Tuesday, November 28, 2023

 पसायदान पाठ : ११/१०/२०२३


'पसायदान' हे जीवन घडवणारे मागणे आहे. 




 पसायदान अर्थाचे चिंतन प्रकाशाची वाट दाखविणारे मोठे साधन आहे. मानवाचे देणे घेणे ब्रह्मसुखाचें व्हावयाचे

असेल,  त्याचा परस्पर व्यवहार आनंदाचा व्हायचा असेल आणि एकूण समाजाचे जीवन सामंजस्याचे, कल्याणप्रद

आणि कृतार्थतेचे व्हावयाचे असेल तर 'पसायदाना' द्वारे माऊलींनी जे विचार दिले आहे त्याचा आपल्या बौद्धिक

घडणीमध्ये उपयोग करून घेतला पाहिजे. त्यासाठी 'पसायदाना' चे चिंतन प्रेरक आणि मार्गदर्शक होइल. 

हा दीप आपल्या हृदयमंदिरामध्ये सतत तेवत राहिला पाहिजे.

या दृष्टीने काही महत्वाच्या संकल्पनावर  आज या ओवीच्या निमित्ताने चिंतन करू. 

स्वतःची सर्व संकटे विसरून सर्व भूतमात्रांच्या कल्याणाचे हे मागणे माउलींच्या अति-विशाल अशा अंतःकरणातून

उमलले आहे. 

आतां विश्वात्मकें देवें। येणें वाग्यज्ञें तोषावें। तोषोनि मज द्यावें। पसायदान हें ॥ १ 

एक महान ज्ञानयज्ञातून गीतेचे तत्वज्ञान सर्व सामान्यांच्या भाषेत आणण्याचे कार्य  संपन्न झाले, गुरूंची आज्ञा पालन

झाली. म्हणून आता  विश्वेशवराकडे, निवृत्तिनाथांकडे आणि श्रोत्यांकडे ज्ञानदेव मागणी करीत आहेत.

प्रसन्न होऊन माझी प्रार्थना ऐका आणि मला प्रसाद द्या.  त्यांच्या प्रसादाचे स्वरूप काय आहे, 

९००० + ज्ञानेश्वरीतील ओव्यांच्या  अर्थाचे सार सांगणारे हे ९ ओव्यांचे पसायदान आहे. म्हणून हा साररुपी संदेश,

प्रत्येकाने आपल्या हृदयात धारण करण्या सारखा आहे. 

जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो । भूतां परस्परें जडो। मैत्र जीवांचें ॥ २ ॥

-  खळ / दुष्ट लोकांबद्दल अधिक काळजी, चिंता म्हणून त्यांच्यातील वाईटपणा, जावो अशी प्रार्थना. 

-  माणूस सत्कर्माने सुधारू शकतो, असा पूर्ण विश्वास.

पण तेथेच न थांबता  सुधारणा झाल्यावर लोकांत सत्कर्माची आवड वाढो.  सर्व  जीव एकत्र येऊन त्यांचे एकमेकात

स्नेहसंबंध , मैत्र होवो. आणि सर्वांचे कल्याण होवो, 

-  खळ ,समाजात विविध रूपाने, मुखवटा धारण करून  वावरतात, त्यामुळे चांगले काम करणाऱ्या माणसांना

 त्रास होतो, या दुष्ट लोकांचा जन्म देखील वाया जातो. 

-   काही माणसे दुष्ट तर नसतात, पण ती फक्त स्व-केंद्रित वृत्तीने जगतात अशा लोकांना  सुद्धा 

  सत्कर्म प्रेरणा मिळणे आवश्यक असते. 

- जे कर्म भगवंतासाठी नाही, तर केवळ स्वतःच्या ऐहिक अथवा पारलौकिक सुखासाठी आहे त्याला ज्ञानेश्वर

 महाराज “अज्ञानाचा पुण्यमार्ग” असं म्हणतात. 

असे कोणतेही कर्म जे केवळ स्वतःसाठी आहे, स्वतःच्या वासनापूर्तीसाठी आहे, त्याला सत्कर्म कशाला म्हणायचे ? 

लोकांना आपले स्वार्थाचे साधन समजण्याची माणसाची मनोवृत्ती अत्यंत सूक्ष्मपणे कार्य  करीत असते

आपल्यासाठी सर्व  आहेत, आणि जग आपल्याला सुख देण्यासाठी देवाने निर्माण केले आहे, 

असे माणसाने समजू नये. 

थोडे फार सत्कृत्य करणाऱ्याना, लोकांनी आपल्याला शहाणे समजावे असे वाटते.  आपण लोकांसाठी एवढा 

त्याग,कष्ट करतो पण लोकांनी आपल्यास जेवढे मानायला  पाहिजे तेवढे ते आपल्यास मानत नाहीत याचा त्याला

खेद होतो, चीड येते. 

 सत्कृत्य आणि उपासना दोन्हीही  निरपेक्ष हवे. मग हळू हळू चित्त शुद्धी आणि चित्त शांती येते. 



विजय रा. जोशी 

No comments:

Post a Comment