Thursday, April 29, 2021

  

गीता अध्याय 16, भाग २, ध्वनी - फीत.



६ वा अध्याय आपल्या रक्तात भिनला पाहिजे. 

अध्याय आत्म-परीक्षणाचा , स्वतःला प्रामाणिकपणे ओळखण्यास सहाय्य  करणारा, आणि स्वतःची गुणात्मक प्रगती घडविण्यासाठी अत्यंत उपयुक्त. एखादा एखादी गोष्ट उत्तम शिकला उदा गायन, अभिनय तर आपण म्हणतो कला त्याच्यात पूर्ण भिनली आहे. ज्ञान, शौर्य, भीती त्याच्या रक्ताच्या थेंबा थेंबात आहे असे आपण वेगवेगळ्या व्यक्तींच वर्णन करतो. या पद्धतीने आपल्या चितात हा अध्याय धारण करायला हवा.
  

भौतिक जीवन व भोग वृत्ती. 

भौतिक जीवनही कामाला ताब्यात ठेवूनच सुखी होईल असे गीतेचे सांगणे आहे. स्त्री-पुरुष संबंध उत्तरोत्तर उच्च करायचे असतील तर मन/आत्म्याचा विचार हवा. ज्या समाजास फक्त शरीर सुखातच धन्यता वाटते  त्या समाजाची उत्साहशक्ती, जीवनशक्ती, धारणाशक्ती या नष्ट झालेल्या दिसतात. 

मानवा-मानवाशी असलेले संबंध जर उन्नत व विकसित करायचे असतील तर काम, क्रोध, लोभ रहीत (संयमित) समाज व व्यक्ती व्हावी अशी भगवंतांची इच्छा आहे.

या संयमाचे शास्त्र संतांच्या जीवनात, अनुभवात आपणास दिसेल. 

स्वतःच्या जीवनात प्रयोग करून संतांना जे सिद्धांत लाभले, त्याचे शास्त्र बनते.

आम्ही वैकुंठवासी | आलो याचि कारणासी | बोलिले जे ऋषि | साच भावे वर्ताया |

झाडू संतांचे मारग | आडरानी भरले जग | उच्छिष्टाचा भाग | शेष उरला तो सेवू |

अर्थे लोपली पुराणे | नाश केला शब्दज्ञाने | विषयलोभी मने | साधने बुडविली |

पिटू भक्तीचा डांगोरा | कळिकाळासी दरारा | तुका म्हणे करा | जयजयकार आनंदे || ५२०||

आसुरी संपत्ती टाळावी व दैवी संपत्ती कवटळावी. सद्गुण अंगी बाणल्याने वैयक्तिक विकास साधला, व्यक्ती विकास साधला तरी समष्टीचा विकास रहातोच. व्यक्तीने आपला विकास साध्य करत समाज, राष्ट्र यांतील लाखो व्यक्तींच्या विकासास सहाय्यभूत  व्हायचे असते.

जीव, जगत , जगदीश यांचे संपूर्ण पणे ज्ञान व संबंध करवून देते ते शास्त्र. जीवन म्हणजे काय ते समजावून आपल्याला खऱ्या अर्थाने जीवनात यशस्वी होण्यास मदत करणारे, ते शास्त्र. म्हणून शास्त्र सोडून चालणार नाही. 

दैवी गुण अंगी येण्यासाठी अखंड साधना

असतो  मा सतगमय I तमसोमा ज्योतिर्गमय I 

मृत्योर्मा अमृतमगमय I 

असत, तमस व मृत्यू या माझ्या स्थिती आहेत त्यातून मला सत , ज्योती व अमृत व्हायचे आहे. म्हणूनच मला प्रयत्नशील रहायला हवे असे समजून खरा साधक आत्मविश्वासाच्या बाबतीत,प्रभुकार्याच्या बाबतीत सतत प्रयत्नशील असतो. आणि दैवी गुण अंगी येण्यासाठी अखंड साधना करतो.  

माणसाचे मन कसे आहे, कसे असावे हे १६ व्या अध्यायात कळत.

त्याच मर्म असं आहे की ..माणसाने असं वागावं, त्याच मन असं असाव, की शेवटी ‘आसवं’ गाळण्याची पाळी येऊ नये. साधनात मी गुंतून पडू नये. आणि साध्याचा विसर मला कधी पडू नये. जो संपत्तीला, साधनाना आदराने वागवितो त्याचा कधी अनादर होत नाही. या अध्यायातले सर्व विचार स्वतःचे सर्वांगीण प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त वाटतील. 



विजय रा. जोशी. 



गीता अध्याय 16, भाग २, ध्वनी - फीत.




  गीता अध्याय 16, भाग १, ध्वनी - फीत.



गीताशास्त्र सर्वांना उपयोगी : उच्च आणि नीच स्थिती मधील सर्व माणसांसाठी.




हे सर्व आदर्शवत आहे. पण सर्वसामान्यांनी येथ पर्येंत पोहोचण्यासाठी काय केले पाहिजे, वास्तविक परिस्थिती काय आहे, हे समजावून घेण्यासाठी १६ वा अध्याय उपयुक्त आहे. कारण येथे मानवाची उच्च स्थिती (दैवी संपत्ती) आणि नीच स्थिती (आसुरी संपत्ती) याचे दर्शन घडविले आहे. आणि मग नीच स्थितीकडून उच्च स्थितीकडे जाणे कसे आवश्यक आहे तेही समजावून सांगितले आहे. 

कुरुक्षेत्र बाहेरही आहे आणि आपल्या मनातही आहे. सूक्ष्म रीतीने पाहिले तर जो झगडा मनात असतो तोच बाहेर आपणास मूर्तिमंत दिसत असतो. बाहेर जो शत्रू उभा आहे तो माझ्याच मनातील विकार साकार होऊन उभा आहे. जागेपणाचे विचार जसे मला स्वप्नात दिसतात तसे मनातील विचार मला बाहेर (बाह्य जगात) दिसतात. आपल्या अंतःकरणात एका बाजूला सद्गुण तर दुसऱ्या बाजूस दुर्गुण उभे आहेत. या दोन्ही मिळून आपले व्यक्तिमत्व साकार झाले आहे. जे खरे युध्द आहे ते आंतच आहे. १६ व्या अध्यायात आत्म-परीक्षण करण्या साठी भरपूर माहिती उपलब्ध आहे.

जडवाद, निरीश्वरवाद आणि भोगवाद.

केवळ स्वार्थ साधण्याची प्रवृत्ती असते. त्याकरताच बुद्धीचा उपयोग केला जातो. असुरी लोक समजतात की ‘स्वार्थ साधला कि सगळे झाले’. व आपल्या स्वार्थाला अनुरूप प्रवृत्तीत ते मग्न असतात. त्यांच्या अशा प्रवृत्तीमुळे त्यांच्यावर कसलेही बंधन किंवा अंकुश नसतो. व यांना कोठल्याही आचारसंहितेची गरज वाटत नाही. जसा स्वार्थ साधेल तसेच काम करणे हि त्यांची सहज प्रवृत्ती असते. आणि म्हणून, ज्यामुळे स्वार्थही साधला जाऊन आत्मिक विकास देखील घडू शकेल असे प्रवृत्ती व निवृत्तीचे सिद्धांत त्यांना मान्य नसतात. 

माऊलींचे जनप्रेमी कोमलहृदय. 

 आसुरी संपत्तीच्या लोकांना ज्या थोर यातना भोगाव्या लागतात त्याचे वर्णन करतांना श्रीज्ञानदेवांच्या अंगावर शहारे येऊन त्यांची वाणी रडकुंडीला आलेली दिसते व ‘हे असुरी लोक का बरे असे वागतात? असे निराशेचे पण कळवळ्याचे उद्गार त्यांच्या मुखातून निघतात. (४१७-२४)

म्हणोनि तवा धनुर्धरा,I  नोहावे गा तिया मोहरा I  

जेवता वासू असुरा I संपत्तीवन्त II (४२३) 

आणि दंभादी दोष साही I हे संपूर्ण जयांच्या ठायी I 

ते त्यजावे हे काई I  म्हणो कीर II (४२४)

म्हणून अर्जुना ! ज्या ठिकाणी आसुरी संपत्तीवाल्यांचे राहणे असेल , त्या बाजूला तू जाऊ नकोस. आणि दंभादी करून सहा दोष सर्वांच्या सर्व ज्यांच्या ठिकाणी असतील , त्यांचा त्याग करावा, हे खरोखरच सांगितले  पाहिजे का ? (४२३-२४)

बुडते हे जन न देखवे डोळा I येतो कळवळा म्हणउनी : संत  तुकाराम 

“आसुरी  गुणांचा त्याग करून दैवी गुणांचा अंगीकार करावा ”  हा संदेश श्रीकृष्ण भगवान यांचे पासून माउली , तुकोबाराय आणि अनेक संत महात्मे आपल्या पर्येंत पोहोचविण्याचा असा अथक प्रयत्न करत आहेत.  स्वतःचे जीवनात तसे वर्तन करून आपल्यासमोर आदर्श ठेवत आहेत , त्यांच्या पुण्यकार्याला मनोमन वंदन करून त्यांचा उपदेश आपल्या जीवनात शक्य तेवढा उतरविण्याचा संकल्प आपण करू या. 

या अध्यायातील वरील सूत्राला धरून केलेले विवेचन आपणास नक्कीच उपयुक्त वाटेल अशी खात्री आहे. 


विजय रा. जोशी 



गीता अध्याय 16, भाग १, ध्वनी - फीत.


Thursday, April 22, 2021

 

गीता अध्याय 15, भाग २, ध्वनी - फीत.


जग – श्लोक   ( १ ते ५). जीव –  श्लोक (६ ते 11).

हा भाग पाहून झाला. आता पुढील भाग :

जगदीश –  (श्लोक   १2 ते १५). जगदीशाचे श्रेष्ठत्व. –(श्लोक  १६ ते २०).


या संसारात क्षर आणि अक्षर असे दोन पुरुष आहेत. सर्व भुते म्हणजे क्षर, आणि मायोपाधीने (माया -उपाधीने)  
युक्त असे जे चैतन्य त्यास अक्षर असे म्हणतात. (१५/१६)

पण या दोहोंहून वेगळा, ज्याला परमात्मा असे म्हणतात, जो त्रैलोक्यात प्रवेश करून त्यास धारण करतो व जो अव्यय व ईश आहे, असा उत्तम पुरुष आहे. (१५/१७) 

ज्या अर्थी मी (परमात्मा) क्षराच्या पलीकडचा आहे आणि अक्षराहून देखील उत्कृष्ठ आहे  , त्या अर्थी (म्हणून) जगामध्ये आणि वेदामध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे.  (१५/१८)

जो ज्ञानी; या प्रकारे मला, पुरुषोत्तमाला जाणतो, तो सर्वज्ञ होय. तो (स्वतः सकट सर्व माझे स्वरूप आहे असे जाणून ) सर्व प्रकारे माझी भक्ती करतो.    (१५/१९)

हे पापरहिता, या प्रमाणे हे अत्यंत गुह्य शास्त्र मी तुला सांगितले. याचे ज्ञान करून घेऊन मनुष्य बुद्धिमान आणि कृतकृत्य होतो. (१५/२०).

हे शास्त्र तसे अवघड आहे. भगवंतांनी ते सोपे करून सांगितले आहे , तरी ते आपल्या डोक्यात उतरत नाही. श्रोता व वक्ता यांचा हृदयाचा मिलाफ झाला तरच गीता कळेल. भगवंत सांगतात, हे समजून घे, बुद्धिमान हो. बुद्धिमान याचा अर्थ शहाणा हो असे नाही, विद्यापीठात पहिला नम्बर मिळव असाही नाही, तर बुध्दीवान हो याचा येथे अर्थ ‘आत्मसाक्षात्कारी हो’ असा आहे. 

एकीकडे भोगशक्ती आहे, दुसरीकडे ज्ञानशक्ती आहे, त्यात बुद्धी ‘अहं ‘ ला पकडून भोगशक्तीकडे न वळता ज्ञानशक्तीकडे वळली तर बुद्धिमान होता येईल. आपण आत्मसाक्षात्कारी व्हावे आणि कृतकृत्य व्हावे असे सूचित  करून भगवंतांनी हा अध्याय पूर्ण केला आहे. 

मनुष्याचा आत्म विकास कसा होतो / व्हावा - हे सर्व या अध्यायात भगवंतांनी समजावले आहे. हि शिकवण सर्व मानवमात्रांस उपयुक्त आहे. त्या संबंधी माहिती आपण ऐकाल. 



विजय रा. जोशी. 




गीता अध्याय 15, भाग २, ध्वनी - फीत.


 

गीता अध्याय 15, भाग १, ध्वनी - फीत.  



मी कूठून आलो?  हे सर्व जग कुठून आलं ?




माझा जन्म आई/वडिलांमुळे झाला. त्यांचा ; त्यांच्या आईवडिलांमुळे,  असे मागे मागे जात राहिले तर आपण आदी-मानव पर्येंत पोहोचतो, मानवाचे निर्माण एक पेशीय जीवापासून झाले असे विज्ञान सांगते. अमिबापासून माणूस बनला. पण अमिबा कशातून बनला? जगातल्या पहिल्या  पेशींचे निर्माण कसे झाले त्याचे उत्तर शोधतांना  आपण, व्हायरस, आणि कोअसर्व्हेट ड्रॉप्स (विशिष्ठ प्रकारचे सेंद्रिय क्षारयुक्त जलबिंदू) येथे पोचतो. (संदर्भ -  पुस्तक Mind Power by Swami Vijnananand). 

त्या जलबिंदूंची निर्मिती  पृथ्वीमुळे. पृथ्वीतील गोष्टींमुळे. 

पृथ्वी -- सूर्य, -- सविता देवता --  परमात्मा का तेजपुञ्ज ब्रह्म

तर अशा तर्हेने आपण स्वतःचा विचार करताना मूलगामी शोध घेतला तर परमात्म्या पर्येंत पोहोचतो. या सर्व शोध जिज्ञासेची पूर्ती करायची असेल तर गीता मार्गदर्शन करण्यास सदैव उभी आहे . ते या गीतेच्या शेवट ६ अध्यायात (विशेषतः अध्याय  १३ते  १५ मध्ये) दिलेले आहे म्ह्णून यास ज्ञान कांड / ज्ञान योग असे म्हणतात.  

येथे असे सांगितले आहे कि तुम्ही ‘पुरुषा’ चे अंश (क्षेत्रज्ञ अंश) आहात  तर देह हा प्रकृतीचा अंश (क्षेत्र-अंश) आहे.आणि पुरुष आणि प्रकृती  हि परमात्म्यापासून निर्माण झाली आहे. फक्त तुम्हीच नाही , तर या विश्वात जे जे म्हणून काही आहे ते ते सर्व या क्षेत्र / क्षेत्रज्ञ यापासून बनले आहे. म्हणजेच परमात्म्यापासून बनले आहे.  पण एवढे असून तो परमात्मा कशातही अडकलेला नाही, या सर्व गोष्टींच्या तपशिलांवर प्रकाश टाकणारे हे अध्याय आहेत. हे ज्ञान विचारांच्या म्हणजेच बुद्धीच्या पलीकडे आहे. स्वतःला खऱ्या स्वरूपात पहाण्यासाठी रोज काही काळ ध्यान हा उपाय.

चित्तशुद्धी अनिवार्य

भगवान सांगतात कि या देहात रहाणारा जीवात्मा माझाच सनातन अंश आहे. (माझा चि अंश संसारी झाला जीव सनातन १५/७). त्रिगुणमयी मायेत राहून तो मना सहित पाच इंद्रियांना खेचतो. मग सांगतात कि जीवाचे स्वरूप ओळखण्यासाठी चित्त-शुद्धी व्यतिरिक्त कोठलेही साधन नाही. कधीकधी केवळ बौद्धिक प्रक्रियेने , श्रावण-मननाने ज्ञान होते, 

परंतु चित्त-शुद्धी नसेल तर ते टिकत नाही. अनेक लोक श्रद्धवान असूनही चित्तशुद्धीचे महत्व ओळखत नाहीत असे विनोबाजी सांगतात. चित्त शुद्धी कशी साधायची हे पुढील भागात पाहू .


विजय रा. जोशी. 




गीता अध्याय 15, भाग १, ध्वनी - फीत.

   

Friday, April 16, 2021

 

गीता अध्याय १४, भाग २, ध्वनी - फीत


आपण सात्विक/राजस कि तामस ?




विषयांचा (wantedness) आपल्यावर जितका परिणाम होतो / न होतो, तसेच जितके अहम व आत्मा यांचे अनुसंधान (co-ordination) झालेले असते वा नसते , तितक्या प्रमाणात आपण सात्विक / राजस किंवा तामस ठरणार.अशा तऱ्हेने सतत जागृत राहून (आत्म्याचे अहमशी अनुसंधान ठेऊन) आपले संतुलन सतत ठेवणे ही साधना होय. मी म्हणजे देह ही वृत्ती नैसर्गिक आहे, साधनेने, प्रयत्नाने मी देह नाही तर आत्मा आहे ही जाणीव विकसित करावी लागते . त्यासाठी रोज स्वतः कडे अलिप्ततेने पहायला हवे , म्हणजेच आत्म-परीक्षण करायला हवे . स्वतःचे खरे रूप त्रयस्थ पणाने ओळखून घ्यायला हवे व प्रगतीसाठी प्रयत्न करायला हवे.

शास्त्रात संयम ही एक गोष्ट कसोटी म्हणून सांगितली आहे. मी बाह्य  विषयांपासून दूर राहू शकतो की नाही? (इच्छ्यांपासून अलिप्त होऊ शकतो की नाही?) असा प्रश्न निर्माण होतो तेंव्हा प्रयत्न/आभ्यास करण्यासाठी माणूस कितीतरी गोष्टी सोडू लागतो. यास संयम असे म्हणतात. आपला स्वभाव आपण केलेल्या कृतीने बनत असतो. कृती बदलाने , शुद्ध हेतूच्या निग्रहाने आपण तो बदलू शकतो (तम--रज--सत्व). 

स्व-व्यवस्थापन म्हणजेच गुण व्यवस्थापन. यासाठी संयम, निग्रहाने स्वतःत बदल घडवणे आवश्यक असते. १४ व्या अध्यायात भगवंत हे मार्गदर्शन करतात. या ध्वनिफितीत त्याचे वर्णन आहे. 


विजय रा. जोशी. 



गीता अध्याय १४, भाग २, ध्वनी - फीत


 

गीता अध्याय १४, भाग १, ध्वनी - फीत


एकाच प्रकृतीपासून नानाविध सृष्टी, विशेषतः सजीव सृष्टी  होते याचे आणि विश्व, 

विश्व-निर्माता  आणि मी यात काय नाते/संबंध  आहे? याचे या अध्यायात भगवंत निरूपण करतात. क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे वर्णन केल्यावर प्राणिमात्राला संसारात ओढणारी प्रकृती, तिच्या गुणांची उत्पत्ती, तिचे कार्य, तिचे धर्म, तिचे स्वभाव वगैरे सांगणारा व या त्रिगुणांच्या अतीत कसे व्हायचे हे समजाऊन सांगणारा  हा अध्याय आहे.



श्लोक ५ ते १८   सत्व, रज, तम या तीन गुणांचे वर्णन आहे.

श्लोक १९.       आत्म्याचे निर्गुणत्व सांगितले आहे.

श्लोक २१.       अर्जुन त्रिगुणातीत (माणूस) कसा असतो असे विचारतो.

श्लोक २२ ते २७  त्रिगुणातीताचे वर्णन भगवान करतात.

जशी व्यक्ती आपल्या गुणाने (वर्तनाने) प्रकट होते तशी ही सर्व चराचर सृष्टी (प्रकृती) त्रिगुणांनी प्रकट होते. या संबंधी हा अध्याय आहे.

सत्व, रज, व तम हे तीन गुण सर्व पदार्थांच्या मूलद्रव्यात म्हणजे प्रकृतीत प्रारंभापासून असतात.  या ती गुणांपैकी प्रत्येकाचा जोर आरंभी सारखाच असल्यामुळे प्रथमतः प्रकृती समावस्थेत असते. हि साम्यावस्था जगाच्या आरंभी होती. व जगाचा लय झाला म्हणजे पुनः येईल. साम्यावस्थेत काही हालचाल नाही, सर्वस्तब्ध असते. पण पुढे हे तीन गुण कमीजास्त होऊ लागले म्हणजे प्रवृत्यात्मक रजोगुणामुळे मूळ प्रकृतीपासून निरनिराळे पदार्थ उत्पन्न होऊन सृष्टीला आरंभ होतो. 

मूळ प्रकृती एक असताना हे नानात्व कसे निर्माण होते याचा जो विचार त्याला विज्ञान म्हणतात. व यातच सर्व अधिभौतिक शास्त्रांचा समावेश होतो. माणूस देखील त्रिगुणात्मक आहे. प्रत्येक माणसामध्ये तिन्ही गुण असतात. पण त्यापैकी एक इतर दोहोंपेक्षा वरचढ असतो. या वरचढ गुणा प्रमाणे प्रत्येक माणूस हा सत्वगुणी, रजोगुणी अथवा तमोगुणी मानला जातो.

या सर्वांचे तपशीलवार वर्णन समजण्यासाठी हि ध्वनी फीत जरूर ऐका . 


विजय रा. जोशी. 



गीता अध्याय १४, भाग १, ध्वनी - फीत


Tuesday, April 13, 2021

 

गीता अध्याय १३, भाग 2 , ध्वनी - फीत


ज्ञानाचे ज्ञान, ज्ञान म्हणजे काय, ज्ञान कुणाचे घ्यायचे/ज्ञानेय , ज्ञान घेण्याची प्रक्रिया, ज्ञानी लक्षणे, अज्ञानी लक्षणे, परमेशवराचे व्यक्त, अव्यक्त स्वरूप आणि समन्वय, क्षेत्र, क्षेत्रद्न्य, पुरुष, प्रकृती, इत्यादी. हवेत उड्डाण करण्यासाठी पक्षाला पंख आणि शेपटी दोन्ही हवे. तसे माणसाला अध्यात्मिक भरारी घेण्यासाठी ज्ञान / भक्तीचे पंख आणि कर्माची शेपटी लागते, सर्वांची आवश्यकता आहे, ध्येय एकच आहे. 



क्षेत्र/शेत - शेतात जे पेरू ते उगवते तसेच आपण जे कर्म आयुष्यात करू , त्याप्रमाणे कर्मफळ संचित होते आणि यथाकाल प्रारब्ध रूपाने आपल्यास भोगावे लागते . (क्रियमाण, संचित आणि प्रारब्ध)  आपले क्रियमाण कसे सुधारावे, याचे उत्कृष्ठ ज्ञान गीता देते. 

नम्रता दंभ-शून्यत्व , अहिंसा ऋजुता क्षमा 

पावित्र्य गुरु-शुश्रूषा , स्थिरता आत्मसंयम.              १३/७

निरहंकारिता चित्ती , विषयांत विरक्तता 

जन्म-मृत्यू-जरा-रोग - दुःख-दोष-विचारणा             १३/८

निःसंग वृत्ती कर्मात, पुत्रा दींत   अलिप्तता 

प्रिय-अप्रिय लाभात , अखंड समचित्तता                १३/९

माझ्या ठाई अनन्यत्वें , भक्ती निष्काम निश्चळ 

एकांताविषयी प्रीती , जन-संगात नावड                 १३/१०

आत्म-ज्ञानी स्थिर श्रद्धा , तत्वतां ज्ञेय दर्शन 

हें ज्ञान बोलिले सारे , अज्ञान विपरीत जे                 १३/११. 

ज्ञान - म्हणजे बुद्धीला अमुक अमुक कळणे असे न सांगता  मान व दंभ सुटणे , अहिंसा ,अनासक्ती, सम-बुद्धी इत्यादी वरील पाच श्लोकात सांगितलेले 18  गुण मनुष्याचा अंगात दृष्टीस पडू लागले म्हणजे त्यास ज्ञान म्हणावे अशी ज्ञानाची व्याख्या वरील श्लोकांत केली आहे.  क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांची ओळख पटली पाहिजे. मी कोण आहे? आणि मी कशात रमायला पाहिजे? याचा विवेक एकदा झाला पाहिजे. मला काय पाहिजे? या पेक्षा मला काय हव असायला पाहिजे? याचा विवेक आयुष्यात एकदा जागरूक झाला, की निराळ काही मिळेल. 

खोट्या अहंकारा पासून मुक्ती.

तू खरा कोण आहेस ते ओळखायला शीक. तू भोवती जे खोट्या अहंकाराच वलय निर्माण केल आहेस त्या पासून मुक्त कसा होशील ? कवीने म्हंटले आहे. 

कुणी न येथे भला-चांगला, जो तो पथ चुकलेला, जग हे बंदिशाला.

ज्याची त्याला प्यार कोठडी    कोठडीतले सखे सौंगडी

हातकडी की अवजड बेडी, प्रिय हो ज्याची त्याला प्रिय हो ज्याची त्याला जग हे बंदिशाला

जो तो अपुल्या जागी जखडे    नजर न धावे तटापलीकडे    उंबरातले किडेमकोडे, उंबरीं करिती लीला .

सत्याचे ज्ञान.

तू ज्याला चिकटून बसला आहेस, तो देह तुझा नव्हे , एवढ तू ज्ञान  करून घे. तू देह फक्त एक साधन म्हणून घेतला आहेस. त्या साधनाचा तू अवश्य .वापर कर. त्या देहाच कल्याण करण्याची आवश्यकता आहेच. देह तुला चिकटायला आलेला नसून तू देहाला चिकटला आहेस. आणि  ज्या क्षणी तुझे हे चिकटणे संपेल, त्यावेळी तो देह दुखी होणार नाही.

ही जाणीव तुम्हाला सूक्ष्म अभ्यासाने, ज्ञानाने होते. त्याने हातून चांगले कर्म घडते. आणि मग तुम्ही पराक्रमाकडे पोहोचता. हा १३ व्या अध्यायाचा सारांश आहे. तो लक्षात घेऊ आणि त्या प्रमाणे काम करू.


विजय रा. जोशी . 


गीता अध्याय १३, भाग 2 , ध्वनी - फीत


Saturday, April 10, 2021

 

 गीता अध्याय १३, भाग १ , ध्वनी - चित्र फीत



तेराव्या अध्यायात जे पहायचे आहे ते स्वधर्माचरणास फार उपयुक्त आहे. 




व्यासांनी आपल्या जीवनाचे सार भगवत्गीतेत ओतले आहे.  महाभारताची संहिता लाख, सव्वा लाख आहे. आपण गीतेचा अभ्यास करत आहोत  त्यातील मुख्य उद्देश हाच कि जीवनात ज्या ज्या वेळेला आपणास मदतीची आवश्यकता असेल त्या त्या वेळेला गीतेपासून ती मिळावी. अशी मदत आपल्याला सदैव मिळण्यासारखी आहे. गीता हे जीवन उपयोगी शास्त्र आहे. म्हणून गीतेमध्ये स्वधर्मावर जोर दिला आहे. तेराव्या अध्यायात जे पहायचे आहे ते स्वधर्माचरणास फार उपयुक्त आहे. 


जीवन = जड (शरीर) व अजडाची (मन) एकत्रता.


तेराव्या अध्यायाच्या प्रारंभा पासून जीव हा भौतिक प्रकृतीच्या संपर्कात 

कसा येतो , कर्म, ज्ञान, भक्तीच्या अधाराने भगवंत जीवाचा कसा 

उद्धार करतात याचे विवरण करण्यात आले आहे. जीवात्मा हा जरी शरीरा पासून भिन्न असला तरी कोणत्या ना कोणत्या रीतीने त्याचा देहाशी संबंध येतो त्याचेही विश्लेशण करण्यात आले आहे.

आंतरिक शोध घेताना , म्हणजेच आत्म्याचे ज्ञान प्राप्त करीत असताना केवळ बुद्धी उपयोगी पडत नाही. जन्मो-जन्मी झालेल्या संस्कारांमुळे बुद्धीवर मलीनतेचा पडदा असतो. हा पडदा जो पर्येंत दूर होत नाही तो पर्यंत आत्म्याचा साक्षात्कार होत नाही.हा पडदा चित्त-शुदधी मुळे दूर होतो. अशी चित्त शुद्धी साधणे म्हणजेच ज्ञान बाकी सगळे अज्ञान.

‘तू आत्मरूप आहेस’ हे पवित्र ज्ञान येथे आपल्यास दिले जात आहे.

तू माझेच अल्पांश् रूप आहेस.आणि या माझ्या रुपाचा नाश करणेचे सामर्थ्य 

कोणामध्येही नाही. हा सूक्ष्म विचार जीवनांतील अनेक भये दूर करणारा आहे.  एक प्रकारचा अद्भुत आनंद मनात निर्माण करणारा आहे.मी देहासाठी नाही तर सद्हेतू साठी, परमेश्वरी कार्यासाठी जगेन. ज्या ज्या वेळी परमेश्वरी तत्व दुषित होत असेल त्यावेळी मी सर्वस्वाने लढेन. आवश्यक वाटेल तर 

या कार्यासाठी मी माझा देह सुद्धा फेकून देईन. परमेश्वरी तत्वाला उज्ज्वल 

करण्यासाठी देहाचा होम करायला मी सदैव तयार असेन...देह हे साधन आहे त्याचा उपयोग संपेल त्या दिवशी हा देह फेकून द्यायचा आहे. आत्म्याच्या (स्वतःच्या) विकासाची ही युक्ती भगवान येथे सांगत आहेत. या अध्यायात देहाचा व तो देह ज्याच्या सत्तेने चालतो त्या पुरुषाचा विचार केला आहे. ह्यालाच क्षेत्र क्षेत्रज्ञाचा विचार असे म्हणतात.


या अध्यायात क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. त्यासाठी हा भाग ऐका . 

 

ज्ञान :  देह – आत्मा यांचे पृथःकरण सत्यासत्य विवेका खेरीज शक्य नाही. हा

‘विवेक’ हे ‘ज्ञान’ अंगी बाणले पाहिजे. ज्ञान याचा अर्थ आपण ‘जाणणे’ असा करतो. परंतु ‘बुद्धीने जाणणे’ म्हणजे ज्ञान नव्हे... फक्त बुद्धीने जाणून भागात नाही. ज्ञान जीवनात भिनले पाहिजे, हृदयांत मुरले पाहिजे ते ज्ञान हात, पाय, 

डोळा (यांच्या कृतीतून) यातून प्रकट झाले पाहिजे. सर्व ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये 

विचार पूर्वक कर्म करीत आहेत असे झाले पाहिजे. भगवंतांनी ‘ज्ञान लक्षणे’ सांगितली आहेत, ‘अज्ञान लक्षणेही’ सांगितली आहेत.  ती पुढच्या भागात बघू,


विजय रा. जोशी 



गीता अध्याय १३, भाग १ , ध्वनी - चित्र फीत