Friday, February 5, 2021


 गीता अध्याय  9 भाग  1: ध्वनी फीत 


गीतेचे जीवनांतील महत्व.

अर्जुनाच्या निराश मनाच्या निर्माल्यातून पराक्रमाची फुलबाग कृष्णाने  फुलवली. गीतेतील शिकवण आजही जीवनात उपयोगी आहे. कुटुंबातील साधे झगडे, असंतोष मिटविण्या पासून ते वाममार्गी लोकांचे मन योग्य मार्गावर आणून त्यांना शांती मिळवून देण्या पर्येंत गीता सर्वांना उपयोगी आहे. 




गीतेच्या अभ्यासासाठी एकाग्रता आवश्यक आहे.गीतेचा जन्म स्व-कर्तव्याच्या आड येणारा मोह निवारणार्थ आहे. गीतेच्या अभ्यासाने स्वकर्तव्याचे भान येते व ते चांगले साध्य करता येते.८ व्या अध्यायात ध्यान प्रधान भक्तिमार्गाचे विवरण संपले. ९ व्या अध्यायापासून प्रेमप्रधान भक्ती मार्गाच्या विवरणाला प्रारंभ होतो. 

भक्तांनी या अध्यायाला गीतेतील सर्वाश्रेष्ठ अध्याय मानले आहे. या अध्यायाचे रहस्य आत्मसात झाल्यावर सगळे सोपे होते. येथे ज्या प्रेममार्गाचे वर्णन आहे , तो ध्यान मार्गातून सोपा आहे. त्यासाठी फार बुद्धिमत्तेची गरज  लागत नाही. पण पूर्ण श्रद्धा आणि निष्ठा मात्र हवी. 

राजयोग (कर्मयोग व भक्तियोग मिलाप)

सर्व महाभारताच्या मध्यावर गीता व गीतेच्या मध्यावर ९ वा अध्याय आहे. अनेक कारणांमुळे या अध्यायास पावनत्व आले आहे. ज्ञानदेवांनी जेंव्हा समाधी घेतली तेंव्हा हा अध्याय जपत ते समाधिस्थ झाले असे म्हणतात.

कर्मयोगात कर्म करायचे पण फलाची अपेक्षा मात्र ठेवायची नाही. भक्ती योगांत संपूर्ण शुद्ध भावाने ईश्वराशी जोडले जायचे. राजयोगात कर्म तर करायचे पण फळ टाकायचे नाही. तर ते घेऊन ईश्वरास तसेच्या तसे अर्पण करायचे.सर्व कर्माचा नेवेद्य प्रभूला अर्पण करायची ही भावना उत्तरोत्तर अधिक उत्कट करत गेलो की आपल्या साधनेच्या बरोबरीने क्षुद्र जीवन धन्य होते, मलीन जीवन सुंदर होते.

ज्या विद्येने जीवन कळते, जीवनाची कला कळते, ज्या विद्येमुळे जीवनाच्या शिल्पकारा विषयी माहिती मिळते, व ज्या विद्येमुळे या शिल्पकाराचे दर्शन घडते :तिलाच “विद्या” (राजविद्या) असे म्हणतात.तीच सर्व विद्यांचा राजा होय.

या राजविद्येबद्दल आणि राजयोगाची माहिती या पाठात घेऊ. 


विजय रा. जोशी 


गीता अध्याय  9 भाग  1: ध्वनी फीत 

No comments:

Post a Comment