Wednesday, October 30, 2024

 योग ग्रंथ अभ्यास : विषयोग - 11 .  Path 28 ,    2 OCTOBER  2024.

For following Audios in this series  go to youtube channel 

Dnyan Gunakar 

https://www.youtube.com/channel/UCkzjrlbzliRxwyqq5KXYjWw





सारांश :

कामशक्ती सुख न टाकता त्याचे योग्य नियोजन करून ध्यान मार्गाने कामशक्ती समतोल कसा

करावा याचे या ग्रंथातील विवेचन आपल्यासमोर आहे. त्याचा अवश्य उपयोग करून घ्यावा. 

या पुस्तकात दिलेली माहिती एका संपूर्ण आणि सलग योगग्रंथ रचनेचा भाग आहे. तरीसुद्धा या विषयापुरती

माहिती येथे दिलेली आहे. विषय खूप मोठा आणि तो निरनिराळ्या अंगाने  अन्य पुढे येणाऱ्या ग्रंथ विवेचनातून

 समजावून घेणे अधिक उपयुक्त होईल. 


विजय रा. जोशी. 





 योग ग्रंथ अभ्यास : विषयोग - 12 .  Path 29 ,    9  OCTOBER  2024.








सारांश : 

आपल्या शरीरात ७ चक्रे किंवा शक्ती स्थाने आहेत, ज्यातून प्राण शक्ती फिरत असते. या चक्रात
अडकलेली शक्ती आजारांचे कारण ठरू शकते. म्हणूनच प्रत्येक चक्राचा अर्थ समजून घेणे आणि
शक्ती फिरत राहण्यासाठी आपण काय केले पाहिजे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

"शरीराशी संवाद" ही ध्यान पद्धती शांतीचा उपाय म्हणून योग ग्रंथात उपाय म्हणून सुचविली आहे. त्या संबंधी 
साधकांसाठी सर्व आवश्यक माहिती या पाठात दिली आहे. 


विजय रा. जोशी 




 योग ग्रंथ अभ्यास : विषयोग समारोप  .  Path 3१ ,  २३  OCTOBER  2024.






सारांश : 

सुरवातीपासून घेतलेल्या सर्व पाठांतील चिंतनाचा आढावा, सुचविलेल्या उपायांचे महत्व आणि साधकांसाठी संभाव्य लाभ यावर मांडणी या समारोपाच्या पाठात आहे. 

या सर्व उपक्रमाचा उद्देश आणि तो साध्य होण्यासाठी  साधकांनी करायचे आत्मचिंतन आणि गृहपाठ यावरही काही विचार मांडले आहेत. तसेच वर्तन उपाय आणि ध्यान उपाय घेतल्याने साधकांचा आत्मविकास आणि साधकत्वातील क्रमविकास कसा घडेल या बद्दलही काही चर्चा सर्वांच्या विचारार्थ पुढे ठेवली आहे. 

पुढील अभ्यासाचा ग्रंथ "भाग्य योग",  त्यातील येणाऱ्या विवेचनात मुख्यत्वे काय असेल, याचा प्राथमिक भाग पाठाच्या उत्तरार्धात मांडला आहे. 

सर्वांना विनंती की  हे सर्व पाठ ऐकून आपल्याला आवडले असल्यास तसे अन्यथा काही  सूचना असतील तर त्याचा सविस्तर अभिप्राय जरूर द्यावा. 

सर्वांना नम्र प्रणाम. 


विजय रा. जोशी. 




 योग ग्रंथ अभ्यास : विषयोग - 13 .  Path 30 ,    16  OCTOBER  2024.





सारांश : 

षट चक्र साधनेत विविध परिस्थितीत घ्यावयाची काळजी संबंधी माहिती आहे. 

शरीरातील योग चक्रे, प्लेक्सस, त्यांचे परस्पर संबंध, काम विकार संबंधी प्लेक्सेस ,

स्वाधिष्ठान चक्राकडेच काम विकार जागृतीचा धोका का ? त्या मानाने पेल्विक प्लेक्सएस धोका

कमी कसा.. इत्यादी  माहिती दिली आहे.  

त्यातील ध्यान साधनेत घ्यायच्या काळजीचा भाग ध्यान सूचना केला आहे . तेथे स्वाधिष्ठान चक्रातील धोके 

टाळून पेल्विक प्लेक्सस वरील पर्याय  अविवाहित आणि ब्रह्मचर्य व्रतधारींसाठी सुचविला आहे. 

या पाठात वरील ध्यान साधनेचे सविस्तर प्रात्यक्षिक श्रोत्यांकडून करून घेतले आहे. 


विजय रा. जोशी . 


  योग ग्रंथ अभ्यास : विषयोग - 8 .  Path 25,   28 AUGUST 2024







सारांश 

प्राणीजीवन अमिबा पासून सुरु झाले. तेव्हाच्या शरीर रचनेत त्या त्या वेळच्या बऱ्या– वाईटाचे परिणाम त्या त्या वेळी मिळण्याची सोय होती. त्या क्षणालाच परिणाम भोगावे लागत असत. आणि त्यामुळे तत्पर राहून त्या वेळचे प्राणी जीवन असे परिणाम त्या त्या ठिकाणी, वेळी भोगून टाकत असत. 

प्राणीजीवनात तथाकथित प्रगती झाली . ती मनुष्य शरीरापर्येत पोहोचली. तसतसे हे परिणाम अप्रत्यक्ष उशिरा व्हावेत अशा यंत्रणांनी शरीररचना गुंफली गेली. अर्थात हा जो बदल झाला तो उत्क्रांती  तत्व म्हणजेच मनाची इच्छा यानेच झाला असणार. 

म्हणून आपल्या ए .एन. एस. च्या कार्य पद्धतीबद्दल आश्चर्य करण्या पेक्षा आहे ती परिस्थिती समजून घ्यावी,म्हणजे निदान पुढचा मार्ग जो निघायचा तो निघेल. या पार्श्वभूमीवर आपल्याला शरीराचा अभ्यास करायचा आहे. जाळ्यात कसे अडकलो ते कळल्याशिवाय सुटका कशी होईल?

Sympethetic and Parasympethetic nervous system and energy expenditure. आणि त्यामुळे शरीरात निर्माण होणारा शक्ती असमतोल पाहून त्याची कारणे काय यावर काही चिंतन केले आहे. 

भावना / वासना हि कशी सर्व व्याप्त आहे याची काही वेदकाळातील  व अन्य उदाहरणे दिली आहेत. ती देतांना ते म्हणतात: नैसर्गिक काम भावना विपरीतपणाने दडवून ठेऊ नये. आणि ती दडवून ठेवली तर त्यालाच विपरीतपणा’ (आधुनिक काळाच्या नावाने), म्हणू नये. मात्र याचा अर्थ असा नाही की ‘अनैतिकपणाला’ प्रतिष्ठा असावी. काम विकार जर नैसर्गिक सहजतेने बाजूला सारता येत नसेल,  तर  आणि तेव्हा जास्तीत जास्त नीतिबंधने पाळून आत्मोन्नती करून घ्यावी. 

सविस्तर पाठात ऐकावे.  


विजय रा. जोशी. 















Monday, October 28, 2024

  योग ग्रंथ अभ्यास : विषयोग - 10 .  Path 27 ,    25 September 2024.






सारांश : 

मेंदूतील निओकॉर्टेक्सला व्हेटोची सत्ता आहे असे मानले तर सर्टिफिकेशनचा अधिकार त्यालाच असलापाहिजे. जर ती सत्ता लिम्बिक बळकावू पहात असेल तर ते सर्व दृष्टीने अयोग्य आहे. म्ह्णून त्यास ताळ्यावरआणून योग्यमार्गी  लावण्याचे,  सतस्पर्श काम निओकॉर्टेक्सचे आहे, वस्तुतः त्या पलीकडे असलेल्या मनशक्तीचे आहे. 

निओकॉर्टेक्सचा सल्ला मानून ध्यानाला बसण्याची सवय करा म्हणायचे तर ती कशी करायची हा प्रश्न आहे.ध्यानाला बसले तर मन शांत न होता, सैरा वैरा फिरण्याचा जोर करते. मग काय करावे? कसे करावे. ??म्हणून येथे अनुभवाचा प्रांत सुरु होतो.  यावर कोणाचे मार्गदर्शन घ्यायचे म्हंटले तर या प्रांतात कोणी उठून काहीही बोलावे, असा प्रकार आसल्याने त्यातून धोके निर्माण होऊ शकतात. 

म्हणून समोरच्या माणसाचे म्हणणे पत्करतांना विज्ञानाच्या (तर्कशुध्दतेच्या) ज्ञात अशा मर्यादेपर्येत तरी विषयव्यवस्थित तर्कशुद्ध मांडला आहे की नाही, हे पाहिले पाहिजे. तसा तो मांडला गेला असेल तर , जास्तीत जास्त त्यावर विश्वास ठेवून त्या पद्धतीने प्रयोग केले पाहिजेत. त्यात कोठे काही फरक पडत आले तर त्यात योग्यदुरुस्त्या केल्या पाहिजेत. काही फरक “व्यक्ती तेवढ्या प्रकृती” या नुसारही पडू शकतात हेही लक्षात घेतले पाहिजे . 

स्वामीजी स्पष्टपणे लिहितात की - या सर्व मर्यादा लक्षात घेऊन मी माझे विवेचन केले पाहिजे आणि  त्या मर्यादेतच तुम्ही ते वाचले/ऐकले पाहिजे. आणि सर्वसाधारणपणे ते विवेचन तर्कशुद्ध वाट असेल तर त्याचा तुम्ही अनुभव घेतला पाहिजे. 

अधिक माहिती साठी पाठ ऐकावा. 



विजय. रा. जोशी. 







 योग ग्रंथ अभ्यास : विषयोग - 9 .  Path 26 ,   18 September 2024







सारांश :


प्राचीन विचारवंतांनी सुद्धा दोन गोष्टीचा विचार केला असला पाहिजे. संसार झाला पाहिजे तशी उच्च शांतिही

टिकली पाहिजे. ज्याला शक्य असेल त्याने त्यागपूर्ण केवळ शक्तीलाही पत्करावी. अन्यथा दोन्हीचा मेल घालूनही

पत्करावी.

अध्यात्मात स्त्री-पुरुष संबंध निषिद्ध नाहीत. तो वावडा विषय नाही. स्त्री ही साधनेचा घाट करते कि अडथळा

आणते ? हे सगळे माणसाचं मूळ संकल्पावर अवलंबून असते. स्त्री पुरुष समता अध्यात्मात अपेक्षित आहे. 

स्त्री-पुरुष एकत्र येताना जे संकल्प झाले असतील त्याचा परिणाम 

काम प्रकृतीच्या प्रवृत्तीवर किंवा विकृतीवर  होतो.   

अधिक माहिती पाठात ऐकावी ही विनन्ती . 


विजय रा. जोशी. 




Sunday, September 22, 2024

 योग ग्रंथ अभ्यास : विषयोग - 7 .  Path 24  dt 21 August 2024





सारांश 

शरीरात कामवासना आहे हे योगशास्त्राला मान्य आहे आणि शरीरशास्त्राला आहेच आहे. म्हणून आपण या सर्वाचाअनुकूल विचार कसा करता येईल ते पहात आहोत. योगशास्त्रात शरीरामध्ये ६ चक्रे आहेत तर शरीरशास्त्रामध्ये ६ विशेष स्थाने आहेत. (त्यात चार प्लेक्सस आहेत). 

योग शास्त्राचे म्हणणें असे आहे , की खालच्या भागातून म्हणजे मूलाधार चक्रातून एक तेज वर उचला. त्या तेजाचे, तेज वस्तूचे नाव ‘कुंडलिनी’ असे योगज्ञा नी ठेवले. हि कुंडलिनी विचारशक्तीने , कल्पना शक्तीने , मूळ तेजाने एकेक चक्र वर उचलत न्यायची, ती मेंदूपर्येत न्यायची. असे करण्यात मन गुंतले , की ज्या शरीराकडे आपले एरवी लक्ष नसते , तिकडे ते लागते. मग हे मन उगीचच भटकत नाही. आणि मनाला अशी गुंतविण्याचा सवय लागली की, त्यात गोडी वाटायला लागते. त्यातून उत्साह निर्माण होतो. बाहेर  भटकण्यात जी शक्ती वाया जाते, ती वाचते. मनाला एक नवे वळण लागते. त्यातून उत्साह फुलतो. नवा जोम, नवीन जीवन फलित होते. सहाजिकच या सर्वप्रकरणात विकारांची आपल्यावरील सत्ता किंवा कुरघोडी कमी होते. आणि या अशा निश्चय- शांत प्रक्रियेत / अवस्थेत जी शक्ती वाचते, ती रास्त अशा आनंदासाठी उपयोगात आणता येते. त्यातच कामसुखाचा आनंदही आपोआप येतो, वाढतो. 

तुमचे मन हे काम अटोनॉमिक नर्व्हस सिस्टम म्हणजे ए.  एन.  एस.  च्या मार्फत करते.  तुमचा ताबा चालतनाही, अशी शरीरातली “आपोआप चालणारी यंत्रणा’ . अशी यंत्रणा शरीरात कोणी निर्माण केली असावी ? स्वामीजी यावर जो खुलासा करीत आहेत तो खूप महत्वाचा आहे. (सविस्तर माहिती या आणि पुढील पाठात आहे.)


विजय रा. जोशी. 







 योग ग्रंथ अभ्यास : विषयोग - 5 .  Path 22  dt 7 August 2024 .




सारांश 

एका सूक्ष्म पेशींचे (जिवाणूंचे)  दोन जिवाणू तयार होतात तेव्हा कामविकाराची प्रक्रिया अंतर्गत होतअसली पाहिजे. जीवशास्त्राजवळ आज, एका सूक्ष्म जंतूंचे दोन का होतात? याबद्दल काहीही तर्क सुसंगत पुरावानाही. अतिसूक्ष्म जीव एकदा काम-प्रेरित आहेत असे म्हंटल्यावर प्राण्यांच्या बाबतीत बोलायलाच नको.

खालून हि प्रवृत्ती वर आली आहे. प्राणी जसजसे वर गेले तसतसे त्यांच्या काम विकारात हालचालीप्रकट पाहता येऊ लागल्या. पाहता येत नाहीत अशा हालचाली म्हणजे फक्त माणसाच्या. कामविकाराबद्दल आपल्या भावना लपवून ठेवतो, तो फक्त माणूस. त्यातही सूशीक्षित म्हणवणारा,

संस्कृतीला जपणारा माणूस अधिक लपवतो. जो पर्येंत हि गोष्ट निसर्गाचे इतर नियम सुसंगत राखून करतो, तो पर्येंत त्यात काहीही चूक नाही.पण जेव्हा सुशिक्षित पणाच्या नावा खाली , तो स्वतःच्या भावना लपवून अधिक खोट्या मार्गाकडे जातो, तेव्हा ती गोष्ट अशा माणसाला अधिक धोकादायक असते. 

वैदिक काळ, पुराण आणि इतिहासातील देव माणसांनी सुद्धा, कामेन्द्रिये झाकण्याची, कामविकार समाजालाउपयोगी पडेल  तेव्हा तो वापरण्याची कसलीही खळबळ केली नाही, 

खाणे आवश्यक , ते निवडून खा. जी गोष्ट खाण्याची तीच तुमच्या विकारांची आहे.  काम, क्रोध, लोभ, मंद , मत्सर माया यांची आहे. अटळ आहे , ते शक्तिरूप करून घ्या. ते कसे करायचे हे आपण विषयोग ग्रन्थ अभ्यासातून समजुन घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. 

स्त्री पुरुष 'समतोल' हवा. 

विवाहित स्त्री पुरुष एकमेकाच्या मायेतून सुटायचा प्रयत्न करीत असतील (Paramarth)) तर, किवा कामविकाराचाच समतोल साधायचा प्रयत्न करत असतील तर (Prapanch), त्यांची आतून येणारी (विकार) शक्ती लक्षात घेऊन त्याचा दोघाशीही समतोल करणे आवश्यक आहे. 

गृहस्थाने बह्मनिष्ठ असले पाहिजे. तो जे करील ते त्याने सतत ब्रह्मार्पण केले पाहिजे. प्रधान कर्तव्य जीवितार्जन पण हे खोटेनाटे बोलून, फसवाफसवी, लांड्यालबाड्या करून केले जाणार नाही या विषयी त्याने अतोनात दक्ष असले पाहिजे. 








  योग ग्रंथ अभ्यास : विषयोग - 6 .  Path 23  dt 14 August 2024 .



सारांश 

शरीरशास्त्र हे शरीराच्या अभ्यासाचे शास्त्र आहे. शरीरशास्त्र या दृष्टीने, लिंग विचार, कामग्रंथी विचार करावाच लागतो. पण शरीरात कामवासना आहे हे योगशास्त्राला मान्य आहे आणि शरीरशास्त्राला आहेच आहे. म्हणून आपण या सर्वाचा अनुकूल विचार कसा करता येईल ते पाहू. योगातील षडचक्रे गुदद्वाराच्या परिसरातच सुरु होतात आणि त्याचे दुसरे टोक मेंदूच्या भागातच जोडले आहे. शरीरशास्त्राच्या दृष्टीने कामविकाराचा संबंध गुदद्वाराच्या परिसरात सुरु होतो आणि त्याचे दुसरे टोक म्हणजे ज्या मेंदूत विकाराची निर्मिती होते तिथे आहे. योगशास्त्रात शरीरामध्ये ६ चक्रे आहेत तर शरीरशास्त्रामध्ये ६ विशेष स्थाने आहेत. (त्यात चार प्लेक्सस आहेत). 

शरीर शस्त्राच्या अभ्यासात मुळात काम विकाराची इच्छा का होते  (किंवा माणसाला कुठलीही इच्छा का होते) याचे कारण दिलेले दिसत नाही. अध्यात्म विचारवंतांची या बाबत स्पष्टता आहे. 

इंद्रिये आणि विषय यांची भेट होता क्षणीच कामाचा (कामनेचा) हात धरून जी वृत्ती (इम्पल्स) वेगाने उठते, जी वृत्ती उठली असता मन एकसारखे धावावयास लागते, व जेथे प्रवेश करू नये तेथे इंद्रिये तोंडे खुपसतात, ज्या वृत्तीच्या प्रेमामुळे बुद्धी वेडी होते, व ज्या वृत्तीला विषयांची गोडी असते, अरे!  अर्जुना ती इच्छा असे समज, (गीता). 

जीवनाचा शेवटचा क्षण आला की आत्मा जीवनाची शिल्लक आठवू लागतो. सर्व जीवनाचा संकुल कार्य-परिणाम म्हणजे ही शेवटची आठवण असते. व त्या संकुल वासने प्रमाणे जीवाचा पुढील प्रवास ठरतो. अंतकालीचे स्मरण हे सर्व जीवनाची फलित होय. जीवनाचे अंतिम सार मधुर निघावे म्हणून जीवनभर प्रयत्न असावा. मरणाच्या वेळेस जो संस्कार उमटावा अशी इच्छा असेल त्याला अनुसरून सर्व जीवनाचा ओघ वळवा. तिकडे अहोरात्र कल असावा. या जन्माचा अंत ती पुढील जन्माची सुरुवात, म्हणून मरणाचे स्मरण सदैव राखून वागावे. असा अध्यात्माचा सल्ला आहे. 

हा सर्व समन्वय कसा साधावा हा योग्य ग्रंथांचा विषय आहे. 


विजय रा जोशी. 






 

Wednesday, September 18, 2024

 GANESH CHATURTH, ४ सप्टेंबर २०२४ (गणेश चतुर्थी पाठ १/२)







आपण या पाठांत  भक्ती संकल्पना सर्व साधारणपणे, गणेश भक्ती विशेषपणे समजून घेण्यासाठी

काही अभ्यास आणि चिंतन करणार आहोत. त्यातून आपली गणेश पूजा अधिक अर्थपूर्ण 

आणि उपयुक्त घडेल अशी अशा आहे. 

सगुण भक्ती, श्री गणेशाची.

श्री गणेश - ईश्वराचे एक सगुण / साकार रूप (अवतार). 

भक्त (मी), 

ईश्वर/देव/गणेश -  गणेश देवता – उच्च गुणांचा आदर्श.

भक्ती संकल्पना . विभक्त नाही तो भक्त.,  देवाशी पूर्ण एकरूपता.

 देव गुणांचा अभ्यास,  उपासना म्हणजे काय ?

सुख कर्ता दु:ख हर्ता वार्ता विघ्नाची ।

ही आरती परिचयाची असली तरी तिचा जो आशय आहे, त्याकडे फार कमी जणांचे लक्ष जाते. 

अथर्वशीर्षाच्या अनुषंगाने पाहिले तर 

त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि । त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि । 

गणपती हा प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहे. तत्त्वमसिचे तो लक्ष्य आहे. या खऱ्या गणपतीचे जेव्हा ‘आत्मदर्शन’

होईल, तेव्हाच दर्शनमात्रे मन:कामनापूर्ती हा विचार पूर्ण होईल. 


वरील काही भाग आणि त्यावरील अनुशांगिक चिंतन आपणास आवडेल अशी अशा आहे. 


विजय  रा. जोशी 







.



 GANESH BHAKTI, गणेश उपासना 11 सप्टेंबर २०२४ (गणेश चतुर्थी पाठ 2/2)











भक्त म्हणिजे विभक्त नव्हे । आणी विभक्त म्हणिजे भक्त नव्हे ।
विचारेंविण कांहीच नव्हे । समाधान ॥ (दास. ४.९.६)
भावनांच्या कल्लोळाला विचारांच्या मार्गाने भगवंतापर्यंत नेऊन तो कल्लोळ भगवंतामध्ये विलीन होणे
हे भक्तीचे स्वरूप आहे. जीवभाव त्या प्रवाहातून आत्मभावात विसर्जित व्हावा. 
भगवंतभाव व आत्मभाव एकच आहेत हे विचाराने निश्चित झालेले असावे.

भक्ती ह्या शब्दाचे उपासना, उपासक, उपास्य व यांचे ऐक्य असे चार घटक होतात. 
ह्यातील उपास्य   किंवा देव हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. 

ब्रह्म, ईश्वर, सगुण-अवतार व मूर्ती असे देवाचे चार स्तर समर्थ सांगतात. ह्यातील मूर्ती हा स्तर उपासकांसाठी उपास्य म्हणून उपलब्ध असतो. त्या मूर्तीच्या माध्यमातून उपासकाला ब्रह्मानुभवापर्यंत वाटचाल करावयाची असते. 
प्रत्येक उपासकाने ह्याचे सतत भान ठेवले पाहिजे. 

परमेश्वर इच्छेने जी स्थिती प्राप्त होते त्या (प्रत्येक) स्थितीत सुखी, उपकृत, संतुष्ट रहाणे. यास ईश्वर शरणागती म्हणतात. भक्ती हे एक परिपूर्ण शास्त्र आहे हे अनेक उपासक लक्षात घेत नाहीत. त्यांच्या मताने त्यांना झेपेल
व जशी जमेल तशी उपासना ते करतात. त्यामुळे उपासनेचे रूपांतर भक्तीत होऊन त्यापासून
मिळणारा आनंद दूर राहतो. निर्भयता, तृप्ती, शांती इत्यादींचा अनुभव येत नाही.

‘मी कर्ता’ या भावाबरोबर दोन गोष्टी येतात: वासना आणि अभिमान. जितक्या प्रमाणात वासना व अभिमान कमी  होतो तितक्या प्रमाणात निस्सीम भक्तीला सुरवात होते. 

कर्ममय भक्ती  गीतेस मान्य असून आपल्यास प्राप्त झालेली कर्मे केलीच पाहिजेत पण ती स्वतःची 
म्हणून न करता परमेश्वराला स्मरून त्याने निर्मिलेल्या जगाच्या संग्रहार्थ त्याचीच हि कर्मे होत , 
अशा निर्मम बुद्धीने करावीत. म्हणजे कर्म-लोप न होता उलट त्या कर्मांनीच परमेश्वराची सेवा, 
भक्ती किंवा उपासना घडून त्याचे पाप-पुण्य आपणास न लागता अखेर पूर्ण सद्गतीही मिळते असे 
गीतेचे सांगणे आहे. 

भक्तीच्या पाण्याशिवाय मनाचे सूक्ष्म मल धुतले जात नाहीत. भक्तीच्या वेलीला ज्ञानाची फुले लागली पाहिजेत. 


सविस्तर विचार/चिंतन पाठात ऐकावे ही विनंती. 




विजय रा. जोशी. 



















Friday, September 13, 2024

 योग ग्रंथ अभ्यास : विषयोग - 4 .  Path 21  dt 31 July 2024 





सारांश :

अखिल मानव जातीचा विचार , उत्क्रांती सुटण्यासाठी की अडकण्यासाठी ?

अज्ञानामुळे जन्म-मरणाच्या बोगद्यात अजड (मन) कसे / का अडकले ?

आपण पाहातो, एखादं घराणं, राजघराणं, संस्कृती,  उंचावर चढली; मोठी झाली की ती परत - खाली आली, परत वर चढली, परत खाली आली, असं का झालं हे कळण्यासाठी, 'विश्वाचे  मूलभूत नियम (fundamental laws) जे आहेत, निसर्गाचे मूळ नियम, ते लक्षात घेतले पाहिजेत.

आपल्या आयुष्यात. त्यागाने पुष्कळ भोग निर्माण होतात असं करत करत आपण पुढे गेलो, तर एकदम निराळे आपल्याला प्रत्यय येतील. खाली-वर, असं होत जाणार आहे. अशा परिस्थितीमध्ये, मूळ प्रक्रिया ज्या आहेत, त्या समजून घेणे महत्वाचे असते. 

विकारयुक्त मन हे हे जिवाच्या पहिल्या अवस्थेपासून माणसाच्या तथाकथित प्रगत अवस्थेपर्येत प्रेरक म्हणून पुढे पुढे होत गेलेले आहे, ही गोष्ट निश्चित. त्यामुळे कामविकार हा सुद्धा मुळापासूनच मनात असल्याशिवाय  तो वळणे, वळणे घेत माणसाच्या सध्याच्या अवस्थेपर्येत आलेला नाही. 

ष‌ड्विकारामुळे पेशी दुःखी , सहा सुखविकारात पेशींना धक्के बसतात. गती नियमाप्रमाणे पेशींकडून प्रतिधक्के सुरु झाले की व्यक्तीमन त्याला रोग म्हणते.

उत्क्रांती प्रक्रियेत मनाची अधिकाधिक सुखाची इच्छा  ही  एकमेव स्वार्थ प्रक्रिया प्रेरणा , म्हणून शारीरिक उत्क्रांती ही मनाच्या प्रेरणेवर घडली असं तर्क सांगतो. 


विजय रा. जोशी. 




Monday, September 9, 2024

  

योग ग्रंथ अभ्यास : विषयोग - 3.  दिनांक 0 4 July 2024. पाठ २०. 





सारांश :

आपल्याला नेहमी सत्य दिसते का ? सत्याचे ज्ञान आकलन होते का?

आकलन - संवेदनक्षमता, संवेदन, जाणीव. एखादी गोष्ट समजण्याची विशिष्ट तऱ्हा किंवा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा विशिष्ट दृष्टिकोन. 

धारणा - ही आपल्या सभोवतालच्या जगाबद्दल माहिती प्राप्त करण्याची आणि समजून घेण्याची प्रक्रिया आहे. यामध्ये कोणती माहिती लक्षात घ्यायची, या माहितीचे वर्गीकरण कसे करायचे आणि विद्यमान ज्ञानाच्या चौकटीत त्याचा अर्थ कसा लावायचा हे ठरवणे समाविष्ट आहे.

What is an example of perception?

Perception: The Sensory Experience of the World . One person may perceive a dog jumping on them as a threat, while another person may perceive this action as the pup just being excited to see them. Our perceptions of people and things are shaped by our prior experiences our interests,  and how carefully we process information. 

प्रतिमा … अपेक्षाभंगाचे क्लेश .

आपल्या मनात आपल्या स्वतःच्या काही प्रतिमा आपण बनवतो, उपाधी, लेबल्स तयार होतात. तशी इतरांच्या मनात आपल्या प्रतिमा तयार होतात. मग त्या प्रमाणे एकमेकांकडून अपेक्षा निर्माण होतात. आणि बऱ्याच वेळा या अपेक्षातून अपेक्षा भंगाचे क्लेश निर्माण होतात. या सर्व त्रासाचे मूळ  इतरांकडून आपण केलेल्या अपेक्षेत असते..म्हणून अपेक्षा रहित वागा, इतरांवर प्रेम करा  पण अपेक्षा ठेऊ नका, असे संत सांगतात. आपले कर्म करा आणि अलिप्त व्हा.   हाच कर्म योग आहे. 

आपण दृश्य शक्ती व द्रष्टृत्व  यांची गल्लत केली आहे. 

जेव्हा आपण म्हणतो की "माझ्या मनाला अमुक आवडते आणि तमुक आवडत नाही" किंवा " अमुक गोष्ट माझ्या बुद्धीला आकलन होते किंवा होत नाही" तेव्हा, आपल्या बुद्धीच्या अथवा मनाच्या जाणण्याच्या मार्गातील अडथले समजू शकणारी कोणी एक  (मनबुद्धींहून वेगळी अशी) द्रष्ट शक्ती आहे. (साक्षी , आत्मा) 

मनाच्या प्रवृत्ती त्याचे दृष्टिकोन, त्याच्या आवडीनिवडींचे अग्रक्रम, त्याच्या पसंती, त्याचे पूर्वग्रह, सर्वांतून त्या मनाचा भूतकाळ व्यक्त होत असतो व त्याच्या वर्तमान क्षणावर तो प्रभाव पाडत असतो; आणि हे सर्व पहाणारी वेगळी कोणी एक द्रष्ट शक्ती तिथे कार्यरत असते .

तेव्हा आपण हे स्पष्ट जाणून घेऊ या की आपला देह, इंद्रिये, आपले प्राण व त्यांच हालचाली; मन आणि त्यातील विचार-भावना, इत्यादि रूपाने होणारी चित्तवृत्तींच खळबळ आणि मेंदूचे अथवा बुद्धीचे कामकाज हे सगळेच ह्या स्थूल, दृश्य, इंद्रियगम भौतिक जगाचे भाग आहेत, 

म्हणजेच ती 'दृश्य' शक्ती आहे, ती काही द्रष्ट शक्ती होऊ  शकत नाही. जेव्हा आपण म्हणतो की "माझ्या मनाला अमुक आवडत आणि तमुक आवडत नाही" किंवा " अमुक गोष्ट माझ्या बुद्धीला आकलन होते / होत नाही" तेव्हा, आपल्या बुद्धीच्या अथवा मनाच्या जाणण्याच्या मार्गातील अडथळा समजू शकणारी कोणी एक (मनबुद्धींहून वेगळी अशी) द्रष्ट शक्ती आहे. (साक्षी , आत्मा) . 

योगसूत्रे आपल्याला अत्यंत धाडसीपणे, संवेदनाच्या एका नव्या चेतनेची, नव्या आयामाच सूचना करतात, शिफारस करतात :  "योगश्चित्तवृत्तिनिरोधः" हीच ती सूचना आहे .चित्त वृत्ती शुध्द करां,  म्हणजेच स्मृतींचा चित्ता वरील प्रभाव दूर करा. चित्त शांत करा.ही ध्यानाची पूर्व सूचना आहे. योग दर्शनातील १ ल्या पादातील सूत्रे 

अथ योगानुशासनं १ ले सूत्र          योगश्चित्तवृत्तिनिरोधः, २ रे सूत्र.

“चित्त वृत्ती निरोध” झाल्यांनतर शुद्ध चित्त जेव्हा द्रष्टा रूपाने विश्व (दृश्य) पाहते, तेव्हा सत्याचे दर्शन घडते. सत्याची जाणीव होते. शुद्ध आकलन होते . 

पण आपले आकलन वृती ज्ञानाने होत असते. ते subjective असते. शुद्ध नसते. 

या जीवनात, या देहात अशी सोय आहे, उधार घेण्याची सोय आहे.आज सुख पाहिजे असेल तर आता घ्या आणि त्याचं जे दुःख नावाचं देणं आहे, ते नंतर फेडलं तरी चालेल. आम्ही कर्ज काढू न शकतो. म्हणून आपण सारे लोक देह धारण करुन सुख भोगत कर्जबाजारी होतो. हेही आपल्याला कळत नाही. पण हे कर्ज आपल्याला आज ना उद्या फेडावं लागणार आहे. हे आपल्या लक्षात येत नाही. आपण असे का वागतो ?' तर अज्ञानाने.  परिणामाबद्दलच्या अज्ञानामुळे आपण वागतो. त्यासाठी आपल्याला योग "यम -नियम " वर्तन सुचवितो. चित्त शुद्ध झाले कि आकलन शुद्ध होते. 

योग आणि व्यवहार याचा मेळ घालून वर्तन कसे करावे ते आपल्याला योग ग्रंथ सांगतात. 


विजय रा. जोशी 














 

Sunday, August 25, 2024

 योग ग्रंथ अभ्यास, विषयोग -2 ,  दि. २६ / ६ / २०२४. 





सारांश :

अमिबाने माणसापर्यंत प्रगती केली, म्हणजे काय केले ? खालच्या अप्रगत प्राण्यापासून माणसापर्यंत प्रगती झाली, तशी त्याची दुःखे, गुणाकाराने वाढली. ती दुःखे, तो पुढे ढकलू शकला. एवढीच त्याला मेंदूने देणगी मिळाली.  

स्त्री पुरुष 'समतोल' हवा. स्त्री- पुरुषातल्या संबंधाला सम+बंध, सम+भोग अशा समतोलवाचक, समतादर्शक वाक्यरचना केल्या आहेत. 

खाणे आवश्यक, ते निवडून खा. खाणे ही अनेक इच्छा प्रमाणे एक इच्छा आहे. जी गोष्ट खाण्याची तीच आपल्या  विकारांची आहे. काम, क्रोध, लोभ, मंद , मत्सर माया यांची आहे. देहात असताना योग्य गोष्ट एकच असते, की हे विकार वाईट आहेत ही गोष्ट मानायची, त्यातला वाईटपणा कमी करण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्यातल्या त्यात या विकारांचा उपयोग कसा करून घ्यायचा ते पहायचे. स्वामीजींनी भारतीय संस्कृतीतील अत्यंत उच्च अशा देवता प्रतीकांची कामासक्ती संबंधित अनेक उदाहरणे दिली आहेत. 

त्याचा हेतू ते सांगतात. सत्य हे मुक्त असले पाहिजे. कामविकार एवढा शत्रुवत मानणे हे मूर्खपणाचे आहे. त्याला मित्र बनवून, चुचकारून , त्याचा योग्य वेळी आदर राखून , आपण त्याला मदतीला बोलावले तर तो खरोखर आपल्याला उंच ठिकाणी घेऊन  जाऊ शकेल, असे प्राचीन ऋषी-मुनींनी दाखवून दिले  आहे. ते आपण समजून घेतले पाहिजे.

अधिभौतिक उत्क्रान्ति विरुद्ध भौतिक उत्क्रान्ति :

काम क्रोध काही प्रमाणात सर्व जीवाना आहेत, पण, लोभ, मोह, मद , मत्सर, … फक्त मनुष्याला आहेत … ही  उत्क्रांतीतील एक प्रकारे.. प्रगती !! 

निसर्गाची मानवाला मिळालेली ही अलौकिक देणगी पाहा ! ती म्हणजे आपली स्वसंवेद्य चेतना आहे. म्हणजे, स्वतःविषयी  एवढी जाण असणारी चेतना आहे … ही फारच अतुलनीय अशी क्षमता आहे !"आपलेच जाणणे व पाहाणे, ह्याची जाणीव असणे आणि, देवघेवीच्या, परस्परसंपर्काच्या ह्या कृतीचे जे परिणाम होतात त्यांनाही समजणे" हे जे आणखी एक स्वातंत्र्य मनुष्य प्राण्याला आहे, ते स्वातंत्र्य, ती क्षमता इतर प्राण्यांना नसते. 

पण आपल्या स्वच्छ, बुद्ध संवेदनावर , क्षमतेवर  भूतकालीन स्मृतींचे ओझे लादले गेले आहे. त्यामुळे, आपली प्रत्येक गोष्टी  विषयीं  सम्यक् आकलन  घडण्याची शुद्ध प्रक्रिया, ही, संग्राहित माहितीच्या ओझ्यांनी, साठवलेल्या अनुभूतींच्या परिणामांनी व साचलेल्या ज्ञानाच्या ठशांनी दडपली गेली. योगाचे हे शास्त्र नेमके ह्याच गोष्टीकडे आपले लक्ष वेधते की, आपली सम्यक् आकलनाची क्षमता ह्या पूर्व-स्मृतीत साचलेल्या माहिती वजा-ज्ञानाने व अनुभवांच्या स्मृती-गाठींनी अशुद्ध होत गेली आहे..

स्वार्थ आधारित, आत्मकेंद्रित वृत्ती हा सहज मानवी भाव असल्याने माणूस मूळ काम क्रोध विकारातून पुढे उत्क्रांतीच्या वाटचालीत अती हव्यासामुळे पुढे मोह, लोभ, मद , मत्सर व माया (मी आणि माझे) या पुढील विकारात वेढला गेला. काम विकाराने निर्माण झालेले जग , माणसाच्या प्रगती पर्येंत ‘माया’ विकारांत गुंतलेले दिसते. त्यातून सुटत जायचे तर माया विकारापासून सुटत सुटत काम विकारापर्येत जायचे, असा मार्ग दिसतो. 

या वरील चिंतन या आणि काही पुढील पाठांत केले आहे. 


विजय रा. जोशी. 


















Thursday, August 22, 2024

 

योग ग्रंथ पाठ १८, योग ग्रंथ अभ्यास : विष योग, दि  १८ /६/ २०२४. 





सारांश :

विषयोग आणि भाग्य योग हे दोन्ही ग्रंथ समजून घेतांना आपण त्यातील सर्व तपशील समजून न घेता मुखत्वे आपल्या अभ्यास उद्दिष्टाशी जेवढा भाग सुसंगत आहे तेवढाच फक्त पहाणार आहोत. साधकत्वातील क्रम विकास साधून आपले भौतिक आणि पारमार्थिक जीवन अधिक यशस्वी, आणि समृद्ध करणे यासाठी आपण हा अभ्यास करत आहोत. ‘विषयोंग’ हे पुस्तक फक्त विवाहित साधकांपुरते आहे. 

विषयोंग-हेतू - दृष्टिकोन विधायक आहे. काम शक्तीचा योग्य उपयोग केला पाहिजे, त्यातील धोके टाळले पाहिजेत. याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले आहे.

‘चित्तवृत्तींवर निरोध’ हेच योगाचे मुख्य कार्य आहे. इच्छा, कामना  कोणाला ? मनाला !! त्यासाठी मनाचे, वर्तनाचे शिक्षण हवे. भारतीय अध्यात्माने काम विकाराचे अस्तित्व आणि प्रेरणा कबूल केली तर दुसऱ्या बाजूने ‘काम’ या शब्दाचा अर्थ विशाल केला. ‘काम’ याचा अर्थ कर्म, कार्य हेतू असाही अध्यात्माला अभिप्रेत आहे. 

काम विकाराने निर्माण झालेले जग , माणसाच्या प्रगती पर्येंत ‘माया’ विकारांत गुंतलेले दिसते. त्यातून सुटत जायचे तर मायाविकारापासून सुटत सुटत काम विकारापर्येत जायचे असा मार्ग दिसतो. तो अभ्यास आपण या पाठ मालेत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. .. 


विजय रा. जोशी. 

 








Thursday, August 8, 2024

 योग ग्रंथ पाठ १७, अभ्यास दिशा, दि  १२ /६/ २०२४. 




सारांश. 


योग ग्रंथ : अनुबंध चतुष्ट्य 

1.     अधिकारी : ज्यांना आपली प्रापंचिक तसेच पारमार्थिक प्रगती करून साधनेचा क्रम विकास 

        साधत अंतिमतः मोक्ष प्राप्ती करायची इच्छा असलेले साधक.

         विष योग हा ग्रंथ फक्त विवाहित वाचकां करीता आहे. 

2.    विषय काय? :  साधकांचा भौतिक तसेच अध्यात्मिक क्रमविकास स्वावलंबी उपायांनी साधण्यासाठी 

         बुद्धी / श्रद्धा आधारित मार्गदर्शन.

3.     प्रयोजन काय ? : साधकत्वातील क्रमविकासाने व्यक्ती कल्याण साधणे  

         आणि अशा साधकांच्या  एकत्रित प्रयत्नांमुळे समष्टी कल्याण साधणे. 

४. संबंध काय ?  प्रयोजन साध्य होण्यासाठी अधिकारी साधकांनी काय साधना करावी  याचे सर्वांगीण मार्गदर्शन

 योग ग्रंथात स्वामीजींनी केले आहे. 

आपण बुद्धियोग आणि श्रद्धा  योग्  यांचा अभ्यास सविस्तर करणार आहोत. 

विषयोंग आणि भाग्य योग यांच्यातील महत्वाच्या भागाचा अभ्यास / चिंतन करणार आहोत. 

माझी भूमिका एक अभ्यासक आणि केलेल्या अभ्यासाचा ज्ञान गुणाकार एवढीच आहे, 

तज्ज्ञाची नाही , हे सुरवातीपासून स्पष्ट केले आहे, 

विषयोग -- दृष्टिकोन विधायक आहे. काम शक्तीचा योग्य उपयोग केला पाहिजे, त्यातील धोके टाळले

पाहिजेत. याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले आहे.

भाग्य योग -- माणसाचा काळ आणि स्वभाव यावरुन भविष्य सांगता येते.. योगाने हे भविष्य सुधारता येईल. 

भारतीय प्राचीन विचारवंतांनी अनेक सुंदर समन्वय केले. सुखी आयुष्य, पराक्रमी आयुष्य, वैभवशाली आयुष्य

मिळविण्यासाठी त्यांनी चेतावणी दिली. परंतु . तेच आयुष्य त्याग आणि शांती यांच्या, समतोलाने शापमुक्त

राखण्याची योजनाही केली आहे. 

बुद्धी योग -- तुमच्या सुखाचे 'कारण', तुम्ही, बुद्धी आहे, असे मानता. बुद्धी हीच युक्ती तुमच्या सुखासाठी तुम्ही

 वापरता. बुद्धीनेच तुमची समाधान स्थिती निर्माण होते. या सगळ्या प्रक्रियेचे ज्ञान तुम्ही करून घेतले पाहिजे. 

सबंध ग्रंथात, शक्य तेवढ्या विस्ताराने जे ज्ञान दिले आहे. 

श्रद्धा योग. -- तुमचे कारण तुम्हीच.    निष्कर्ष सरळ आहेत -

१) सुखासाठी तळमळणारे मन तुम्हीच निर्माण केले आहे.

२) ती तळमळ कधीही पुरी होणार नाही, हे लक्षात आणून ती हळूहळू कमी करत नेणे हे तुमचे काम आहे

३) ती कमी होत होत शून्यावर आली, सम अवस्थेवर आली तरीही प्रचंड सुख आहे, असा ज्ञात्यांचा 

   अनुभव आहे.

 पैकी दुसऱ्या व तिसऱ्या प्रक्रियेत योगाभ्यासाचा विशेष संबंध येतो.त्यातून उत्पन्न होणारी मोक्षस्थिती मिळाल्यावर

 सुख मिळेल यावर श्रद्धा बसली म्हणजे  हा योग सहजतेने जमेल. सारांश,  मोक्ष अनुभव घेतला पाहिजे. 


विजय रा. जोशी 













Saturday, July 20, 2024

 योग ग्रंथ पाठ १६, अनुबंधचतुष्टय व षडलिंगे,   ५ जून २०२४. 





सारांश  

कोणत्याही ग्रंथाचा अभ्यास करतांना तो मुख्यत्वें कोणासाठी आहे, त्यात पुस्तकाच्या वाचण्याने 

काय लाभ होणार या प्रश्नांची उत्तरे प्रथमच समजणे माणसाला आवडते. म्हणून परमार्थशास्त्राच्या ग्रंथात या

 विषयांचा संपूर्ण विचार पद्धत आहे. यालाच अनुबंध म्हणतात.(अनुबंध म्हणजे मन वेधून घेणारी बाब.). 


अनुबंध - जे बांधून ठेवते ते, चतुष्टय - चार / चौकट 

१. ग्रन्थ अभ्यासाचे अधिकारी कोण ? 

२. विषय काय?

३. प्रयोजन काय ? 

४. संबंध काय ? विषयाचे प्रमाण मांडतांना त्याचा विषयाशी संबंध असावा.

      

षड्लिंगे.

साधकांनी शास्त्रग्रंथ खाली दिलेल्या  सहा गोष्टींकडे लक्ष ठेवून अभ्यासणे म्हणजे शास्त्रानुसार श्रवण होय.

 शास्त्रग्रंथ सहा बाबींकडे चांगले लक्ष ठेवून ऐकावयाचा असतो,ज्यांना ग्रंथाची षड्लिंगे म्हणतात. 

म्हणजे चांगल्या ग्रंथाच्या सहा खुणा,सहा विशेष. जे अभ्यास करतांना लक्षात घ्यायचे असतात. 

ही षड्लिंगे अशी -

१ ) उपक्रम आणि *उपसंहारामधील मेळ (एकवाक्यता) -- वर्तुळ काढायला सुरुवात केल्यावर ते जेथून

      सुरू होते तेथेच येऊन   पेन्सील थांबते (असे झाले पाहिजे.). याचप्रमाणे ग्रंथाच्या सुरुवातीला 

       ग्रंथ ज्या उद्देशाने सांगितलेला असतो तो उद्देश अखेर संपूर्ण झाला का ते पाहणे म्हणजे 

       उपक्रम-उपसंहारांची एकवाक्यता. *(अखेरीस असलेला समारोपाचा मजकूर. तात्पर्यवजा सार).

2). अभ्यास - श्रवण वगैरे साधने; विवेक, वैराग्य वगैरे अंगी बाणवणे; अनुसंधान आणि नित्य

     सदाचरण इ. सांभाळणे याला       अभ्यास म्हणतात. फलप्राप्तीसाठी सांगितलेले कायिक, वाचिक 

      व मानसिक कर्म म्हणजे अभ्यास. ग्रंथाचे वाचन, त्यावर विचार व त्यानुसार आचरण साधना.

    (उदा. नामसाधना, ध्यानसाधना इ.) हे परत परत करणे म्हणजे अभ्यास. 

३) अपूर्वता - इतरत्र कोठेच न मिळणारे असे जे विशेष त्या ग्रंथातून मिळते त्याला  अपूर्वता   म्हणतात.  

4)   फल - ग्रंथाच्या अभ्यासाने जे प्राप्त होणार त्याला फल म्हणतात. 

५)  अर्थवाद - वाचकांना खेचून घेण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी जरूर त्याहून फुगवून सांगणं 

               अतिशयोक्ती करणे म्हणजे  अर्थवाद होय.

६) उपपत्ती - सिद्धान्त सिद्ध करण्यासाठी ज्या उदाहरणांचा उपयोग केला जातो,  त्याला उपपत्ती म्हणतात. . 


साधकांनी शास्त्रग्रंथ वरील सहा गोष्टींकडे लक्ष ठेवून अभ्यासणे म्हणजे शास्त्रानुसार श्रवण होय. 

पुण्यप्राप्तीच्या हेतूने, कुतुहल भाव कळण्यासाठी ऐकणे याला शास्त्रात श्रवण समजत नाहीत. 


या संदर्भात योग ग्रंथांचा अभ्यास करण्याची शक्यता आणि त्याची उपयुक्तता यावर काही विचार उदाहरणांसह या विवेचनात आपल्याला ऐकायला मिळेल. 


विजय रा. जोशी 







Sunday, July 14, 2024

  योग ग्रंथ पाठ १५,  तत्वज्ञानाचे सार – प्रार्थना,  २९ मे २०२४. 





सारांश : 

माणसाला काही उच्च ध्येय साध्य करायचे असेल तर मनाला शांत, निःश्चल. एकाग्र करावे लागते.

अशा प्रयत्नांना ‘साधना’ असे म्हणतात. पूजा, मंत्र, जप, प्रार्थना, ध्यान अशा मार्गाने साधना होऊ शकते. 

या पैकी ‘प्रार्थना’ या साधनाचा संक्षिप्त विचार आपण करणार आहोत. प्रार्थना फक्त करायची

नसते तर ती जगायचीही असते.चांगल्या विचारांच, त्यातील अर्थाचं चिंतन करणे व तसे वर्तन स्वतःच्या आयुष्यात

प्रत्यक्षात जोडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे प्रार्थना जगणे. ही वैयक्तिक प्रार्थना प्रक्रिया. शांत स्थितीत, शुध्द

अंतःकरणाने, एकत्रितपणे सर्वांच्या कल्याणासाठी केलेले उच्चारण म्हणजे सामुदायिक प्रार्थना. 

अशी प्रार्थना ही अधिक शक्तिदायी असते.प्रार्थना शब्दांनी होते. मेंदूतून शब्द निर्माण होतात. त्यामध्ये व्यक्तीचा

हेतू मिसळतो व त्याचा परिणाम मेंदू व शरीरावर होतो. चांगले विचार मनात ठसले, वर्तनात उतरले की शरीर

 बदलते. 

१. आत्मचिंतन प्रार्थना : साध्य - स्व - कल्याण. 

                                  साधन -   प्रार्थना विचार. 

                                  कृती    -   परिस्थिती आहे तशी स्वीकारणे, ईश्वरी व्यवस्थेला शरणागत असणे. 

                                                 सुख / दुःख एकाच भावनेने स्वीकारणे. 

२. यज्ञ हवन प्रार्थना  :     साध्य  - आत्मज्ञान, 

                                     साधन - प्रार्थना विचार. 

                                     कृती   - हव्यास कमी करणे, स्वतःचे गुण, दोष आठवून अग्नीस शरण जाणे, 

                                             त्याने शक्ती, शांती जीवनात स्थिर होईल. 

३. समाज सेवेची प्रार्थना     साध्य - समाज कल्याण . सर्व कल्याण , निष्काम कर्माने चित्त शुद्धी होते.

                                      साधन - प्रार्थना विचार . 

                                       कृती -    आपण अनेक ज्ञात/अज्ञात शक्तींचे देणे लागतो, 

                                                     ते फेडण्यासाठी संकल्पानुसार निष्काम कर्म करणे.

प्रार्थनेचे महत्व, साधन आणि साध्य साधण्यासाठी करावयाचे प्रयत्न याचे सविस्तर विवेचन या पाठात ऐकायला

मिळेल. 


विजय रा. जोशी. 

  










Thursday, July 4, 2024

 योग ग्रंथ पाठ १४, ध्यान पाठ ३, शरीराशी संवाद  २२ मे  २०२४. 





सारांश 


योग म्हणजे क्षणा-क्षणाला शरीराची बातमी घेत, म्हणजेच भावना/विचार  स्थितीचे  आत्म-परीक्षण करीत,  

मनाचा वेग  (गती , विचार / भावनांची तीव्रता) कमी करायचा प्रयत्न. (साधना). 

अनंत जन्माच्या पूर्व संस्काराचे रंग (त्रिगुण) अंतःकरणावर चढले असतात. म्हणून हे सर्व वासना, संस्कार पुसून

टाकणे हे साधनेचे कार्य आहे. अंतःकरण स्वच्छ, सात्विक झाले की जाणीव शुद्घ होते. पारमार्थिक प्रगतीसाठी हे

आवश्यक आहे.

मानवाचे अंतःकरण, जाणीव सर्व प्राणी सृष्टीत विकसित आहे.

मी म्हणजे देह आहे असे वाटणे हि देहबुद्धी, मी म्हणजे आत्मा आहे असे वाटणे म्हणजे आत्मबुद्धी 

देहबुद्धी विवेकाने , प्रयत्नाने आत्मबुद्धीत बदलणे ही  साधना आहे. 

देहेबुद्धिचा निश्चयो दृढ जाला।

देहातीत ते हीत सांडीत गेला॥

देहेबुद्धि ते आत्मबुद्धि करावी।

सदा संगती सज्जनाची धरावी II     मनाचे श्लोक ॥१६३॥

आपल्याला सुख जेव्हा बाह्य गोष्टींमुळे मिळते असे वाटते ते ज्ञान खरे नाही. इष्ट गोष्ट प्राप्त झाल्याने , 

बुद्धी क्षण काळ निवृत्त होते. ते सुख 

धी  + न = ध्यान .  म्ह्णून बुद्धी ध्यान प्रक्रियेत शून्य करायची, 

म्हणजेच विचारशून्य व्हायचा प्रयत्न संकल्पाने करायचा. 


एक इच्छा पूर्ण झाली की अनेक इच्छा पुढे येतात, अंतःकरण परत क्रियाशील होते. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध

हे भोग विषय आणि यश, सत्ता, संपत्ती, कीर्ती, अधिकार, प्रतिष्ठा अशा अनेक न संपणाऱ्या इच्छा सर्व जागृत

अवस्था काळात असतात.  प्रयत्नपूर्वक वासना कमी करत नेणे हे साधनेचे कऱ्य आहे. त्यासाठी साधकाने 

श्री गुरूंच्या मार्गदर्शनात पूर्व तयारी करणे आवश्यक आहे.


स्वामीजी चौवार्षिक वर्गात सांगतात. शक्ती मिळविण्यासाठी ५ गोष्टी केल्या’

1) त्याग पथ्य. 

2) तप पथ्य

3)  अभ्यास (ज्ञान)

4) योग्य शांती प्रतिक प्रकाग्रता           

5) योग्य शक्ती प्रतिक एकाग्रता. 

तुम्ही वरिल ५ गोष्टी करा. तुम्हाला ही तसा अनुभव येईल. ते करता  येत नसेल तर विश्वास ठेवा 

व सांगितल्या गोष्टी करा.

शरीराशी संवाद या ध्यान पद्धतीची सविस्तर माहिती  या पाठात आपण ऐकू शकाल. 


विजय रा. जोशी.