Sunday, August 25, 2024

 योग ग्रंथ अभ्यास, विषयोग -2 ,  दि. २६ / ६ / २०२४. 





सारांश :

अमिबाने माणसापर्यंत प्रगती केली, म्हणजे काय केले ? खालच्या अप्रगत प्राण्यापासून माणसापर्यंत प्रगती झाली, तशी त्याची दुःखे, गुणाकाराने वाढली. ती दुःखे, तो पुढे ढकलू शकला. एवढीच त्याला मेंदूने देणगी मिळाली.  

स्त्री पुरुष 'समतोल' हवा. स्त्री- पुरुषातल्या संबंधाला सम+बंध, सम+भोग अशा समतोलवाचक, समतादर्शक वाक्यरचना केल्या आहेत. 

खाणे आवश्यक, ते निवडून खा. खाणे ही अनेक इच्छा प्रमाणे एक इच्छा आहे. जी गोष्ट खाण्याची तीच आपल्या  विकारांची आहे. काम, क्रोध, लोभ, मंद , मत्सर माया यांची आहे. देहात असताना योग्य गोष्ट एकच असते, की हे विकार वाईट आहेत ही गोष्ट मानायची, त्यातला वाईटपणा कमी करण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्यातल्या त्यात या विकारांचा उपयोग कसा करून घ्यायचा ते पहायचे. स्वामीजींनी भारतीय संस्कृतीतील अत्यंत उच्च अशा देवता प्रतीकांची कामासक्ती संबंधित अनेक उदाहरणे दिली आहेत. 

त्याचा हेतू ते सांगतात. सत्य हे मुक्त असले पाहिजे. कामविकार एवढा शत्रुवत मानणे हे मूर्खपणाचे आहे. त्याला मित्र बनवून, चुचकारून , त्याचा योग्य वेळी आदर राखून , आपण त्याला मदतीला बोलावले तर तो खरोखर आपल्याला उंच ठिकाणी घेऊन  जाऊ शकेल, असे प्राचीन ऋषी-मुनींनी दाखवून दिले  आहे. ते आपण समजून घेतले पाहिजे.

अधिभौतिक उत्क्रान्ति विरुद्ध भौतिक उत्क्रान्ति :

काम क्रोध काही प्रमाणात सर्व जीवाना आहेत, पण, लोभ, मोह, मद , मत्सर, … फक्त मनुष्याला आहेत … ही  उत्क्रांतीतील एक प्रकारे.. प्रगती !! 

निसर्गाची मानवाला मिळालेली ही अलौकिक देणगी पाहा ! ती म्हणजे आपली स्वसंवेद्य चेतना आहे. म्हणजे, स्वतःविषयी  एवढी जाण असणारी चेतना आहे … ही फारच अतुलनीय अशी क्षमता आहे !"आपलेच जाणणे व पाहाणे, ह्याची जाणीव असणे आणि, देवघेवीच्या, परस्परसंपर्काच्या ह्या कृतीचे जे परिणाम होतात त्यांनाही समजणे" हे जे आणखी एक स्वातंत्र्य मनुष्य प्राण्याला आहे, ते स्वातंत्र्य, ती क्षमता इतर प्राण्यांना नसते. 

पण आपल्या स्वच्छ, बुद्ध संवेदनावर , क्षमतेवर  भूतकालीन स्मृतींचे ओझे लादले गेले आहे. त्यामुळे, आपली प्रत्येक गोष्टी  विषयीं  सम्यक् आकलन  घडण्याची शुद्ध प्रक्रिया, ही, संग्राहित माहितीच्या ओझ्यांनी, साठवलेल्या अनुभूतींच्या परिणामांनी व साचलेल्या ज्ञानाच्या ठशांनी दडपली गेली. योगाचे हे शास्त्र नेमके ह्याच गोष्टीकडे आपले लक्ष वेधते की, आपली सम्यक् आकलनाची क्षमता ह्या पूर्व-स्मृतीत साचलेल्या माहिती वजा-ज्ञानाने व अनुभवांच्या स्मृती-गाठींनी अशुद्ध होत गेली आहे..

स्वार्थ आधारित, आत्मकेंद्रित वृत्ती हा सहज मानवी भाव असल्याने माणूस मूळ काम क्रोध विकारातून पुढे उत्क्रांतीच्या वाटचालीत अती हव्यासामुळे पुढे मोह, लोभ, मद , मत्सर व माया (मी आणि माझे) या पुढील विकारात वेढला गेला. काम विकाराने निर्माण झालेले जग , माणसाच्या प्रगती पर्येंत ‘माया’ विकारांत गुंतलेले दिसते. त्यातून सुटत जायचे तर माया विकारापासून सुटत सुटत काम विकारापर्येत जायचे, असा मार्ग दिसतो. 

या वरील चिंतन या आणि काही पुढील पाठांत केले आहे. 


विजय रा. जोशी. 


















Thursday, August 22, 2024

 

योग ग्रंथ पाठ १८, योग ग्रंथ अभ्यास : विष योग, दि  १८ /६/ २०२४. 





सारांश :

विषयोग आणि भाग्य योग हे दोन्ही ग्रंथ समजून घेतांना आपण त्यातील सर्व तपशील समजून न घेता मुखत्वे आपल्या अभ्यास उद्दिष्टाशी जेवढा भाग सुसंगत आहे तेवढाच फक्त पहाणार आहोत. साधकत्वातील क्रम विकास साधून आपले भौतिक आणि पारमार्थिक जीवन अधिक यशस्वी, आणि समृद्ध करणे यासाठी आपण हा अभ्यास करत आहोत. ‘विषयोंग’ हे पुस्तक फक्त विवाहित साधकांपुरते आहे. 

विषयोंग-हेतू - दृष्टिकोन विधायक आहे. काम शक्तीचा योग्य उपयोग केला पाहिजे, त्यातील धोके टाळले पाहिजेत. याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले आहे.

‘चित्तवृत्तींवर निरोध’ हेच योगाचे मुख्य कार्य आहे. इच्छा, कामना  कोणाला ? मनाला !! त्यासाठी मनाचे, वर्तनाचे शिक्षण हवे. भारतीय अध्यात्माने काम विकाराचे अस्तित्व आणि प्रेरणा कबूल केली तर दुसऱ्या बाजूने ‘काम’ या शब्दाचा अर्थ विशाल केला. ‘काम’ याचा अर्थ कर्म, कार्य हेतू असाही अध्यात्माला अभिप्रेत आहे. 

काम विकाराने निर्माण झालेले जग , माणसाच्या प्रगती पर्येंत ‘माया’ विकारांत गुंतलेले दिसते. त्यातून सुटत जायचे तर मायाविकारापासून सुटत सुटत काम विकारापर्येत जायचे असा मार्ग दिसतो. तो अभ्यास आपण या पाठ मालेत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. .. 


विजय रा. जोशी. 

 








Thursday, August 8, 2024

 योग ग्रंथ पाठ १७, अभ्यास दिशा, दि  १२ /६/ २०२४. 




सारांश. 


योग ग्रंथ : अनुबंध चतुष्ट्य 

1.     अधिकारी : ज्यांना आपली प्रापंचिक तसेच पारमार्थिक प्रगती करून साधनेचा क्रम विकास 

        साधत अंतिमतः मोक्ष प्राप्ती करायची इच्छा असलेले साधक.

         विष योग हा ग्रंथ फक्त विवाहित वाचकां करीता आहे. 

2.    विषय काय? :  साधकांचा भौतिक तसेच अध्यात्मिक क्रमविकास स्वावलंबी उपायांनी साधण्यासाठी 

         बुद्धी / श्रद्धा आधारित मार्गदर्शन.

3.     प्रयोजन काय ? : साधकत्वातील क्रमविकासाने व्यक्ती कल्याण साधणे  

         आणि अशा साधकांच्या  एकत्रित प्रयत्नांमुळे समष्टी कल्याण साधणे. 

४. संबंध काय ?  प्रयोजन साध्य होण्यासाठी अधिकारी साधकांनी काय साधना करावी  याचे सर्वांगीण मार्गदर्शन

 योग ग्रंथात स्वामीजींनी केले आहे. 

आपण बुद्धियोग आणि श्रद्धा  योग्  यांचा अभ्यास सविस्तर करणार आहोत. 

विषयोंग आणि भाग्य योग यांच्यातील महत्वाच्या भागाचा अभ्यास / चिंतन करणार आहोत. 

माझी भूमिका एक अभ्यासक आणि केलेल्या अभ्यासाचा ज्ञान गुणाकार एवढीच आहे, 

तज्ज्ञाची नाही , हे सुरवातीपासून स्पष्ट केले आहे, 

विषयोग -- दृष्टिकोन विधायक आहे. काम शक्तीचा योग्य उपयोग केला पाहिजे, त्यातील धोके टाळले

पाहिजेत. याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले आहे.

भाग्य योग -- माणसाचा काळ आणि स्वभाव यावरुन भविष्य सांगता येते.. योगाने हे भविष्य सुधारता येईल. 

भारतीय प्राचीन विचारवंतांनी अनेक सुंदर समन्वय केले. सुखी आयुष्य, पराक्रमी आयुष्य, वैभवशाली आयुष्य

मिळविण्यासाठी त्यांनी चेतावणी दिली. परंतु . तेच आयुष्य त्याग आणि शांती यांच्या, समतोलाने शापमुक्त

राखण्याची योजनाही केली आहे. 

बुद्धी योग -- तुमच्या सुखाचे 'कारण', तुम्ही, बुद्धी आहे, असे मानता. बुद्धी हीच युक्ती तुमच्या सुखासाठी तुम्ही

 वापरता. बुद्धीनेच तुमची समाधान स्थिती निर्माण होते. या सगळ्या प्रक्रियेचे ज्ञान तुम्ही करून घेतले पाहिजे. 

सबंध ग्रंथात, शक्य तेवढ्या विस्ताराने जे ज्ञान दिले आहे. 

श्रद्धा योग. -- तुमचे कारण तुम्हीच.    निष्कर्ष सरळ आहेत -

१) सुखासाठी तळमळणारे मन तुम्हीच निर्माण केले आहे.

२) ती तळमळ कधीही पुरी होणार नाही, हे लक्षात आणून ती हळूहळू कमी करत नेणे हे तुमचे काम आहे

३) ती कमी होत होत शून्यावर आली, सम अवस्थेवर आली तरीही प्रचंड सुख आहे, असा ज्ञात्यांचा 

   अनुभव आहे.

 पैकी दुसऱ्या व तिसऱ्या प्रक्रियेत योगाभ्यासाचा विशेष संबंध येतो.त्यातून उत्पन्न होणारी मोक्षस्थिती मिळाल्यावर

 सुख मिळेल यावर श्रद्धा बसली म्हणजे  हा योग सहजतेने जमेल. सारांश,  मोक्ष अनुभव घेतला पाहिजे. 


विजय रा. जोशी