Tuesday, January 4, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 71 ते 75 : ध्वनिफीत




सारांश श्लोक ७१ ते ७५. 

साधनेत वर्तन काटेकोरपणे जपायला हवे.  प्रथम आपण चुकत आहोत हेच माणसाला मान्य नसते.  पण कोणत्यातरी निमित्ताने काही तरी करायला हवे याची तीव्र जाणीव होऊ लागली तर माणूस उपायांकडे बघतो. अशा लोकांस मार्गदर्शन करणारे मनाचे श्लोक (७१ - ७६), “प्रभाते मनी राम चिंतीत जावा” असा उपाय देतात. 

नामस्मरणांनी लगेच हे दोष जातील का ? तर नाही मग त्याने काय होईल? हळूहळू आपल्या दोषांची जाणीव होते. इतरांचे दोष पाहणे कमी होते. पैसे लागत नाही, कष्ट होत नाहीत . एकाग्रतेने, नम्रतेने, भगवंताची आळवणी करायची. 

पण येथे काय मागायचे ? तर शाश्वत सुख, भगवंताशी एकरूपतेचा आनंद. बाकी काही भौतिक, सांसारिक सुख मागायचे नाही. नामस्मरणासाठी साधने, संपत्ती , कार्य-कर्म काही लागत नाही जर काय लागत असेल तर तो भगवंत प्राप्तीचा संकल्प, निर्धार, आस !!  

जर हे पटत नसेल तर सर्व अभ्यास स्वतः करावा, स्वतः करणे होत नसेल तर सद्गुरू शोधावे, सद्गुरूंची परीक्षा आपल्या बुद्धीप्रमाणे करून घ्यावी. आणि एकदा सर्व शन्का फिटल्या कि मग मात्र त्यांचा उपदेश, त्यांचे सांगणे बिनशर्त पाळावे, त्यात संशयी वृत्तीने , विविध सबबीने बाधा आणू  नये. 

समर्थ आपल्याला सांगत आहेत ते असे – 

दिवसाची सुरवात रामनामाने करा आणि दिवसभर रामनामाच्या निष्ठेने वैखरी, प्रकट बोलणे, वागणे करत प्रत्येक दिवस साजरा करीत जा. या श्लोकांतील संदेश आपल्याला उचित मार्गदर्शन करतो. 

श्रीराम II


विजय रा. जोशी. 


1 comment:

  1. अगदी खरं आहे.आपले दोष कळणे आणि सद्गुरू मिळणं हे अवघड आहे पण प्रयत्न केले तर शक्य आहे.छान मार्गदर्शन! धन्यवाद!

    ReplyDelete