शेवटच्या चरणात प्रतिपादन केले होते. 

……'.नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी' . 

हा चरण श्लोक क्रमांक ११६ पासून ते क्रमांक १२५ पर्यंत असा दहा वेळा आला आहे.

देव भक्ताकडे कधीहि दुर्लक्ष करत नाही, त्याची निराशा होऊ देत नाही कारण सच्च्या भक्ताचा  त्याला नेहमी

अभिमान असतो. हे समर्थ वारंवार सांगतात आणि त्यासाठी ते दाखले देखील देतात.

अंबरीष ऋषी, उपमन्यू , ध्रुवबाळ, गजेंद्र हत्ती, अजामेळ, या पौराणिक कथा तसेच विष्णू दशावतारातील

मत्स्य, कूर्म आणि वराह या अवतारांच्या कथा अशा माध्यमातून भगवन्त भक्तांची कशी काळजी घेतात,

विश्व रक्षणासाठी कसे धावून येतात ते समर्थ या ५ श्लोकात समजावून सांगत आहेत. 

या कथा सांगण्यात संदेश एकच, तो म्हणजे भगवंता साठी अशक्य काही नाही. आपले कर्तव्य पूर्ण करा

आणि मग सर्व सद्गुरुंवर सोडा. चिंता सोडा आणि पुढील कार्यास लागा. 

आज सुद्धा असे घडू शकते, घडते पण तो अनुभव घेण्यासाठी आपली साधना तीव्र, तीव्र-तम करायला हवी.

निसर्गाचे नियम, प्रकृतीचे नियम समजून घेऊन आपण या नियमांना आपल्या रोजच्या वर्तनात न्याय

द्यायला हवा. हे  देखील या विवेचनात आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

कृपया एका आणि आवडल्यास  like , share  करा. 

धन्यवाद. 


विजय रा. जोशी 

Wednesday, May 11, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 111 ते 115 : ध्वनिफीत.





सारांश श्लोक 111 ते 115 . 


अनेकदा आपले खरी हीत साधणारी मंडळी आपल्याला आवडत नाहीत. आपली आई, आणि परमार्थातील आपले गुरु हे कटू पण सत्य उत्तम हेतूने आपल्याला सांगत असतात. 

काय मिळवायचे ते शोधले पाहिजे. तसेच काय मिळू शकते पण न घेता ते सोडले पाहिजे याचाही सतर्क राहून शोध घेतला पाहिजे. सर्व गोष्टी योग्य संवादातून मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आत्महित जपणाऱ्या मूक संवादाचे, ‘हे  हृदयीचे ते हृदयी पोहोचणाऱ्या’ हितकारी  संवादाचे महत्व या श्लोकांच्या माध्यमातून आपण समजून घेत आहोत. वाद संपेल , आपल्याला नेमके ज्ञान होईल, खरे ज्ञान होईल, अहितकारक टळेल, असा संवाद हितकारी असतो. 

माणसाच्या पंडितत्वाचा , विद्वत्तेचा, बुध्दीमत्वाचा त्याला त्याच्या अध्यात्मिक प्रगतीसाठी काही उपयोग होत नाही, किंबहुना त्याचा अडथळाच  होतो. परमार्थ क्षेत्रातील मोठेपणा मोजण्याचे निकष वेगळे आहेत. येथे लौकिक विद्येचे महत्व कमी आहे असे विधान नाही. पण त्या पदव्यांमुळे येणार अहंकार मात्र अध्यात्म क्षेत्रात पुढे नेणारा नाही एवढेच. आपल्या साधकत्वाचा, आपल्या सत्संगाचा देखील कधीतरी कोणाला अहंकार होतो. ही देखील अहंता तेवढीच अनावश्यक  आणि अनर्थकारक असते. 

वाद समाप्त करणारा संवाद , जेथून काही तत्व हाती येईल, हितकारी घडू शकेल असा संवाद जरूर करावा. आपली जगाकडे पहाण्याची दृष्टी भोगाची असते, ती ईशभावाची करण्याचा प्रयत्न करावा,

हे सर्व साध्य होण्यासाठी सुसंवाद कसा असावा विसंवाद कसा टाळावा या बद्दल मार्गदर्शन करणारे हे ज्ञान , लौकिक व्यवहारात पण तेवढेच उपयुक्त आहे.                          ‘श्रीराम !!’


विजय रा. जोशी.