Friday, February 12, 2021

 


गीता अध्याय  9 भाग  2 : ध्वनी फीत



कर्ममार्गाप्रमाणे भक्तिमार्गातही काही फुकट जात नाही.


माझ्या शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी तू आपले मन स्थिर कर (गीता १८/२),

असा अर्जुनास प्रथम उपदेश केल्यावर नंतर “माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करणे

तुला होत नसेल तर अभ्यास म्हणजे वारंवार प्रयत्न कर, अभ्यासही होत नसेल तर

माझ्यासाठी चित्तशुद्धीकारक कर्म कर. आणि तेही होत नसेल तर कर्मफळाचा त्याग कर

आणि त्याद्वारे माझी प्राप्ती करून घे”. याप्रमाणे परमेश्वर स्वरूप मनात ठसविण्याचे जे निरनिराळे मार्ग भगवंतांनी वर्णिले आहेत.

(गीता १२/९-११). त्याचे कारण हेच होय.




मूळ देहस्वभाव किंवा प्रकृती तामस असेल तर, परमेश्वराच्या शुद्ध स्वरूपाचे ठायी चित्त

स्थिर करण्याचा उद्योग एकदम जमणार नाही किंवा एकाच जन्मात सफल होणार नाही.

पण कर्ममार्गाप्रमाणे भक्तिमार्गातही काही फुकट जात नसून,

एकदा भक्तिपंथात पडल्यावर या नाही पुढच्या, नाहीतर त्याच्या पुढच्या जन्मात

केव्हां न केव्हातरी ‘सर्व वासुदेवात्मकच आहे’ असे परमेश्वराचे खरे ज्ञान मनुष्यास

प्राप्त होऊन , त्या ज्ञानाने त्याला मुक्ती मिळते. असे भगवंतांचे सर्वाना आश्वासन आहे.

आपणच आपले शत्रू आणि आपणच आपले मित्र.

उद्धरावा स्वये आत्मा , खचू देऊ नये कधी

आत्मा चि आपुला बंधु , आत्मा चि रिपू आपुला (गीता ६/५)


हे तत्व भक्तिमार्गातही जसे च्या तसे सांगण्यात येते.

नाही देवापाशी मोक्षाचे गाठोळे I आणूनि निराळें द्यावे हाती I इंद्रियांचा जय साधुनियां मन I निर्विषय कारण असे तेथे II (गाथा ४२९७)

याची फोड तुकाराम महाराजांनी वरील अभंगात केली आहे. “असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी” असे म्हंटले तर मूढ लोक आळशी होतील

म्हणूनच हे स्वावलंबनाचे आणि स्वप्रयत्नाने स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

परमेश्वर जगातील सर्व घटनांचा करता करविता आहे हे खरे; तथापि त्याच्याकडे

निर्दयपणाचा व पक्षपातीपणाचा दोष येऊ नये म्हणून तो ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे

ज्याला त्याला फळ देतो असा जो कर्मविपाक प्रक्रियेतील सिद्धांत आहे

तो तोच याच कारणासाठी भक्तिमार्गातही घेत असतात. ९ वा अध्याय कसा समजेल ? सगळ्यात जायची तयारी असेल (वाईट/चांगले, लहान/थोर इ.) तर जगाचे राजे व्हाल.

आणि choosy व्हाल, आवड/निवड ठेवाल तर मग तुम्ही देवही नाही आणि देवभक्तही नाही. देव फक्त सुख/दुःख, स्वर्ग/नर्क/मोक्ष/पुनर्जन्म या प्रक्रिया सांगतो. त्या समजून घ्या.

निसर्ग नियम प्रक्रियेत देव सुद्धा व्यत्यय आणू शकत नाही कारण देवाचे एक नाव नियमेश्वर आहे. देवभाव कृष्ण म्हणतात : तुझे प्रयत्न, जीवन संपूर्णतेने मला अर्पण कर. माझ्याशी एकरूप हो. “देवा तू करशील ते चांगलं असेल, तेच मला चांगल वाटेल” हा विश्वास म्हणजे देवभाव. आपल्यात तो देव-भाव निर्माण व्हावा म्हणून प्रार्थना करू या.

१०व्या अध्यायात देवाची अनेक रूपे आपल्याला पहायची आहेत.त्या दिशेने मार्गस्थ होऊ या.



विजय रा जोशी. 



गीता अध्याय  9 भाग  2: ध्वनी फीत


1 comment: