Tuesday, March 23, 2021

 

गीता अध्याय १2, भाग 1 , ध्वनी फीत



गंगेचा ओघ सर्वत्र पावन व पवित्र. परंतु हरिद्वार, काशी ,  प्रयाग, अशी स्थाने अधिक पवित्र आहेत. भगवत गीतेचीही तशीच स्थिती आहे. भगवतगीता आरंभापासून अंतापर्येत सर्वत्र पवित्र आहे. परंतु मध्यंतरी काही अध्याय तीर्थक्षेत्रे झाली आहेत. ज्या अध्याय बद्दल आज बोलायचे आहे तो अध्याय मोठा पावन, तीर्थ झाला आहे. प्रत्यक्ष भगवानच या अध्यायाला अमृतधार असे म्हणत आहेत. हा लहानसा वीस श्लोकांचा अध्याय अमृताप्रमाणे मधुर आहे. या अध्यायात भगवंताच्या मुखातून भक्तिरसाच्या महात्म्याचे तत्व गायिले गेले आहे. 





खऱ्या साधकानं आणि भक्तानं परमेश्वराचं सगुण निर्गुण रूप समजावून घेतले पाहिजे. काही साधक तत्त्वज्ञानी परमेश्वराच्या सगुण स्वरूपाला मानणारे नसतात. मूर्तिपूजेला त्यांचा विरोध असतो. तो विरोध त्यांच्यापुरता ठीक आहे; पण निर्गुण भक्ती करणाऱ्यांनी सगुण भक्ती करणाऱ्यांना कमी मानण्याचे काहीच कारण नाही. निर्गुणोपासनेचाही अभिनिवेश त्याज्यच मानाव लागेल. भक्ती सगुण रूपातील असो वा निर्गुण, त्यातील भाव महत्त्वाचे आहेत.


सगुण आणि निर्गुण परस्पर पूरक आहेत. सगुण सुलभ आहे, निर्गुण कठीण आहे तर तसे पहिले तर उलटही खरे आहे - सगुण कठीण आहे व निर्गुण सोपे आहे. दोहोंनी एकच ध्येय प्राप्त होते. भगवंतांनी सुलभता, कठीणता तारतम्य लक्षात घेऊन ‘सगुण सोपे’ असे उत्तर दिले आहे.  नाही तर योग, सन्यास, सगुण, निर्गुण  एकरूपच आहेत. शेवटी भगवान सांगतात ‘अर्जुना ! तू सगुण ऐस कि निर्गुण ऐस, भक्त ऐस म्हणजे झाले, गोटा राहू नकोस. असे सांगून भगवंतांनी शेवटी भक्ताची लक्षणे दिली आहेत. 


हि लक्षणे मधुर आहेत. त्याची माधुरी चाखावी. या लक्षणांचा वर्तन अनुभव घ्यावा. स्थितप्रज्ञाच्या लक्षणाप्रमाणे हि लक्षणे आपण रोज सेवन करावी, मनन करावी, त्यातील थोडी थोडी आपल्या आचरणात आणून पुष्टी प्राप्त करून घ्यावी. अशा तर्हेने जीवन हळूहळू परमेश्व्राकडे न्यावे. 


सगुण आणि निर्गुण भक्ती बद्दल या ध्वनिफितीतील माहिती आपल्याला नक्कीच उपयुक्त वाटेल, तर जरूर ऐका . 


विजय रा. जोशी 



गीता अध्याय १2, भाग 1 , ध्वनी फीत

Tuesday, March 16, 2021


गीता अध्याय ११, भाग 2 , ध्वनी फीत



गीता जीवनाचे रहस्य समजावून देते. 


पहिली गोष्ट भगवंत सांगतात  - तुझ्या शिवाय सर्व होणार आहे. ज्याला जीवनात, ज्ञानात वर जायचे असेल त्याने समजून घेतले पाहिजे. माझ्याशिवाय हे सर्व चालू रहाणार आहे. माणसाने लक्षात ठेवले पाहिजे , तो नव्हता तेव्हा हे जग अव्याहत सुरु होते, तो नसला तरी जगाचे काही अडणार नाही. जे नाटक करण्यासाठी आपल्याला पाठविले आहे ते नाटक व ती भूमिका आपण फक्त करत असतो. 



विराट,  विश्वरूप दर्शनाने अर्जुन वेगळ्याच मनस्थितीत जातो. 

तो म्हणतो: कधी न पाहिलेले रूप पाहून मला हर्ष झाला आहे व भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे. हे जगन्निवासा देवाधिदेवा ! प्रसन्न व्हा. आणि आपले ते पूर्वीचे रूप दाखवा. किरीट व  गदा धारण करणारे , हातात चक्र घेतलेले, पूर्वीप्रमाणेच मी तुम्हाला पाहू इच्छितो. म्हणून हे सहस्रबाहो विश्वमूर्ते ! त्याच चतुर्भुज रूपात प्रकट व्हा. 

देवाला; चतुर्भुज रूप दाखविण्याची अर्जुनाची मागणी; आवडली नाही. पण त्याच्या वरील प्रेमाखातर पुन्हा देव चतुर्भुज झाला. सूर्य मावळल्यावर आकाशात जशा चांदण्या प्रकट होतात ,  त्याप्रमाणे अर्जुनाला पुन्हा सर्व दृश्य पूर्ववत दिसू लागले. शेवटी देवाने अर्जुनास महत्वाचा उपदेश केला की , ‘गाय जरी डोंगरात चरावयाला गेली , तरी तिचे चित्त घरांतील तिच्या वासरावरच असते ; तसे तू विश्वरूपावरच आपले खरे प्रेम ठेऊन चतुर्भुज मर्यादित रुपावर वरवरचे बाह्यात्कारी प्रेम ठेव. 

भक्तीसाठी आवश्यक गोष्टी ,  भक्ती कशी करावी ? 

भगवन्ताला भजणारे लोक एकाच कक्षेतले आहेत असे समजू नये. वसिष्ठही फुले समर्पण करीत होते आणि शंकरराव हि फुले चढवतात.  एक गुणश्रेष्ठता समजून फुले चढवत असतो तर दुसरा श्रेष्ठता समजून फुले चढवत असतो. भगवंताची महानता व आपली सामान्यत कळते त्यातून इंद्रिये नमतात त्याला दीनता म्हणतात.  तूच महान आहेस,  तूच महान आहेस,, आम्ही तुझ्यापर्येत पोचू शकतनाही , आम्ही तुझ्या पायातल्या धूळींचेही लायक नाही, अशी भावना मनात झाल्यावर इंद्रिये नमतात पण मन नम्र होत नाही. ह्याला हिनता म्हणतात. तू महान आहेस हि तुझी शक्ती आहे व तू माझ्यासाठी सामान्य झाला आहेस हि तुझी कला आहे. शक्ती व माया ह्या दोहोंचेही ज्ञान ज्यावेळी मनाला होते त्यावेळी मन नमते, त्याला लीनता म्हणतात. तुला खरेतर काहीही नको असून सुद्धा माझ्याकडून तुला काही अपेक्षा आहे, इच्छा , वासना आहे असे तू नाटक करीत आहेस , हे ज्यावेळी बुद्धीला पटते, त्यावेळी बुद्धी नमते व तिला नम्रता म्हणतात. 

नमस्कार म्हणजे इंद्रिये, मन, बुद्धी ह्यांची नम्रता.

ज्या ठिकाणी इंद्रिये  मन  व बुद्धी हि सर्व पूर्ण  एक होऊन नम्र भाव निर्माण होतो.  म्हणून भगवंताचे :

१. सर्वज्ञत्व 

२. सर्वाश्रयत्व

३. सर्व व्यापकत्व 

४. सर्व सुखत्व 

ह्याचे भान, ज्ञान  रहायला हवे. ज्ञानपूर्वक भक्तीत थोडा कंटाळा येण्याची शक्यता आहे. पण ज्ञानोत्तर भक्तीत ‘तुष्यन्ति च रमनति च’ अशी स्थिती येते. तिलाच नम्रता म्हणतात. भगवंताला कुठल्याही रूपात स्वीकारायची मनाची पूर्ण तयारी म्हणजे  ज्ञानोत्तर भक्ती.  या बद्दल सविस्तर माहिती  ध्वनिफितीत ऐका . 

भक्ती वर्णन - १२  वा अध्याय 

अर्जुनास सगुण रूप हवे होते, त्यावर तो भाळला होता. देवांनी तर ते कमी योग्यतेचे ठरविले होते. म्हणून कोणते रूप श्रेष्ठ आहे ? असा प्रश्न देव रागावणार नाहीत अशा चातुर्याने तो देवापुढे मांडणार आहे. आणि त्यातूनच १२ वा अध्याय निर्माण होत आहे. 


विजय रा जोशी 




गीता अध्याय ११, भाग 2 , ध्वनी फीत


Sunday, March 7, 2021


गीता अध्याय ११, भाग १ , ध्वनी फीत .




“निसर्ग दयाळू नसतो, अन्यायी भासेल एवढा क्रूर असतो, हे समजून 
जगात राहावे. जर तुम्हाला भांडायचे असेल तर निसर्ग नियमा प्रमाणे भांडा, तो नियम समजून घ्या”... हा अकराव्या अध्यायाचा आशय आहे असे मी समजतो. (स्वामीजी,जीवन गीता).



११ वा अध्याय २ ऱ्या अध्यायाला पूरक आहे.

विश्व नियमा प्रमाणे “समता” हे एकदा ध्येय ठरले की, ती समता मोडणाऱ्याचे काय होईल ? याच्या बद्दल विचार करणारा हा ‘अकरावा’ अध्याय आहे.

हा अकरावा अध्याय दुसऱ्या अध्यायाचा पूरक असा आहे. समता हे एकदा ध्येय ठरले (एंट्रोपी - उष्णता गतिशास्त्र २ रा नियम) कि ती समता मोडणाऱ्याच काय होईल याचा विचार करणारा हा  अध्याय आहे. 


बारावा श्लोक आहे , जर आकाशात हजारो सूर्याची एकाच वेळी उत्पन्न झालेली कांती असेल तर मात्र ती कांती त्या महात्म्याच्या कांतीशी बरोबर होऊ शकेल. नुसती कांती, कृष्ण लांबच राहिला.कृष्णाच्या बाह्यांगाच्या पडछाया, म्हणजे हजारो सूर्याची कांती. 


मग सतराव्या श्लोकात तो म्हणतो : सर्व बाजूनी पहायला कठीण, प्रदीप्त झालेल्या अग्नीप्रमाणे व अतिप्रखर सूर्याप्रमाणे तेजस्वी.. इतक्याच प्रमाणात आहे असा निश्चय न करता येण्यासारखा. म्हणजे अमुक इथे कृष्ण सुरु झाला आणि इथे संपला असा सांगता येणार नाही. एवढ्या अफाट दिव्यत्वाचं अनंत रूप त्या कृष्णाच्या ठिकाणी अर्जुनास दिसत आहे. एकोणिसाव्या श्लोकात अर्जुन म्हणतोय की , हे आकाश आणि पृथ्वी यातील अंतर तू एकट्याने भरून काढलं आहेस, इतकेच नव्हे तर सर्व दिशाही व्याप्त केल्या आहेस. तुझे हे अद्भुत उग्र रूप बघून सर्व त्रैलोक्य भयाने गडबडून गेले आहे. थरथर कापत तो म्हणतो आहे , ‘माझे धैर्य आणि स्थिरता नाहीशी झाली आहे. चोविसाव्या श्लोकात शेवटी तो म्हणतो आहे की , मला सुखच वाटत नाहीसे झाले आहे. अठ्ठाविसाव्या श्लोकात त्यांनी म्हंटल आहे ‘पेटलेल्या तोंडात झरझर राजे, लढवय्ये शिरत आहेत. काळाच्या तोंडात लोक कसे शिरतात हे मी प्रत्यक्ष आज पहातो आहे. 


कोणाला वाटेल कृष्णाच्या रूपाबद्दल अर्जुनाच्या मनात भ्रम निर्माण झाला असेल, श्लोक ३२ मध्ये कृष्ण स्वतः सांगत आहेत :हे अर्जुना ! मी सर्व लोकांचा नाश  करण्यासाठी, अत्युग्र रूप म्हणजे काळ; जो अंतकाळाचा सुद्धा अंत करेल एवढा क्रूर आहे. पहिल्यांदा कृष्णाच्या कराल दाढेत सगळे कौरव शिरत होते आणि मागोमाग पांडवही शिरत होते. भांडणारे दोन्ही पक्ष शेवटी याच गतीला मिळतात. शत्रू, मित्र तुम्हाला जे काही मानायचं असेल ते माना. शेवटी दोघांना मरण येणारच आहे. बाहेर कदाचित दुर्जनांचा प्रथम विजय झालेला दिसेल पण आत कत्तल प्रथम दुर्जनाचीच होणार आहे. 

फार पुण्य नसत. थोडं जमा झालं तर लगेच त्याचा अहंकार होतो.  पापाच फळ तर शेवटी वाईट मिळणारच आहे, पण पुण्याचाही फळ पहिल्यन्दा परिक्षा घेतल्याशिवाय पदरात पडणार नाही. 

प्रत्येक अहंकाराची गर्जना हि आंतून आर्त  किंकाळी असते. 

खरा देव न्यायी असतो त्याचाकडे जाणे. त्याच दर्शन घेणं सोपं नसत. कारण देवाला समता पाहिजेआणि आम्हाला मात्र विषमता हवी. आम्हला अनुकूल विषमता पाहिजे. आम्ही मोठे आणि इतर छोटे. इतरांना कोणाला मोठं मानायला आपण सहसा तयार नसतो. अकराव्या अध्यायाचा हा अर्थ आहे आणि तो अर्थ जेव्हा पहाण्याची आपल्यास शक्ती येईल तेव्हा सर्व सोपं असेल. 

विस्वरूप दर्शनाचा कथाभाग या ध्वनिफितीमध्ये आपल्यासमोर उलगडत जाईल , शुभेच्छा !


विजय रा जोशी. 



गीता अध्याय ११, भाग १ , ध्वनी फीत .

Monday, March 1, 2021

 

गीता अध्याय १०, भाग 2 , ध्वनी फीत .






परमेश्वरी अस्तित्व स्वतःला  कसे समजवून घ्यायचे ? 

लहान मुलांना शिकविण्यासाठी जे उपाय आपण योजतो तेच उपाय सर्वत्र परमात्मा दिसावा म्हणून या दहाव्या अध्यायात सांगितले आहेत. आधी अक्षरे मोठी  काढायची, गिरवयाची आणि नंतर तीच छोटी काढायला शिकायचे. आधी बिन घोटाळ्याची साधी अक्षरे शिकवायची आणि घोटाळ्याची जोडाक्षरे मागून शिकायची. अधि ठळक परमेश्वर पहायचा. समुद्र, पर्वत अशा महान विभूति भरलेला परमेश्वर पटकन डोळ्यात भरेल. हा परमेश्वर पटला तर एखाद्या जलबिंदूत, मातीच्या छोट्या कणातही तोच आहे हे पुढे कळेल. जेथे शुद्ध परमेश्वरी अविर्भाव सहज प्रकट झाला आहे, त्याचे ग्रहण पटकन होते . जसा रामाच्या ठिकाणी प्रकट झालेला परमेश्वरी अविर्भाव चटकन समजतो. राम हे  साधे अक्षर आहे, बिन भानगडीचा  परमेश्वर. पण रावण? तो समजायला जोडाक्षरा  सारखा आहे. रावणाची तपःश्चर्या,कार्यशक्ती थोर आहे, परंतु त्यात क्रूरपणा मिसळलेला आहे. दया, वत्सलता, प्रेम असलेला राम, त्याच्या ठिकाणी असलेला परमेश्वर सहज ग्रहण होईल पण रावणाच्यात असलेला परमेश्वर पहायला जरा वेळ लागेल. सज्जनांच्या परमेश्वर पाहून नंतर दुर्जनातही पहायला शिकायचे. समुद्रातील विशाल परमेश्वर त्या थेंबातही आहे, रामचंद्रातील परमेश्वर रावणातही आहे. जे स्थूलात, तेच सूक्ष्मात, जे सोप्यात तेच कठीणात. अशा दोन तर्हेने हा जगाचा ग्रंथ वाचावयास आपणास शिकायचे आहे. 

१० व्या अध्यायात कृष्ण म्हणतात – मी या देहात आहे खरा, पण अगदी खरा मी सर्वत्र आहे

१० वा अध्याय सांगतो “तू संकुचित होऊ नकोस. तसा प्रयत्न केलास तर ते आयुष्यात बरोबर होणारनाही.” त्यासाठी माझी प्रार्थना काय असली पाहिजे? माझी प्रार्थना अशी असली पाहिजे की “मी आता अपूर्ण असलो तरी संपूर्णाच्या दिशेने माझी वाटचाल झाली पाहिजे.”तशी प्रार्थना आपल्यास निवडायची असेल तर त्या साठी योग्य वर्तन आणि चिंतन झालं असल पाहिजे.

तुम्ही जेंव्हा किरण व्हायला तयार असता तेंव्हा सूर्य बनू शकता.

प्रकाश-किरण सर्वत्र जातो. तो राजमहालावर पडतो तसा उकिरड्यावर व गलीच्छ्य गटारावरही पडतो. सूर्यकिरण घाणीत, गटारात जाण्याची कधीच घृणा करत नाही..  घाणीची घृणा केली तर आम्ही किरणही होऊ शकणार नाही मग सूर्य कुठून होणार ? हा आपला पराभव असेल. आणि हि पराभूतता जर आपण टाळू शकलो तर आपल्याला सर्वत्रता मिळेल. नेहमी फायद्याचे घ्यायचे व तोटयाचे सोडायचे असं चालत नाही. न्याय व नियम हे तुमच्या सोयीप्रमाणे फिरत नसतात.

विभूती योग.

विभूतियोग म्हणजे सृष्टीच्या वैभवाचे वर्णन. ते वैभव भगवंतांनी अर्जुना समोर खुले केले. अर्जुन या सृष्टीतील विभूती (परमेश्वर रूपे) समजून घेतो व पुढे भगवंताना विचारतो “या सर्व विभूती कुठे आहेत ?” मला आपले खरे सर्वव्याप्त रूप बघायचे आहे. मग ११ व्या अध्यायात भगवंताना ‘विश्वरूप दर्शन’ घडवावे लागले.

विभूती योग कळल्यावर मग विश्वरूप दर्शन कळेल. हा विभूती योग या अध्यायात आपण समजून घेण्याचा प्रयत्न  करीत आहोत. 


विजय  रा. जोशी 



गीता अध्याय १०, भाग 2 , ध्वनी फीत .


Friday, February 19, 2021

  

गीता अध्याय १०, भाग १ , ध्वनी फीत . 



ईश्वर म्हणजे सर्व कारणांचे कारण : आपण जगाकडे दोन दृष्टीने पाहू शकतो. 

1) व्यवहार दृष्टी : हि स्थूल ज्ञान दृष्टी आहे. या दृष्टीला विश्वसंसार दिसतो. जगामध्ये जिकडे  -तिकडे घडणे-मोडणे , वाढणे-घटणे,  येणे-जाणे, दिसणे-नाहीसे होणे अविरत चालू असते. हा अनुभव प्रमाण धरूनच दैनंदिन जीवन जगावे लागते. 

2) परमार्थ दृष्टी : इंद्रियांना जसे विश्व दिसते तसे ते खरोखर नाही. विश्वाच्या प्रत्येक अंगामध्ये वरवर आढळणाऱ्या अनेकपणात खोल एकपण ओवलेला आहे. तो एकपण कार्यकारण संबंधाच्या द्वारा प्रचीतीला  येतो. हे कार्यकारण संबंध अतिशय स्थिर आणि कधी खोटे न ठरणारे असतात. 


युगानुयुगे तेच कारण तेच कार्य घडवून आणते. याचा अर्थ असा कि विश्वाच्या तिन्ही प्रमुख अंगामध्ये (जडद्रव्य, जीवन आणि अंतःकरण यांच्या हालचालींमध्ये) कार्यकारणाचे जाळे पसरलेले आहे.येथे तत्वज्ञान असे सांगते कि जर प्रत्येक  घटनेस कारण आहे तर कार्यकारण संबंधास देखील कारण असले पाहिजे. ईश्वर म्हणजे सर्व कारणांचे कारण.(प्रेमयोग के वि बेलसरे )

श्लोक १२ ते १८ अर्जुन भगवंतांना विचारतात. 

तुम्ही आमचे जीवन चालवत आहेत हे समजण्यासारखे आहे, तशी अनुभूतीपण येते. तुम्ही अविकारी आहात पण बाहेर तर सर्व विषयच दिसतात. भगवंत व्यापक आहेत हे सत्य आहे, पण व्यापक भगवंताचे चिंतन करायचे असते व व्यापकतेचा अनुभव घ्यायचा असतो. कोणत्या भावात तुमचे चिंतन करू?  चित्त एकाग्र करू? माझ्या जीवनात गुण यायला मी काय करू? हे सर्व तुम्ही विस्ताराने सांगा. 

अध्याय १० विवेचन स्वरूप. 

भगवत दर्शन; आणि त्यासाठी उपासना, भक्ती या मार्गी जाणे हे मनुष्यास का आवश्यक आहे , त्या मार्गावर जाण्याची इच्छा निर्माण होऊन त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणे (साधना करणे) काआवश्यक आणि उपयुक्त आहे या बद्दलचे विचार समजून घ्यायचा प्रयत्न आपण या भागात बघणार आहोत . 

माणूस हा निसर्गतः स्व-केंद्रित असतो. अनेक प्रकारच्या न सम्पणाऱ्या इच्छा, आकांक्षा , वासना आणि भोग यामुळे आपले जीवन भोगवादी बनले आहे, अधीकाधीक बनत चालले आहे. त्यातून अनेक समस्या निर्माण होत आहेत. १० वा अध्याय आपल्याला भोगयोगाकडून प्रेमयोगाकडे जायला कसे सांगतो हे  आपण समजून घ्यायचा प्रयत्न या भागात करणार आहोत.  

पुढील भागात ,  सर्वव्यापी , सर्वत्र पसरलेला भगवंत समजून घेण्यासाठी स्वतःला कसे शिकवायचे हे आपण पूज्य विनोबाजींच्या चिंतनातून शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत तर वरील सर्व ज्ञान विचारांच्या पार्श्वभूमीवर व्यवहारात , जीवनाच्या विविध टप्प्यामधील वाटचालीत,प्रयत्नांची दिशा नेमकी कशी ठेवायची, काय साधना प्रयत्नांचा मार्ग धरून  प्रगती करून घ्यायची हे सर्व पूज्य स्वामी विज्ञानानंद यांच्या मार्गदर्शनाच्या प्रकाशात समजून घेण्याचा आनंद आपण घेणार आहोत. 


विजय रा. जोशी 


गीता अध्याय १०, भाग १ , ध्वनी फीत


Friday, February 12, 2021

 


गीता अध्याय  9 भाग  2 : ध्वनी फीत



कर्ममार्गाप्रमाणे भक्तिमार्गातही काही फुकट जात नाही.


माझ्या शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी तू आपले मन स्थिर कर (गीता १८/२),

असा अर्जुनास प्रथम उपदेश केल्यावर नंतर “माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करणे

तुला होत नसेल तर अभ्यास म्हणजे वारंवार प्रयत्न कर, अभ्यासही होत नसेल तर

माझ्यासाठी चित्तशुद्धीकारक कर्म कर. आणि तेही होत नसेल तर कर्मफळाचा त्याग कर

आणि त्याद्वारे माझी प्राप्ती करून घे”. याप्रमाणे परमेश्वर स्वरूप मनात ठसविण्याचे जे निरनिराळे मार्ग भगवंतांनी वर्णिले आहेत.

(गीता १२/९-११). त्याचे कारण हेच होय.




मूळ देहस्वभाव किंवा प्रकृती तामस असेल तर, परमेश्वराच्या शुद्ध स्वरूपाचे ठायी चित्त

स्थिर करण्याचा उद्योग एकदम जमणार नाही किंवा एकाच जन्मात सफल होणार नाही.

पण कर्ममार्गाप्रमाणे भक्तिमार्गातही काही फुकट जात नसून,

एकदा भक्तिपंथात पडल्यावर या नाही पुढच्या, नाहीतर त्याच्या पुढच्या जन्मात

केव्हां न केव्हातरी ‘सर्व वासुदेवात्मकच आहे’ असे परमेश्वराचे खरे ज्ञान मनुष्यास

प्राप्त होऊन , त्या ज्ञानाने त्याला मुक्ती मिळते. असे भगवंतांचे सर्वाना आश्वासन आहे.

आपणच आपले शत्रू आणि आपणच आपले मित्र.

उद्धरावा स्वये आत्मा , खचू देऊ नये कधी

आत्मा चि आपुला बंधु , आत्मा चि रिपू आपुला (गीता ६/५)


हे तत्व भक्तिमार्गातही जसे च्या तसे सांगण्यात येते.

नाही देवापाशी मोक्षाचे गाठोळे I आणूनि निराळें द्यावे हाती I इंद्रियांचा जय साधुनियां मन I निर्विषय कारण असे तेथे II (गाथा ४२९७)

याची फोड तुकाराम महाराजांनी वरील अभंगात केली आहे. “असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी” असे म्हंटले तर मूढ लोक आळशी होतील

म्हणूनच हे स्वावलंबनाचे आणि स्वप्रयत्नाने स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

परमेश्वर जगातील सर्व घटनांचा करता करविता आहे हे खरे; तथापि त्याच्याकडे

निर्दयपणाचा व पक्षपातीपणाचा दोष येऊ नये म्हणून तो ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे

ज्याला त्याला फळ देतो असा जो कर्मविपाक प्रक्रियेतील सिद्धांत आहे

तो तोच याच कारणासाठी भक्तिमार्गातही घेत असतात. ९ वा अध्याय कसा समजेल ? सगळ्यात जायची तयारी असेल (वाईट/चांगले, लहान/थोर इ.) तर जगाचे राजे व्हाल.

आणि choosy व्हाल, आवड/निवड ठेवाल तर मग तुम्ही देवही नाही आणि देवभक्तही नाही. देव फक्त सुख/दुःख, स्वर्ग/नर्क/मोक्ष/पुनर्जन्म या प्रक्रिया सांगतो. त्या समजून घ्या.

निसर्ग नियम प्रक्रियेत देव सुद्धा व्यत्यय आणू शकत नाही कारण देवाचे एक नाव नियमेश्वर आहे. देवभाव कृष्ण म्हणतात : तुझे प्रयत्न, जीवन संपूर्णतेने मला अर्पण कर. माझ्याशी एकरूप हो. “देवा तू करशील ते चांगलं असेल, तेच मला चांगल वाटेल” हा विश्वास म्हणजे देवभाव. आपल्यात तो देव-भाव निर्माण व्हावा म्हणून प्रार्थना करू या.

१०व्या अध्यायात देवाची अनेक रूपे आपल्याला पहायची आहेत.त्या दिशेने मार्गस्थ होऊ या.



विजय रा जोशी. 



गीता अध्याय  9 भाग  2: ध्वनी फीत


Friday, February 5, 2021


 गीता अध्याय  9 भाग  1: ध्वनी फीत 


गीतेचे जीवनांतील महत्व.

अर्जुनाच्या निराश मनाच्या निर्माल्यातून पराक्रमाची फुलबाग कृष्णाने  फुलवली. गीतेतील शिकवण आजही जीवनात उपयोगी आहे. कुटुंबातील साधे झगडे, असंतोष मिटविण्या पासून ते वाममार्गी लोकांचे मन योग्य मार्गावर आणून त्यांना शांती मिळवून देण्या पर्येंत गीता सर्वांना उपयोगी आहे. 




गीतेच्या अभ्यासासाठी एकाग्रता आवश्यक आहे.गीतेचा जन्म स्व-कर्तव्याच्या आड येणारा मोह निवारणार्थ आहे. गीतेच्या अभ्यासाने स्वकर्तव्याचे भान येते व ते चांगले साध्य करता येते.८ व्या अध्यायात ध्यान प्रधान भक्तिमार्गाचे विवरण संपले. ९ व्या अध्यायापासून प्रेमप्रधान भक्ती मार्गाच्या विवरणाला प्रारंभ होतो. 

भक्तांनी या अध्यायाला गीतेतील सर्वाश्रेष्ठ अध्याय मानले आहे. या अध्यायाचे रहस्य आत्मसात झाल्यावर सगळे सोपे होते. येथे ज्या प्रेममार्गाचे वर्णन आहे , तो ध्यान मार्गातून सोपा आहे. त्यासाठी फार बुद्धिमत्तेची गरज  लागत नाही. पण पूर्ण श्रद्धा आणि निष्ठा मात्र हवी. 

राजयोग (कर्मयोग व भक्तियोग मिलाप)

सर्व महाभारताच्या मध्यावर गीता व गीतेच्या मध्यावर ९ वा अध्याय आहे. अनेक कारणांमुळे या अध्यायास पावनत्व आले आहे. ज्ञानदेवांनी जेंव्हा समाधी घेतली तेंव्हा हा अध्याय जपत ते समाधिस्थ झाले असे म्हणतात.

कर्मयोगात कर्म करायचे पण फलाची अपेक्षा मात्र ठेवायची नाही. भक्ती योगांत संपूर्ण शुद्ध भावाने ईश्वराशी जोडले जायचे. राजयोगात कर्म तर करायचे पण फळ टाकायचे नाही. तर ते घेऊन ईश्वरास तसेच्या तसे अर्पण करायचे.सर्व कर्माचा नेवेद्य प्रभूला अर्पण करायची ही भावना उत्तरोत्तर अधिक उत्कट करत गेलो की आपल्या साधनेच्या बरोबरीने क्षुद्र जीवन धन्य होते, मलीन जीवन सुंदर होते.

ज्या विद्येने जीवन कळते, जीवनाची कला कळते, ज्या विद्येमुळे जीवनाच्या शिल्पकारा विषयी माहिती मिळते, व ज्या विद्येमुळे या शिल्पकाराचे दर्शन घडते :तिलाच “विद्या” (राजविद्या) असे म्हणतात.तीच सर्व विद्यांचा राजा होय.

या राजविद्येबद्दल आणि राजयोगाची माहिती या पाठात घेऊ. 


विजय रा. जोशी 


गीता अध्याय  9 भाग  1: ध्वनी फीत